आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या श्रद्धा, समता आणि सेवाभावाचा महासोहळा आहे. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रत्येक वारकऱ्याला तातडीची, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.
वारकऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रत्येक भाविक सुरक्षितपणे वारी पूर्ण करून सुखरूप घरी परतेल, यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.
आषाढी वारीदरम्यान राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी उपजिल्हा रुग्णालयासह विविध आरोग्य केंद्रांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ, औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून यंदाची वारी आरोग्यदायी, सुरक्षित आणि निर्विघ्न पार पाडावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
No comments:
Post a Comment