तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये
मुंबई, दि. 13 : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशी अडवणूक करणे योग्य नाही, यासाठी महसूल, गृह आणि मृद व जलसंधारण विभागाने लक्ष घालून संबंधितांवर कार्यवाही करावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.
मृद व जलसंधारण विभागाच्या 15 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान' ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचे खोलीकरण करण्याचे काम संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची मान्यता घेऊन करण्यात येते. या योजनेंतर्गत जलसाठ्यातील गाळ आणि नाला खोलीकरणांची कामे अशासकीय संस्थेमार्फत व लोक सहभागातून करण्यात येतात, तसेच जलसाठ्यातून काढण्यात आलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात पसरवण्यात येतो, यावर स्वामित्व शुल्क (Royalty Free) माफ करून देण्याचे तरतूद आहे. याबाबींना 4 ऑक्टोबर 2024 च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
क्षेत्रीय स्तरावर 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान' योजनेंतर्गत गाळ वाहतूक करणाऱ्या वाहनांना विविध विभागाच्या यंत्रणेकडून अडवणूक केली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. तरी गाळ वाहतूक आणि गाळ शेतामध्ये पसरवण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडवणूक होणार नाही, याबाबत मृद व जलसंधारण विभाग, महसूल विभाग आणि गृह विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment