शासकीय, खासगी कर्करोग रुग्णालये व सेवाभावी संस्थांनी कर्करोगविरोधी लढ्यात एकजूटीने सहभागी व्हावे
- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई दि. 23: कर्करोग विरोधी लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी कर्करोग रुग्णालये, कर्करोग तज्ज्ञ, सेवाभावी संस्था यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी केले आहे.
आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्कोसर्जन, तज्ज्ञ प्राध्यापक, कर्करोग उपचार क्षेत्रातील काम करणा-या टाटा, रिलायन्स, लिलावती व इतर खाजगी रुग्णालयांचे प्रतिनिधी, शासकीय व खासगी रुग्णालयांतील कर्करोग उपचार तज्ज्ञ, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तसेच दक्षिण कोरियातील आयएमबी संस्थेचे तज्ज्ञ दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी आरोग्य आयुक्त सुनील भोकरे आणि उपसचिव विलास बेंद्रे उपस्थित होते.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, कर्करुग्ण संख्या वाढत आहे. कर्करोग उपचारांमध्ये अर्ली डिटेक्शन म्हणजेच सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्करोग प्रारंभीच्या अवस्थेत आढळल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे राज्यभर जनजागृती, निदान व उपचार या त्रिसूत्रीच्या आधारे कर्करोगा विरोधात लढाई सुरू आहे. कर्करोग तपासणीसाठी राज्यातील आठ परिमंडळात प्रत्येक एक कर्करोग निदान व्हॅन द्वारे तपासणी सुरू असून, आतापर्यंत तीन कोटीपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. कर्करुग्णांच्या उपचारासाठी राज्यात 27 ठिकाणी डे केअर युनिट सुरू करण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment