गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प, पोलीस भरतीवर भर
- गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. १२ : राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्षेला प्राधान्य देत मोठा प्रकल्प राबविण्यात येत असून पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यावरही सरकारने भर दिला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.
सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील गृह विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री कदम यांनी ही माहिती दिली.
गृह राज्यमंत्री कदम म्हणाले की, राष्ट्रीय गुन्हे नोंदवही ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार देशात महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. राज्यात ऑनलाइन एफआयआर नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे गुन्हे नोंदविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यांच्या निकालात वाढ होत असून २०१३ मध्ये राज्याचा दोषारोप सिद्धी दर कन्व्हिक्शन रेट ९ टक्के होता, तो २०२५ मध्ये वाढून ५३ टक्क्यांवर पोहचला.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत असून तो आशिया खंडातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक असल्याचे राज्यमंत्री कदम यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment