चर्चेत वाघ-बिबट्यांचा प्रादुर्भाव, वनपट्टे, वनउद्यान उभारणी, वनजमिनीवरील अतिक्रमण, तसेच वन्यप्राणी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना मदत अशा विविध विषयांवर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना वन मंत्री नाईक म्हणाले की, वन विभागाबाबत लोकांच्या भावना सकारात्मक होत आहेत. राज्यातील 21 टक्के क्षेत्र वनाखाली असून ते 33 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जात आहे. राज्य सरकारने 300 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला असून यावर्षी 10 कोटी झाडे लावण्यात आली आहेत. पुढील वर्षांत ही संख्या वाढवत नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने त्यावर नियंत्रणासाठी प्रयोगात्मक उपाययोजना करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून पुढील काही महिन्यांत त्याचे परिणाम दिसून येतील, असेही त्यांनी नमूद केले.
वन विभागातील मनुष्यबळाबाबत वन मंत्री नाईक म्हणाले की, दीर्घकाळ तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष दिले जाईल. उपलब्ध निधीतून वनसंवर्धन, वनाग्नि नियंत्रण, वृक्षलागवड व कर्मचारी यंत्रणा मजबूत करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment