दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर
· दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग
मुंबई, दि. १३ : राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत दिव्यांग कल्याण विभागाच्या नावात बदल करून तो आता “दिव्यांग सक्षमीकरण विभाग” या नावाने ओळखला जाणार आहे. तसेच विभागाच्या कामकाजात अधिक परिणामकारकता आणण्यासाठी विभागाची पुनर्रचना करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय विभागाने निर्गमित केला आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ या कायद्याने दिव्यांग व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन “कल्याणकेंद्री” न राहता “हक्कआधारित सक्षमीकरण” असा स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसनाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे सक्षमीकरण करण्यावर शासनाचा भर राहणार आहे.
दिव्यांग क्षेत्रातील बदलती आव्हाने, नव्या तंत्रज्ञानाचा वाढता वापर तसेच माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा प्रभाव लक्षात घेऊन विभागाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या क्षेत्रात कार्यरत संस्था, तज्ज्ञ आणि विविध घटकांचा सहभाग विचारात घेऊन ही रचना अधिक सर्वसमावेशक करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment