पर्यावरण आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य शासनाचा भर
तीनशे कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य; विज्ञान व तंत्रज्ञानाचा आधार घेत व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.८ : पर्यावरणाचे संर्वधन आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य शासनाचा भर आहे. राज्यात वृक्ष व वनक्षेत्राचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये ३०० कोटी (३ अब्ज) वृक्षलागवडीचा संकल्प राज्य शासनाने केला असून यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा आधार घेत व्यापक कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईतील हॉटेल सहारा येथे नानाजी देशमुख प्रतिष्ठान आणि अमेनिटी ट्री केअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुस-या आंतरराष्ट्रीय आर्बोरीकल्चर परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यन पांडे,अमेनिटी ट्री केअर फाऊंडेशनचे वैभव राजे यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील वन व वृक्षआच्छादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये ३०० कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून पर्यावरणीय समतोल राखत शाश्वत विकास साधणे हे राज्य शासनाचे धोरण आहे. आजच्या युगात विकास आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये संघर्ष नाही, तर दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पुढे नेणे हीच काळाची गरज आहे. राज्याचा विकास आवश्यक असला तरी पर्यावरणाच्या संरक्षणाशी कोणताही तडजोड होऊ शकत नाही.
No comments:
Post a Comment