प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही तातडीच्या वैद्यकीय सेवांना प्राधान्य देत रुग्णवाहिका सेवा व ट्रॉमा केअर सेंटरच्या सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. यासोबतच जनसामान्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. योग्य वेळी उपचारांची माहिती व सुविधा उपलब्ध झाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात,असेही त्यांनी नमूद केले. देशात अनेक महत्त्वपूर्ण औषधांचे उत्पादन होत असले तरी काही वैद्यकीय उपकरणे व औषधे आयात करावी लागतात. ती देशातच तयार व्हावीत यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही राष्ट्रपती मुर्मू यांनी केले.
कोविडनंतरच्या काळात मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. एकाकीपणा, उदासीनता यांसारख्या समस्यांमुळे वैयक्तिक, कौटुंबिक व व्यावसायिक आयुष्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मानसिक आरोग्य सेवाही तितक्याच सक्षमपणे उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केली.
वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर पदवीच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक राज्यांमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान रुग्णालये सुरू करण्यात आली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. हिंदुजा हॉस्पिटल समूह यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या “जीव वाचविणे, निरोगी भारत निर्माण करणे” (Saving Lives, Building a Healthier Bharat Mission) या अभियानाचे त्यांनी कौतुक केले. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमांतर्गत दुर्गम व ग्रामीण भागात रुग्णसेवा पुरविण्यात येणार असून तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून जीव वाचविण्याचे पुण्यकर्म या अभियानाच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी काढले.
No comments:
Post a Comment