इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता
21 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 14 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार या पुरस्कारासाठी सन 2025-26 वर्षाकरिता इच्छुक व्यक्ती तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी व्यक्ती व संस्थांनी 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करावे असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मुंबई शहर प्रसाद खैरनार यांनी केले आहे.
पुरस्कारासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत, अर्जदार व्यक्ती, संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
अर्जाचा नमुना, शासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच पुरस्कारांबाबतची अधिक माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर (चौथा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी. चेंबुरकर मार्ग, चेंबुर पुर्व 400071) येथे उपलब्ध असून दि. 21 फेब्रुवारी 2026 सायं. पाच वाजेपर्यंत संबंधित पुरस्कारासाठीचे प्रस्ताव या कार्यालयास करणे आवश्यक आहे. पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव करावेत, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment