77
राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
· मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ
· विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान
मुंबई, दि. १७ :- मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान विभूतींनी येथे शिक्षण घेतले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवस्नातकांनी देशाच्या प्रगतीत आपले मोलाचे योगदान द्यावे.राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे सक्षम, सृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडविण्याचे भक्कम पायाभूत धोरण आहे. या धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेची प्रेरणा मिळून देशाच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सक्रीय सहभाग राहील, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह फोर्ट येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. कार्यक्रमास केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे मान्यवर सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता यांच्यासोबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment