ऊर्जा क्षेत्रात 'एआय' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- महावितरणमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन
- अमेरिकेच्या 'द रॉकफेलर फाउंडेशन', 'ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट' व ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून उपक्रम
मुंबई, दि. ४ :- राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या 'डिजिटल ट्वीन' पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे 'एआय' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक शाश्वत आर्थिक विकासाची सुरूवात होत असल्याचा विश्वास प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) 'द रॉकफेलर फाउंडेशन- आरएफ', 'ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट-जीईएपीपी' आणि ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय) आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव शाह यांची यावर्षी जानेवारीमध्ये यासंदर्भात चर्चा झाली. यामध्ये वीज वितरण प्रणालीमध्ये डिजिटल ट्वीन वापर करण्याची अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आली. ऊर्जा विभागही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असून त्यांनी महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला.
"आरएफ आणि जीईएपीपीसारख्या संस्थांच्या सहकार्यातून अत्याधुनिक एआय आधारित जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म हा देशातील इतर वीज कंपन्यांसाठी आदर्श ठरेल, वीज वितरण क्षेत्रातील कंपन्यासाठी हा एक आदर्श मानदंड असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
रॉकफेलरचे अध्यक्ष डॉ. शाह यांच्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. ग्राहक सेवा उन्नत करण्याकरिता आणि कालांतराने महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता एआय-आधारित निर्णय-सहाय्यक साधने अत्यंत उपयुक्त आहेत. महावितरण कंपनीसाठी विकसित होणाऱ्या उपाययोजना वीज वितरण क्षेत्रातील दीर्घकालीन, शाश्वत आणि परिणामकारक सहाय्यभूत असतील, असा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
वीज वितरणमध्ये 'डिजिटल ट्वीन' पद्धती विकसित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. नाविन्यपूर्ण एआय -आधारित उपक्रमातून शाश्वत पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढण्यासाठी ग्रामीण भागात मोठे बदल होतील.
No comments:
Post a Comment