बालविवाह रोखण्यासाठी वैयक्तिक प्रबोधनाचे विशेष अभियान राबवावे
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १४ : बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर ठोस आणि प्रभावी कार्यवाही सुरू आहे. तथापि, काही दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमध्ये पारंपरिक रूढींमुळे बालविवाहाच्या घटना अद्यापही आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर बालविवाहमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी वैयक्तिक स्तरावर प्रबोधन आणि जनजागृतीचे विशेष अभियान राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
११ ऑक्टोबर २०२५ (आंतरराष्ट्रीय कन्या दिन) ते २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिन) या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी १०० दिवस’ अभियानाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस आयुक्त नयना गुंडे, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपसचिव आनंद भोंडवे, अवर सचिव प्रसाद कुलकर्णी, सहआयुक्त राहुल मोरे, रायगडचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, सुजाता सकपाळ, दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व विभागीय उपायुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच लैंगिक शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विभागीय पातळीवर विशेष उपक्रम राबविण्यात यावेत.
No comments:
Post a Comment