मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. जे प्रकल्प स्वप्न रूपात होते, ते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वास्तवात उतरले आहेत. नवी मुंबई विमानतळाची संकल्पना 1990च्या दशकात झाली असली, तरी अनेक वर्षांपासून ती केवळ कागदावरच होती. प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘प्रगती’ उपक्रमाअंतर्गत या प्रकल्पाचा समावेश झाल्यानंतर सर्व आवश्यक परवाने मिळवण्यात यश येऊन कामाला वेग आला. हे विमानतळ दरवर्षी नऊ कोटी प्रवाशांची हाताळणी करू शकणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
विमानतळाबरोबरच अटल सेतू, 40 किमी लांबीची भूमिगत मेट्रो हे प्रकल्पही जलद गतीने पूर्ण झाले आहेत. या मेट्रोच्या निर्मितीत जपान सरकार आणि जायका संस्थेचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘मुंबई वन’ या सर्वसमावेशक वाहतूक ॲपद्वारे मेट्रो, मोनोरेल, बस, उपनगरी रेल्वे आणि वॉटर टॅक्सी या सर्व वाहतूक साधनांसाठी एकाच तिकीटाची सुविधा मिळणार आहे. तसेच, तरुणांसाठी कौशल्य विकास विभागाच्या नव्या योजना जाहीर करण्यात आल्या असून, विमानतळ आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेली भेट असून याच ठिकाणी देशातील पहिले ऑफशोर विमानतळ तयार करण्यात येत आहे. त्याच ठिकाणी चौथी मुंबई तयार होणार आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या पाठीशी आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सातत्याने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment