डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
· सर्वसामान्य नागरिकांच्या समृद्धीसाठी फिनटेकचा उपयोग
मुंबई, दि. ९ : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या महासत्तेच्या प्रवासात नैसर्गिक भागीदार असलेल्या ब्रिटनची भूमिका महत्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. फिनटेकचा उपयोग सामान्य नागरिकांच्या आयुष्यात समृद्धीसाठी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
भारताने अतिशय कुशलतेने तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजिटल व्यवहारातून सुरक्षित, शाश्वत वित्तीय व्यवस्थेचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले असल्याचे सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगाला भारतासोबत भागीदारी आणि जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या जागतिक महासत्तेच्या वाटचालीत सहभागी होण्याचे आवाहन केले.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक फिनटेक महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर सहभागी झाले होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वित्त व्यवस्थेला अधिक सक्षम, कार्यक्षम आणि शाश्वत बनवण्याचा भारत प्रयत्न करीत आहे. डिजिटल वित्तीय व्यवहारांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि समावेशक बनवण्यासाठी ' एआय' ची भूमिका निर्णायक ठरत आहे. भारताच्या कौशल्य, गुणवत्ता आणि नवोन्मेष क्षमतेमुळे भारतीय उत्पादने जगभरात स्पर्धात्मक ठरत आहेत. त्यामुळे भारत जागतिक पुरवठा साखळीचा एक मजबूत आणि विश्वासार्ह भाग बनला आहे. आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे स्थानिक उत्पादनांना चालना मिळाली असून, जागतिक गुंतवणूकदार भारताकडे अधिक विश्वासाने पाहत आहे. भारताने डिजिटल तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले आहे, जे प्रत्येक नागरिकासाठी आणि देशातील प्रत्येक प्रदेशासाठी सुलभ आणि सहज उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment