सेवा पंधरवड्यात नागरिकांच्या समस्या दूर व्हाव्यात - उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लोककल्याणासाठी लोकाभिमुख कामकाजावर शासनाचा भर आहे. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच त्यांच्या घरकुलांची समस्या दूर करण्यात येणार आहे. नागरिकांचा त्रास कमी करण्यावर महसूल विभागाचा भर आहे. शेतरस्त्यांची मोजणी, सीमांकन होणार आहे. प्रलंबित प्रकरणांचे निराकरण होणार असून प्रत्येक शेताला १२ फूट रुंदीचा रस्ता उपलब्ध होणार आहे आणि याबाबतीत महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार आहे, असे सांगून त्यांनी महसूल विभागाचे अभिनंदन केले. या कामात सातत्य टिकवून नागरिकाच्या समस्या दूर करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महसूल विभागाला चांगले काम करता यावे यासाठी चांगली वाहने देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय वास्तू सुविधायुक्त व्हाव्यात असा प्रयत्न आहे. पुणे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या शासकीय वास्तू उभ्या रहात आहेत. महसूल विभागाची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आडाची वाडी गावात सर्व पाणंद रस्ते खुले करण्यात आले असून त्याला महापुरुषांची नावे देण्यात आली आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या रस्त्यांसह अन्य रस्ते सिमेंटचे करून वृक्षारोपणाचे काम करण्यात आले आहे. इतर गावांनीही या गावाचा आदर्श घ्यावा असे सांगून उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे उपमुख्यमंत्री पवार यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment