अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली असून खैरी धरणातून सकाळी ९.३० पासून १६,७४३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे. जामखेड तालुक्यातील दरडवाडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सुरक्षास्तव जामखेड ते खर्डा वाहतूक बंद करण्यात आली आहे.
धाराशीव जिल्ह्यात परांडा आणि भूम येथे मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके पुणे येथून रवाना करण्यात आली आहेत.
बीड जिल्ह्यात २० सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद (६५ मि.मी.) झाली असल्याने आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यात सरासरी ७५.३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असल्याने अहमदपूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. छिलखा बॅरेज येथे चार नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक पथकाच्या सहाय्याने बचाव कार्य सुरु आहे. जिल्ह्यात ६० रस्ते सुरक्षास्तव बंद करण्यात आले आहेत. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक नांदेडहून लातूर, अहमदपूरसाठी पाठविण्यात येत आहे.
राज्यात मागील २४ तासात सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे:- लातूर जिल्हा ७५.३ मि.मी., हिंगोली ६६.२ मि.मी., परभणी ५४.९ मि.मी., धाराशिव ५४.५ मि.मी. आणि गडचिरोली जिल्ह्यात ५३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment