इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीकडील जमिनी
शासन ताब्यात घेण्याची कार्यवाही करणार
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई दि. १७ : ठाणे जिल्ह्यातील मीरा - भाईंदर येथे इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांना २८९० एकर जमिन दिली आहे. या जमिनीवर २००८ पर्यंत शासनाची मालकी होती. या प्रकरणात २००८ मध्ये तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी यांनी कंपनीला प्रमुख वहिवाटदार ठरविल्यामुळे जामीन कंपनीकडे गेली. या कंपनीकडे असणारी शासनाची जमीन ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
मीरा - भाईंदर येथील इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या जमिनीविषयी सदस्य नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
यासंदर्भात अधिक माहिती देताना महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, या जमिनीबाबत विभागीय आयुक्त यांनी २०१५ मध्ये स्थगिती दिली. याप्रकरणी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. मागील दहा वर्षापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणात २१ जुलै २०२५ रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
संबंधित कंपनीने ५१५ मालमत्तेच्या विक्रीबाबत न्यायालयाच्या ' जैसे थे ' आदेशाचा अवमान केला आहे. याबाबत तत्कालीन निबंधक यांनी खरेदी विक्रीची नोंद केली आहे. कंपनीच्या २०१५ ते २०२५ या कालावधीत या जमीन खरेदी विक्री व्यवहार प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यात येत आहे. तसेच कंपनीकडे असलेल्या जमिनी वर्ग २ करून शासनाच्या ताब्यात घेण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे, असेही महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment