पारपत्र अर्जामध्ये दिलेल्या पत्त्याची चोख पडताळणी करणार
-गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम
मुंबई, दि. १६ : पारपत्र अर्जासंदर्भातील पोलीस पडताळणी अत्यंत अचूक आणि नियमबद्ध असणे आवश्यक आहे. पारपत्रासाठी अर्ज करताना अर्जदाराला कायमस्वरूपी आणि सध्याचा पत्ता देण्याचे पर्याय असतात. अर्जदाराने अर्जात दिलेल्या सध्याच्या पत्त्याची असलेली पडताळणी चोखपणे करण्यात येईल. याबाबत केंद्र शासनाचे विशिष्ट कार्यप्रणालीनुसार सध्याच्या पत्त्याची पडताळणी करण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात येतील, असे गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
इमारतीचा पुनर्विकास सुरू असताना घर बदलावे लागत असल्यामुळे सध्याच्या पत्त्यावर पारपत्रासाठी पोलिस पडताळणी करण्याबाबत विधानसभा सदस्य मनीषा चौधरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री अमित साटम, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, अर्जदार व्यक्ती प्रत्यक्षात तीच आहे का, तिच्यावर कोणते गुन्हे प्रलंबित आहेत का किंवा तिच्याविरुद्ध कोणतेही समन्स,वॉरंट आहे का, याची शहानिशा करणे गरजेची असते. ही प्रक्रिया देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. पारपत्र पोलीस पडताळणी करताना दिलेल्या पत्त्यावर पोलीसांनी प्रत्यक्ष जाऊन खात्री करणे अनिवार्य आहे. विशेषतः पुनर्विकास प्रक्रियेत असलेल्या इमारतींसंदर्भात, विकासकांकडून नागरिकांना तात्पुरत्या वास्तव्याची सोय किंवा भाडे दिले जाते. अशा वेळी त्या भाडेकरारातील तात्पुरता पत्ता अधिकृतरित्या पडताळणीसाठी ग्राह्य धरला जातो. तसेच या प्रक्रियेसंदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात येते.
पारपत्र पडताळणी प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आणि पासपोर्ट डिजिटल ॲप सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून यामध्ये अधिक सुलभता आणि पारदर्शकता आणण्यात येईल. परपत्रासाठी अर्ज करताना सध्याचा पत्त्याची पडताळणी करण्यात येत असल्याबाबत जनजागृती करण्यात येईल, असेही राज्यमंत्री श्री. कदम यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment