पुरात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
पुणे जिल्ह्यातील मौजे काटेवाडी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या सात लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बारामती तालुक्यातून ७०-८० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. पूर परिस्थिती पाहता एनडीआरएफ ची दोन पथके पाठविण्यात आली. तर इंदापूर येथे पूर परिस्थितीत अडकलेल्या दोन व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
सातारा जिल्ह्यात दिनांक २४ ते २५ मे २०२५ या कालावधीत फलटण १६३.५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. फलटण तालुक्यातील दुधेबावी या गावाशेजारी ३० नागरिक दहिवडी फलटण रस्त्यावर पूर आल्याने अडकले होते. त्यांना तहसीलदार फलटण यांच्या समन्वयाने तेथील गावात राहण्या व खाण्याची सुविधा पुरविण्यात आली. पूर परिस्थिती पाहता एनडीआरएफचे एक पथक बारामतीवरून फलटणसाठी रात्री रवाना करण्यात आले. या पथकाद्वारा फलटण येथील पूर परिस्थितीची निगराणीचे काम करण्यात आले. सर्व रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली असून, जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात दिनांक २४ ते २५ मे २०२५ या कालवधीत ६७.७५ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. कालव्याचे पाणी ओढ्यात नाल्यात मोठ्या प्रमाणात आल्याने अतिवृष्टीमुळे निरा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
माळशिरस तालुक्यात कुरुबावी गावालगत नदी पात्रात सहा नागरिक अडकले असता इंदापूर येथील एनडीआरएफ चे पथक रवाना करण्यात आले. या पथकाच्या मदतीने सर्व नागरिकांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर परिसरात भीमा नदी पत्रात तीन नागरिक अडकले होते त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
२४ ते २६ मे या कालावधीत अतिवृष्टीमध्ये राज्यात वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून, पाण्यात बुडून आठ व्यक्ती मृत तसेच दोन जखमी झाल्या आहेत. मृतांमध्ये रायगड जिल्ह्यात एक, पुणे जिल्ह्यातील तीन, जालना जिल्ह्यात दोन, अहिल्यानगर जिल्ह्यात एक आणि मुंबई शहरमध्ये एक नागरिकाचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात दोन नागरिक जखमी झाले आहेत. तर लातूर जिल्ह्यात चार प्राणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक, जालना जिल्ह्यात दोन, नाशिक जिल्ह्यात एक असे आठ प्राणी मृत झाले आहेत. जालना जिल्ह्यात एक प्राणी जखमी झाला असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment