गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनामध्ये वाढ आणि
मच्छिमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण
- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. २४ : गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये वाढ होणे आणि मच्छिमारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी एक सर्वंकष धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.
सदस्य परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मत्स्य व्यवसाय मंत्री राणे बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये प्रवीण दरेकर, उमा खापरे, भाई जगताप, प्रसाद लाड, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.
गोड्यापाण्यातील मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी या क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता आणणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. राणे म्हणाले की, यासाठी एक सर्वंकष धोरण विभागामार्फत तयार करण्यात येत आहे. तसेच विभागाकडे असलेल्या सर्व तलावांची माहिती एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मत्स्योत्पादनात सध्या महाराष्ट्र १७ व्या स्थानावर आहे. राज्य मत्स्योत्पादनामध्ये ३ ऱ्या क्रमांकावर यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मासेमारीला कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात येणार आहे. तसेच मत्स्योत्पादन वाढीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येईल. याशिवाय तलावांमधील गाळ काढण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील तलावांमध्ये अतिक्रमणही झाल्याचे निदर्शनास येत आहे. यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री राणे यांनी दिली.
No comments:
Post a Comment