अहिराणी बोली भाषावैज्ञानिक ओळख
खानदेश प्रस्ताविक
अहिराणी ही खानदेश या भू प्रदेशात बोलली जाणारी बोली. महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांच्या मिळून होणाऱ्या प्रदेशास आजही खानदेश म्हणून ओळखतात. पूर्वी खानदेश हा मुंबई इलाख्याचा एक जिल्हा होता. प्राचीन काळी खानदेश या प्रदेशाचा विस्तार सातपुडा पर्वतापासून दक्षिणेकडे सातमाळा व अजिठ्यांचे डोंगर येथ पर्यंत तर पूर्वेकडील वऱ्हाड प्रांत ते निमाड जिल्हा पासून पश्चिमेकडे बडोदे संस्थान व रेवाकाठ जहागिरी पर्यंत इतका होता. याचे अतिप्राचीन नाव ऋषिकदेश. यादवांच्या काळात हा भूभाग सेउनदेश म्हणून ओळखला जाई. मोगलांच्या काळात हा भाग खानदेश म्हणून ओळखला जाई. व्यवस्थापनाच्या दृष्टिने इ.स. १९०६ मध्ये खानदेश जिल्ह्याचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश हे दोन भाग पाडण्यात आले. पुढे १९६० पासून पूर्व खानदेशास जळगांव जिल्हा व पश्चिम खानदेशास धुळे जिल्हा अशी नावे देण्यात आली.
खानदेश इतिहास :
रामायण- महाभारत यांतील उल्लेखलेल्या ऋषकदेश या भूप्रदेशाच्या वर्णनाशी खानदेशाचा भूभाग जुळतो. खानदेश या शब्दाची उत्पत्ती कान्हदेव, कान्हेरदेव, कान्हाचा देश, कानबाई या शब्दांत शोधण्याचा आजवर प्रयत्न झालेला आहे. मात्र त्यात तथ्य वाटत नाही. खानदेश या भूप्रदेशाहून इतरत्र कान्हाचा किंवा श्रीकृष्णाचा संबंध अधिकचा आहे. तसेच खानदेशातील अनेक उत्सवांपैकी कानबाई, कानुबाई हा एक उत्सव आहे. त्यामुळे एखाद्या भूप्रदेशाला त्या परिसरातील एका उत्सवाच्या नावाने ओळखले जाणे ही शक्यताही कमीच आहे. कान किंवा कानन म्हणजे अरण्य, वन, गवताळ प्रदेश. कान किंवा खान या शब्दाचा अर्थ खाण, खदान, थाळा, मध्ये खोल असणारा भाग, खनि किंवा उत्पत्तीस्थान. सातपुडांच्या रांगा, सह्याद्रीच्या रांगा, चांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी व परिसरातील डोंगर रांगा यामुळे हा परिसर खोल खदाणी सारखा, खाणीसारखा आहेच. गिरणा, तापी, नर्मदा या नद्यांच्या खोऱ्यांचा हा भाग दाट अरण्याचा, गुरांसाठी विपूल गवत असणारा प्रदेश. येथे विपुलता (खाण) होती, चौफेर नैसर्गिक तटबंदीमूळे (भेसळ मुक्त अशी) शुद्धता, व शुद्ध वंश (खान, खानदानी) होती. म्हणून खदाणीचा खाणीचा देश, चांगल्या वंशाचा-खानदानीचा देश, गवताचा-कानन देश यावरुन खानदेश हे नामाभिद्यान झाले असावे, या व्युत्पत्तीचांही विचार करण्याजोगा आहे.
अशिरगड हे अश्वत्थाम्याचे स्थान होते. पांडवाविरुद्ध तोरणमाळचा राजा लढला होता ते तोरणमाळ धुळे जिल्ह्यात आहे असे महाभारतकालीन उल्लेख आढळतात. चाळीसगांव जवळील पाटणे परिसरात आद्य पराष्मयुग व तदनंतर अप्पर पराश्म युगात मानवी वस्ती होती हे उत्खननात सापडलेल्या पाच स्थरांवरुन सिद्ध होते. बहाळ येथे सापडलेली नाणी, घटोत्कच लेण्या, नागद, मूंदखेडे, मेहुनबारे, बहुलवाड येथे सापडलेले ताम्रपट, सारजादेवी मंदिरावरील शिलालेख, अंजिठा लेण्या, या पुराव्याआधारे खानदेशच्या इतिहासावर प्रकाश पडतो. खानदेशात इ.स.पूर्व चौथे ते इ.स. दुसरे शतकात मौर्याचे राज्य होते. पहिल्या शतकात सातवाहनांची सत्ता होती. ३ रे ते ५ वे शतकांत वाकाटकांची सत्ता होती (वर्षदेव, स्वामीदास, मुलंदा) चौथ्या शतकांत वाकाटकांसोबतच अभीरांचीही सत्ता होती. इ.स. ६५५ ते ७०२ या काळात सेद्रकांचे (निकुम्माल्लशक्ती, नृपती जयशक्ती, नृपती वैरसेन) राज्य होते. या सोबतच सहाव्या शतकांत कलचुरी तर सातव्या शतकांत पुलकेशीचे तर आठव्या शतकात त्रैकूटकांचे राज्य होते. त्यानंतर नवव्या ते बाराव्या शतका पर्यंत राष्ट्रकूट, सोमवंशी, आणि यादव यांचे राज्य होते. पुढे अल्लाउद्दीन खिलजी, अकबर, यांच्या सत्तेनंतर १८ व्या शतकांत (इ.स-१७२०) निजामांचे राज्य होते. १७६० ते १८१८ हा मराठ्यांचा काळ तर १८१८ ते १९४७ हा ब्रिटिशांचा काळ गणला जातो.
No comments:
Post a Comment