Tuesday, 4 February 2025

निष्पापांचे रक्त 'अग्रलेख एक सडेतोड उत्तर

 श्री. संपादक,

म.टा.

तुमच्या आजच्या (जानेवारी ३१,२०२५) अंकातील 'गंगेतील निष्पापांचे रक्त 'अग्रलेख वाचला. खरं म्हणजे, हे पत्र मी माझ्या पूर्वीच्या सवयीनुसार तुमच्याकडे पाठवायला पाहिजे होते, पण अशा निर्भिड पत्रांना नेहमीच कचऱ्याची टोपली दाखवली जाते, ह्या स्वानुभवाने या वेळी सोशल मीडियाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. कारण या मिडीयावर तुमची सेंन्सॉरशिप लागू होत नाही.

पूर्वी मी रोज कमीतकमी दोन मराठी वृत्तपत्रांचा नियमित वाचक होतो. पण नंतर मी टाईम्स (इंग्रजी) सोडून बाकी सगळी मराठी वृत्तपत्रे वाचणे बंद केले. पण सौ. च्या आग्रहास्तव आम्ही परत म.टा. ची वार्षिक वर्गणी भरून तो पेपर चालू केला, तो फक्त दोन कारणांस्तव- 

१). त्याच्यातील शब्दकोड्यासाठी आणि २). रविवारच्या अंकातील तंबी दुराई यांच्या उत्कृष्ट स्तंभ (कॉलम) साठी, पण हातात अंक पडला की एखादी तरी नजर इतर पानांवर पडतेच

तर अशी नजर आज तुमच्या आजच्या अग्रलेखावरही पडली. आणि तुम्हाला सांगतो की माझा अजिबात अपेक्षाभंग झाला नाही. त्याचं काय आहे, संपादक साहेब, मोदी-योगी जोडीने आयोजित केलेल्या या जगातील सर्वात मोठा मेळाव्याकडे सगळे जग अवाक् होऊन कौतुकाने पाहाते आहे. या मेळाव्यात सामील झालेल्या हजारो परदेशी पाहुण्यांनी तोंड भरून तेथील व्यवस्थेचे, स्वच्छतेचे आणि काटेकोर आयोजनाचे कौतुक करून योगींना १००/१०० मार्क दिले आहेत. हिंदुंच्या धार्मिक भावनांना ही भरभरून सन्मान दिला जातो आहे. अशावेळी 'काय करावे, काही सुचेना' अशा मानसिक अवस्थेमध्ये असणाऱ्या भारतातील पुरोगामी, बुद्धिवादी(?) लोकांना आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या मिडियाला एक संधी या मेळाव्यात झालेल्या त्या दुर्दैवी घटनेने मिळाली आणि वेळ न घालवता त्यांनी त्या संधीचा वापर करण्याचा  प्रयत्न सुरू केला आहे. आजचा तुमचा अग्रलेख हा या प्रयत्नांचाच एक भाग आहे. 

प्रथम आपण या मेळाव्यातल्या भाविकांच्या श्रद्धेविषयी बोलू. तुम्ही गंगा काठावर राहूनही गंगास्नान न करणाऱ्या संत रोहिदासांचे उदाहरण दिले आहे. भारतीय परंपरेत संत ही उपाधी ज्याची परमेश्वरावर अनन्यसाधारण भक्ती आणि श्रद्धा आहे, त्याला दिली जाते. त्यामुळे संत रोहिदासांची परमेश्वरावर अत्यंत श्रद्धा होती, हे ओघाने आलेच. रोहिदास हे गंगाकिनारी राहात होते (ह्रूषिकेश ते बिहार पर्यंत कुठेही) तरी या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत आणि गंगा किनारी राहात असल्याने ते गंगेत डुबकी मारीत नसले आणि घरीच बादलीतल्या पाण्याने अंघोळ करीत असले तरी ते गंगेचेच पाणी होते ना ? मग त्यांना आपो आपच गंगास्नानाचे पुण्य रोजच लाभत होते. गंगामातेवरील भारतीयांची श्रद्धा हजारो वर्षांपासून लवलेशाचाही फरक न होता आज २१व्या शतकातही अभेद्य राहिली आहे. अनेक सांस्कृतिक आक्रमणांनंतरही ती तसूभरही कमी झालेली नाही. आधुनिक विज्ञानाच्या आक्रमणाने ही ती नष्ट होण्याची सुतराम ही शक्यता नाही. उलट, परधर्मीय असणाऱ्या विज्ञानवादी विदेशी लोकांनाही आता गंगास्नानाचे महत्त्व पटते आहे. *आणि हीच तुमची पोटदुखी आहे*. 

दुसरे उदाहरण तुम्ही 'पुण्य ते उपकार,पाप ते परपीडा ' या तुकारामांच्या प्रसिद्ध उक्तीचे दिले आहे.आणि कुंभमेळ्यात हजेरी लावणाऱ्या बेछूट तथाकथित धार्मिकांना ही उक्ती माहीत नसावी, असे म्हटले आहे.

कोवीड महामारीच्या काळात जगातील बहुतेक गरीब राष्ट्रांना हजारो कोटी रुपयांची ( किंवा डॉलर्स) किंमतीची लस एक पैसाही न घेता मोदींनी (म्हणजेच धार्मिक भारतीयांनी) पुरविली. हा उपकार म्हणजे पुण्याची फार मोठी कमाई मोदींनी म्हणजेच भारतीयांनी केली, हे लक्षात ठेवूनच भारतीयांनी सलग तिसऱ्यांदा, असे पुण्य मिळवून देणाऱ्या मोदींना पंतप्रधान बनविले, हे तुम्ही विसरलेले दिसतात. आणि कुंभमेळाव्या सारख्या पवित्र ठिकाणी परपिडा करणे भाविकांच्या मनातही येणार नाही, हे जितके खरे तितकेच योगी - मोदींचे विरोधकही धजावणार नाही, इतकी चोख व्यवस्था योगींनी ठेवली आहे. 

जेंव्हा भारतीयांची लोकसंख्या आजच्या पेक्षा तुलनेने कमी होती त्या काळातही कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात बिगर भाजपा सरकारांच्या काळातही सरकारी अनास्था आणि अव्यवस्थेमुळे शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. कारण या सरकारांना कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व कळलेच नव्हते. पण योगींनी भारतीयांची कुंभमेळ्याप्रती भारतीयांची श्रद्धा लक्षात घेऊन त्याला एखाद्या उत्सवाचे नीटनेटके रुप दिले. त्यांनी धार्मिक भावनांना योग्य सामाजिक रुपही देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मतदान करणाऱ्या सुमारे ८० कोटी लोकांपैकी निम्मे लोकांनी जातीपातीची सर्व बंधने झुगारून एकदिलाने या उत्सवात भाग घेतला. एकीकडे राहुल गांधी जातीच्या मुद्यावर भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा उद्योग करीत असताना, सर्व भारतीयांची एकजूट करण्याचा यशस्वी प्रयत्न  योगी-मोदींनी कुंभमेळ्यातून साधला आहे, *हे तुमच्या पोटदुखीचे दुसरे कारण आहे*. एक लाखाची राजकीय सभा किंवा मेळावा आयोजित करताना पुढाऱ्यांना किती पैसै वाटावे लागतात, हे उघडे गुपीत आहे, पण इथे तर स्वखर्चाने कोट्यवधी गरीब लोक शेकडो मैलांचा प्रवास करत आनंदाने या उत्सवात सहभागी कसे होतात? असा प्रश्न *हे तुमच्या पोटदुखीचे आणखी एक कारण आहे*.

तसेच, एका धार्मिक उत्सवासाठी सहा, सात हजार कोटी रुपये खर्चून सरकारी तिजोरी मध्ये जवळपास दोन लाख कोटी रुपयांची भर कशी टाकू शकतात, हा ही तुम्हाला भेडसावणारा प्रश्न आहे.

शेवटी, एक अद्वितीय आणि डोळ्यांचे पांग फेडणाऱ्या या उत्सवातील एकूणच सर्व व्यवस्था, स्वच्छता, टापटीप, नियोजन यांचे कौतुक न करता, एका दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने योगींना एका क्षणात हिरोचा झिरो करून त्यांना व्हिलन बनविण्याचा प्रयत्न तुम्ही आजच्या अग्रलेखातून केला आहे तो कोट्यवधी हिंदूंना मान्य होणार नाही, हे लक्षात ठेवा.


सतीश कुलकर्णी, (9822 064 709).

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi