🦋🪴🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. *🫓नैवेद्य🫓*
तो त्या दानपेटीत दररोज पाच रुपये टाकायचा.
त्याचं ते नियमित देवळात येणं, देवाला नमस्कार करणं आणि दानपेटीत पांच रुपये टाकणं तिथल्या विश्वस्तांच्या ध्यानात आलं होतं.
त्याच्या साध्या कपड्यांवरून व सायकलच्या वापरावरून तो एक निम्नवर्गीय गरीब भक्त आहे, हे सहज लक्षात येत होतं.
कधी कधी तो आपल्या बायकोला व एका मुलीला सोबत घेऊन यायचा, तेव्हासुद्धा कापूर, बुक्का, उदबत्ती न घेता पाच रुपये पेटीत टाकायचा.
एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी दहा रुपये पेटीत न चुकता पडायचे.
त्याच्या या नित्यक्रमात कधी खंड पडल्याचं तिथल्या पुजाऱ्यानं आणि विश्वस्तांनी पाहिलं नव्हतं.
त्यामुळं तो आदराचा विषय झालेला होता.
अशी वीस वर्षं उलटून गेली…
महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्यानं आपल्या दानपेटीतील पाच रुपयात कधी बदल केला नाही किंवा वाढ केली नाही.
आता तर रस्त्यावर लहानमोठे सर्व स्कुटर, मोटार सायकल घेऊन दिमाखात येत व ऐटीत निघून जात…
मात्र त्याच्या सायकलीवरून येण्याजाण्यात कधी फरक पडला नाही.
अलीकडे त्याचं आयुष्य थोडं ओढग्रस्तीचं असावं, असं जाणवत होतं; तरीही दानपेटीतला पाच रुपयांचा नित्यक्रम त्या गरीबानं चुकविला नाही…
त्याची मुलगी मोठी झाली होती व कदाचित तिची काळजी त्याला सलत असावी.
कधी कोणाजवळ बोलला मात्र नाही.
त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्तांनी पाहिलं देखील; मात्र हा आपणहून कुणाशी बोलत नसे किंवा आपलं दुखणं सांगत नसे.
सध्या तो जास्तच चिंताक्रांत दिसत होता.
एके दिवशी देवळाच्या विश्वस्तांनी हिय्या केला व आपुलकीनं त्याला विचारलं,
“सध्या तुम्ही चिंताग्रस्त दिसता…
तुमचं काम सुटलंय का?
कसली चिंता भेडसावतेय?”
तो कसंनुसं हसला.
म्हणाला, “काही नाही हो…
मुलीचं लग्न ठरलंय आणि पैशाची जोडणी काही झालेली नाही.
स्थळ चांगलं आहे. हातचं जाऊ नये असं वाटतंय.
पण आता हात तरी कुणाकडे पसरायचे?
मी हा असा पैशानं दुबळा.
कामाचा मालकही फारसं कांही उचलून द्यायला तयार नाही…
म्हणून काळजीत आहे, इतकंच. बघू, देव यातून कसा काय मार्ग काढतोय ते?”
_“अरे, पण खर्च तरी किती येणार आहे?”_
विश्वस्त.
_“पंचवीस-तीस हजार तरी नक्की लागणार हो!”_ तो म्हणाला.
त्या दिवशी काय झालं कुणास ठाऊक, त्या विश्वस्ताच्या डोक्यातून तो विषय कांही जाईना.
रात्री झोपतानाही त्याचाच विचार.
रात्री वरचेवर जाग आल्यामुळं झोपदेखील नाही झाली.
पहाटे पहाटे त्याला एक स्वप्न पडलं…
स्वप्नात पाच रुपयांची नाणी तो मोजत होता.
जागा झाला आणि स्वप्न जसंच्या तसं त्याला आठवू लागलं , खाऊ लागलं…
त्यानं देवाकडे पाहिलं.
तो चोरासारखा बेरकी हसत असलेला त्याला दिसला.
तो पटकन उठला.
वही घेतली व हिशोब करू लागला…
एकूण वर्षे वीस, म्हणजे एकूण दिवस ७३००.
दररोज रुपये पाच प्रमाणं झाले रू. ३६,५००/-. त्याने ३६,५०० रुपयांची एक थैली तयार केली व शांतपणे झोपी गेला.
झोपेत पुन्हा तेच स्वप्न!
तो जागा झाला व आठवू लागला…
पाच रुपयांची नाणी आपण मोजत होतो हे स्वच्छपणे त्याला आठवत होतं.
दानपेटीतले जमा पैसे आपण ‘एफडी’त ठेवतो हेही त्याला आठवलं.
त्यांनं हिशोब केला.
सरासरी जमा रुपये १८,२५०/- वर्षाचे अंदाजे व्याज २०००/-. वीस वर्षांचे झाले ४००००/- म्हणजे सरळ व्याजाने त्या गरीबाच्या दररोजच्या पाच रुपयांचे मुद्दलासह होतात रुपये ७६५००/- आणि हा चिंताक्रांत आहे पंचवीस हजारासाठी!
तो विश्वस्त आता निश्चिंत झाला होता. त्यानं देवाच्या तिजोरीतून ७६,५०० रुपयांची थैली तयार करून ठेवली.
आता त्यास शांत झोप लागली.
नेहमीप्रमाणं दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला.
त्यानं देवाला नमस्कार केला.
तिथल्या दानपेटीत पाच रुपये टाकले व ओट्यावर जाऊन बसला.
तो विश्वस्त देवळातल्या आणखी कांही सज्जनांना घेऊन तिथं आला व त्यानं ती थैली त्या गरिबाला दिली व म्हणाला,
“बाबा रे, तू दररोज पाच रुपये प्रमाणे या वीस वर्षांत देवाला ३६,५०० रुपये वाहिलेस.
वीस वर्षांत त्याचे ७६,५०० रुपये झालेत, जे देवाकडे सुरक्षित आहेत.
आज तुझी नड आहे व देवाची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत…
म्हणून तुझे पैसे तू मोजून घे!”
गरीब चकीत झाला.
त्याला दिवसाउजेडी जणू कांही मोठं स्वप्न पडलं होतं!
तो ती थैली घेऊन देवाजवळ गेला व रडू लागला…
सर्वजण खूप भावूक झाले.
देव प्रसन्न हसत होता.
गरीबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता.
तो मात्र थैली घेऊन तिथंच बसून राहिला.
त्याची पत्नी व मुलगी त्याला शोधत देवळात आली.
त्यानं घडलेले वर्तमान त्या दोघींना सांगितलं.
त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
बघणारे सर्वजण देवाचा जयजयकार करू लागले.
आता पत्नी व मुलगी त्याला घरी चलण्यासाठी विनवू लागली…
पण त्याचा पाय तिथून निघत नव्हता.
‘माझं दान देवानं परत तर नाही ना केलं?’_ असं त्याचं मन त्याला खाऊ लागलं.
काय करावं, त्याला सुचेना.
त्यानं विश्वस्ताला बोलावलं व विचारलं,
_“मी जे देवाला रोज पाच रुपये वाहिले, त्याचे वीस वर्षात किती होतात?”_
_“३६,५०० रुपये होतात.”_ विश्वस्त म्हणाले.
गरीबानं थैलीतले ३६,५०० रुपये काढले व पुन्हा त्या दानपेटीत टाकले.
आता त्याच्या चेहऱ्यावरचा ताण नाहीसा झाला.
सर्व उपस्थित चकित झाले.
त्यांनी त्याला विचारलं,
_“हे तू काय केलंस?”_
तो म्हणाला, _“मी देवाला जेवढे वाहिले तेवढे परत करतोय.
तो मी माझ्यासाठी देवाला दिलेला नैवेद्य होता.
उद्याचा माझा पाच रुपयांचा नैवेद्य आता मी निश्चिंत मनानं देवाला वाहीन.
अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या.
आता मला शांत झोप लागेल.
देवानं दिलेल्या या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचं लग्न थाटामाटात होईल.
आता मी घरी जातो…”_
आणि प्रसन्न चेहऱ्यानं ते कुटुंब घरची वाट चालू लागले.
देवाचा प्रसन्न चेहरा मात्र आणखी उजळला होता!
थेंबाथेंबानं देवाकडे आपण साठविलेली कोणतीही गोष्ट; मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत, कालांतरानं अशी महाकाय होत असते व आयुष्यातल्या कठीण वेळा सहज दूर करते!
*आपण निस्वार्थपणे केलेलं कुठलंही सत्कार्य*
*कधीच वाया जात नाही…*
*केव्हा ना केव्हा आयुष्याच्या*
*कुठल्यातरी टप्प्यावर ते तुम्हाला*
*त्याचं फळ देऊन जातं…!* नमस्कार good morning all 🤗
No comments:
Post a Comment