जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मतदान केंद्रांना भेट
मतदान केंद्रावरील सोयी-सुविधांचा घेतला आढावा
मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करा जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्त सूचना
मुंबई, दि.19 : मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाची भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून तेथील सुविधांचा आढावा घेतला. निवडणूक संबंधित सर्व अधिकारी यांच्याशी संवाद साधला.
यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसूंदर सुरवसे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. यादव म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास मतदारांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी,पंखे आदी किमान सुविधा यादृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व देखभाल दुरुस्त्या करुन घ्याव्यात. मतदान केंद्रावर ठळक अक्षरात येथील सुविधांचा फलक मतदार केंद्र क्रमांक, दिशादर्शक लावावेत. आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जेष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचे वय 85 वर्षापेक्षा अधिक आहे, असे नागरिक व दिव्यांग मतदार यांच्यासह निवडणूक कर्तव्यानिमित्त नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यपध्दती विहित करुन दिली आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणताही मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहू नये यादृष्टीने ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले व दिव्यांग मतदारांना गृह मतदान करता येणार आहे. गृह मतदानासाठी नमुना 12-ड तत्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
मतदार नोंदणी झालेल्या प्रत्येक मतदाराला सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठ्यांचे वितरण करावे व नागरिकांना मतदान केंद्राविषयी माहिती उपलब्ध करुन द्यावी. ज्या मतदारांचा संपर्क होत नाही त्यांना दूरध्वनी,एसएमएस,व्हाट्सअप अशा माध्यमातून संपर्क करावा आणि मतदार केंद्राची माहिती दयावी. कोणत्याही प्रकारची मतदारांची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आदेशही श्री. यादव यांनी यावेळी दिले.
श्री. यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील परिसरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दरम्यान नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना मतदान स्लीप मिळाली का? मतदान केंद्र कुठे आहे? याबाबत विचारणा केली. अनेक मतदारांनी जिल्हाधिकारी श्री.यादव यांच्याशी संवाद साधला मतदानदिवशीचा अनुभव सांगितला त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी तिथेच आवश्यक सूचना दिल्या.
सर्व मतदान केंद्रांवरील संबंधित नोडल अधिकारी यांना मतदान जनजागृती उपक्रम विविध माध्यमातून राबवून मतदानांचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा असेही यावेळी सांगितले.
आज दिवसभरात कुलाबा, मलबारहील, मुबांदेवी, वरळी,शिवडी,आणि भायखळा या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी भेट दिली.
No comments:
Post a Comment