१लाख २१ हजार युवक, युवतींना उद्योग, कॉर्पोरेट
संस्थांमध्ये रोजगारासाठी सामंजस्य करार
उद्योगांनी आता कौशल्य प्रशिक्षणासाठी पुढाकार घ्यावा
– राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.
मुंबई, दि. 16 : राज्यातील युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आज राज्यातील ४४ नामांकित उद्योजक, कॉर्पोरेट संस्था, औद्योगिक संघटना, प्लेसमेंट एजन्सिज यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या करारामार्फत राज्यातील 1 लाख 21 हजार युवक, युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या सामंजस्य करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच उद्योगांनी आता त्यांच्याकडे आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचे स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, यातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ सुलभतेने मिळू शकेल, असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह उद्योजक, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चालू आर्थिक वर्षात राज्य शासनाने 5 लाख बेरोजगार युवक, युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार मेळाव्यामार्फत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. यासाठी औद्योगिक आस्थापना, प्लेसमेंट एजन्सी यांच्यासमवेत वेळोवेळी समन्वय साधणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने भविष्यातील रोजगार मेळाव्यांचे प्रभावीपणे आयोजन होण्यासाठी आज हे सामंजस्य करार करण्यात आले. या कराराद्वारे राज्यातील बेरोजगार युवक, युवतींसाठी आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी), मीडिया अँड एन्टरटेनमेंट, बांधकाम, रिटेल, बँकींग, एव्हीएशन इत्यादी विविध क्षेत्रामध्ये दहावी पास, नापास, बारावी, पदवीधर, पदविकाधारक, फार्मसी, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग पदवी इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. इथे आयटीआयपासून आयआयटीपर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणविषयक सुविधा आहेत. राज्य शासनाने नुकतेच कौशल्य विद्यापीठही सुरु केले आहे. युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कौशल्य विकास विभागाने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. उद्योजकांनी या कामात सहभाग घेऊन आज झालेल्या सामंजस्य करारांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करावी. सर्वांनी मिळून देशाच्या विकास प्रक्रियेत हातभार लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
नोकऱ्या देणारे हात निर्माण करुया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नोकऱ्या घेणाऱ्यांबरोबरच नोकऱ्या देणारे हात देखील निर्माण करावे, असे स्व. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत असत. आजच्या कार्यक्रमातून १ लाख २१ हजार बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा संकल्प आपण केला आहे. नजिकच्या काळात राज्यात मोठे उद्योग येतील व त्याद्वारे राज्याच्या विकास प्रक्रियेला अजून गती प्राप्त होईल. राज्य शासन त्यादृष्टीने व्यापक काम करत असून प्रधानमंत्र्यांनीही यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात अनेक उद्योगांनी गुंतवणुक सुरु केली आहे. शासनामध्येही भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली असून याद्वारे ७५ हजार नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment