कौशल्य विकास , रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र चेंबरमध्ये सामंजस्य करार
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून नोकरी मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे, जिल्हास्तरीय रोजगार मेळावे आयोजित करणे, कौशल्य विभागाच्या सहकार्याने गाव पातळीवर एक हजार कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे.
राज भवन येथे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता, पर्यटन आणि महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये रोजगार मेळावे, कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, आयटीआयच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येऊन तरुणांना रोजगार देण्याचे काम केले जाते. राज्यातील ५८९ आयटीआयला अद्यायावत करण्यात येणार आहे. राज्यातील 1000 गावांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तरुणांना काम देण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असून राज्यातील व्यापार उद्योगांचा विकासासाठी व तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने सरकार चांगले काम करत आहे. महाराष्ट्र चेंबर व कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे उद्योग क्षेत्राचा विकास होऊन तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व महाराष्ट्र चेंबर यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराने राज्यातील व्यापार उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल, नवीन उद्योजक तयार होतील. महाराष्ट्र चेंबर राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका साकारेल असे प्रतिपादन केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात उद्योगांना आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ मिळावे यासाठी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम कौशल्य विकास विभाग करत आहे. शेती क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्राला जोडल्यानंतर चांगले काम होईल व राज्याचा आणि व्यापार उद्योग क्षेत्राचा स्थिर विकास होईल. व्यापार, उद्योग वाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्यातील व्यापार, उद्योगांच्या विकासासाठी व तरुणांना रोजगार मिळण्याच्या हेतूने महाराष्ट्र चेंबर तर्फे विविध उपक्रम व कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येत असते. कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता आणि नाविन्यता विभागासमवेत झालेल्या या सामंजस्य कराराने महाराष्ट्र चेंबर या विभागाच्या सहकार्याने राज्यात जिल्हास्तरावर व गावपातळीवर तरुणांसाठी रोजगार मेळावे, कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून कौशल्य विकासासाठी उत्कृष्ट काम करण्यात येईल. तसेच राज्यात महिला उद्योजकता अभियान व उद्योगवृद्धी यात्रेच्या माध्यमातून महिला व तरुणांना प्रशिक्षण देणे, उद्योग करण्यास मार्गदर्शन, शासनाच्या योजनांची माहिती देण्याचे काम करणार असल्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान श्रीमती मनीषा वर्मा यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी आभार मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरच्या महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन सौ. संगीता पाटील, एमएसएमई समितीचे चेअरमन प्रकाश शहा, स्किल कौन्सिल समितीचे को चेअरमन स्वप्निल शहा, कार्यकारिणी सदस्य नितीन धूत, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment