Saturday, 12 March 2022

 सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प

 नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे

· राज्यातील पायाभूत सुविधा विकासासाठी भरीव तरतूद.

            मुंबई, दि. ११ : राज्यातील सर्व क्षेत्रांचा विचार करून शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा विकास, विद्यार्थी, महिला, बालविकास, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी बांधव, पोलिस अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. राज्यातील पायाभूत सुविधा विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. अशी प्रतिक्रिया नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            नगरविकास विभागाने गेल्या दोन वर्षांत एमएमआरडीए, सिडको, पीएमआरडीए यांसारख्या यंत्रणांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आदी क्षेत्रात अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. विभागासाठी जवळपास पावणे नऊ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.. राज्यभरात समृद्धी महामार्गासह अनेक महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. कोकण एक्स्प्रेस -वेसारखा नवा प्रकल्प हाती घेतला जाणार असून त्यासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाला हातभार लागेल, नवे उद्योग येतील, रोजगार निर्मिती होईल, पर्यटन विकास होईल आणि आर्थिक सुबत्ता वाढणार आहे, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

            गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस बांधवांना मिळणाऱ्या विशेष भत्त्यात वाढ केल्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. सैन्य दलाच्या धर्तीवर अतिसंवेदनशील भागातील पोलिसांसाठी विशेष रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात कौशल्यविकासावर अर्थसंकल्पात विशेष भर दिला आहे. एकंदरीत कोविड आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झालेला असतानाही राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

०००० 

वृत्त क्र. 810

अर्थसंकल्पातील विकासाची पंचसूत्रीराज्याला प्रगतीपथावर नेईल

- जलसंपदा मंत्री जयंत पाटील.

            मुंबई, दि. 11 : कृषी, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांवर भर देणारा राज्याचा सन 2022-23 चा अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

            उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी राज्याचा सन 2022-23 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील तरतुदींचे जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांनी स्वागत केले आहे.

            जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांसाठी करण्यात आलेली भरीव तरतूद अतिशय महत्त्वाची आहे. या अर्थसंकल्पात येत्या वर्षभरात १०४ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पासाठी सुमारे 840 कोटी रुपयांची करण्यात आलेली तरतूद विदर्भाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

            कोयना, जायकवाडी आणि गोसीखुर्द धरणाच्या जलाशयात जलपर्यटन प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून या भागातील रोजगाराला चालना मिळेल असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

            आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची आहे. महिलांच्या आरोग्यासाठी राज्यातील सोळा जिल्ह्यात शंभर खाटांचे महिला रुग्णालये उभारण्याचा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, असे श्री जयंत पाटील यांनी सांगितले.

            राज्यातीलऔद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी करण्यात आलेली तरतूद गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मनुष्यबळ विकासासाठी इनोव्हेशन हब उभारणीसाठी पाचशे कोटी आणि स्टार्टअप फंडसाठी शंभर कोटी रुपयांची करण्यात आलेली तरतूद अतिशय स्वागतार्ह असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.

            पर्यटनाच्या विकासासाठी नवीन प्रकल्पांची सुरूवात करण्याचा संकल्प महत्वाचा आहे. पुणे वन विभागातील बिबट्या सफारी आणि बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा उद्यानातील आफ्रिकन सफारी सुरू करण्याचा मानस चांगला आहे, असे श्री जयंत पाटील यांनी सांगितले.

            कृषीसाठी करण्यात आलेली तरतूद शेती आणि संलग्न क्षेत्राला चालना देणारी ठरेल. येत्या वर्षभरात साठ हजार वीज पंपांना जोडण्या देण्याचे करण्यात आलेले नियोजन शाश्वत सिंचनासाठी अतिशय महत्त्वाचे ठरेल. ग्राम विकास आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी अर्थ संकल्पात करण्यात आलेली तरतूद निश्चितच चांगली आहे, असे श्री जयंत पाटील यांनी सांगितले.

            दळणवळणाच्या सुविधा विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या अर्थसंकल्पात रस्ते, रेल्वे, मेट्रो विकासासाठी करण्यात आलेली तरतूद राज्यातील प्रगतीला चालना देईल, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi