महिला व बालविकास विभागातील पदभरतीचे
निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी
- मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि.१६ : महिला व बालविकास विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेला वेग देण्यात यावा. विशेषतः वर्ग ३ व ४ च्या सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भात परीक्षांचे निकाल तातडीने जाहीर करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.
पदभरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख तसेच सहसचिव वि. रा. ठाकूर, उपायुक्त गिरासे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, विभागातील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षा निकाल अंतिम टप्प्यात असून, निकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदे भरून सेवा वितरण अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी भरती प्रक्रिया पारदर्शक, वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देत, निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाला अधिक बळकटी मिळणार असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही गुणवत्ता वाढणार आहे.
०००