भारतामध्ये जगातील दुसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम विकसित होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले., भारताकडे सर्वात मोठी युवा शक्ती आहे. तिरंगा हातात घेऊन बाहेर पडणाऱ्या या तरुणाईला थांबवण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही. भारत एक मोठी महासत्ता म्हणून उदयास येत आहे.
भारताची प्रगती काही शक्तींना खटकत आहे. काही परकीय शक्ती भारताची घोडदौड थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भारताचा विकासाचा प्रवास कोणीही थांबवू शकणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या नवभारताच्या संकल्पनेतून आगामी काळात भारत विकसित राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर अग्रस्थानी दिसेल,असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
या रॅलीसाठी वरळी सी फेस येथे हजारो मुंबईकर एकत्र आले होते. तिरंगा ध्वज हातात घेतलेले नागरिक, युवक, विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट्स यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता. ‘भारत माता की जय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांसह देशभक्तीपर गीतांनी वातावरण दुमदुमून गेले.