Friday, 12 July 2024

अवसायनातील आणि नोंदणी रद्द झालेल्या उपसा सिंचन संस्थांची थकीत मुद्दल कर्ज माफीचा प्रस्ताव

 अवसायनातील आणि नोंदणी रद्द झालेल्या

उपसा सिंचन संस्थांची थकीत मुद्दल कर्ज माफीचा प्रस्ताव

– सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

 

            मुंबईदि. 11 : अवसायनात गेलेल्या आणि नोंदणी रद्द झालेल्या सहकारी तत्वावरील उपसा सिंचन योजनांचे थकीत मुद्दल कर्ज माफीचा प्रस्ताव तयार केला असून तो मंत्रिमंडळासमोर सादरीकरणाची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

            सदस्य ॲड. माणिकराव कोकाटे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

            मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले कीराज्यातील शेतकऱ्यांनी त्यांची शेती सिंचनाखाली आणण्यासाठी सहकारी तत्वावर उपसा सिंचन संस्थांची स्थापना केली आहे. या संस्थाचा प्रकल्प खर्च जास्त प्रमाणात असल्यामुळे लाभधारक सभासदांवरील खर्चाचा भार कमी करुन तो काही प्रमाणात शासनाने उचलावा या उद्देशाने सहकार विभागामार्फत सहकारी उपसा जलसिंचन योजनांना अर्थसहाय्य राबविण्यात येत असून संस्थांच्या प्रकल्प खर्चाच्या 25 टक्के किंवा रुपये एक कोटी यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदानाच्या स्वरुपात सहकारी संस्थांना देण्यात येते.

            मंत्री म्हणाले कीराज्यात सध्या एकूण 2659 नोंदणीकृत सहकारी उपसा जलसिंचन संस्था आहेत. त्यापैकी 215 उपसा सिंचन सहकारी संस्थांची कर्जाची थकबाकी आहे. या 215 संस्थांपैकी 97 संस्था कार्यरत आहेत. तथापिकाही संस्था या आर्थिक अडचणीत आल्याने अशा 67 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली असून 51 संस्था अवसायनात आहेत. त्याअनुषंगाने राज्यातील अडचणीतील व अवसायनातील तसेच नोंदणी रद्द झालेल्या सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे / योजनांचे थकीत कर्ज (मुद्दल) माफ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला होता. कुंडलवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.कुंडलवाडीता. बिलोलीजि. नांदेड या संस्थेच्या दोन योजनांचे थकीत कर्ज (मुद्दल) आणि  श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्या.ता. वैजापूरजि. छत्रपती संभाजी नगर या संस्थेच्या चार योजनांचे थकीत कर्ज (मुद्दल) माफ करण्यास आणि हे कर्ज (मुद्दल) रक्कम संबंधित बँकांना शासनामार्फत अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या बैठकीमध्ये राज्यातील अन्य सहकारी उपसा  जलसिंचन संस्थांकडील थकीत कर्ज (मुद्दल) माफ करण्याबाबत धोरण तयार करण्यास शासनाच्या मान्यतेबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने विभागामार्फत कार्यवाही सुरू आहे. गोदावरी उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्या बारागाव पिंप्रीता. सिन्नर या संस्थेचा या प्रस्तावात समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.

            सदस्य प्राजक्त तनपुरे आणि विनय कोरे यांनी या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला.

१० वी, १२ वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन मिळणार

 १० वी१२ वीच्या परीक्षेचे 

हॉल तिकीट ऑनलाईन मिळणार

           

            मुंबई दि ११ : माध्यमिक (10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे  यांनी दिली आहे.

            विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा /महाविद्यालयाशी संपर्क साधून हॉल तिकीट प्राप्त करावेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करून मिळणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक/ प्राचार्यांचा शिक्का देणार असूनयासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.  हॉल तिकीटामध्ये विषय व माध्यम बदलफोटोस्वाक्षरीविद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरूस्त्या असतील तर विद्यार्थ्यांनी त्वरीत शाळेस/महाविद्यालयास कळवावे. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची पुन्हा प्रिंट काढून दुय्यम प्रत (डुप्लीकेट) असा उल्लेख करून प्रवेशपत्र उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव शैलेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.

अतिवृष्टीमुळे अनुपस्थित उमेदवारांकरिता १३ जुलैला मराठी, इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी

 अतिवृष्टीमुळे अनुपस्थित उमेदवारांकरिता १३ जुलैला

मराठीइंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी

 

            मुंबईदि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ८ जुलै २०२४ रोजी आयोजित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अतिवृष्टीमुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांकरिता मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी आता १३ जुलै२०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

             ८ जुलै२०२४ रोजी मुंबई परिसरात अतिवृष्टी झाल्याने वाहतुकीच्या साधनांवर परिणाम झाला होता. परिणामी या दिवशी चाचणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहता यावे याकरिता चारही सत्रांची कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा ४५ मिनिटे उशिराने सुरु करण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता. तरीही अतिवृष्टीमुळे अनेक उमेदवारांना चाचणीसाठी उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे ८ जुलै२०२४ रोजी मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना संधी देण्याच्या दृष्टीने टंकलेखन कौशल्य चाचणी पुन्हा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

             या मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी १३ जुलै२०२४ रोजी तिसऱ्या व चौथ्या सत्रात आयोजित करण्यात येणार आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहीत करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील प्रवेशप्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येणार असूनसर्व उमेदवारांनी नोंद घ्यावीअसे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे.

पुण्यातील अपघात प्रकरणी पोलिसांमार्फत वेळेत गुन्हा दाखल

 पुण्यातील अपघात प्रकरणी 

पोलिसांमार्फत वेळेत गुन्हा दाखल

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. 11 : पुणे येथील कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर 19 मे 2024 रोजी पहाटे 2.30 वाजता झालेल्या अपघात प्रकरणी पोलिसांनी सकाळी 8.13 वाजता गुन्हा नोंदविला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी यात सक्रियतेने कार्यवाही केली असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

            विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या घटनेत पुणे पोलीस आयुक्तांसह दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळेसतेज पाटीलशशिकांत शिंदेकिरण सरनाईक आदींनी सहभाग घेतला.

            या घटनेसंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीही घटना पहाटे 2.30 वाजता घडली असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतचा गुन्हा सकाळी 8.13 वाजता नोंदविण्यात आला. यामध्ये प्रारंभी 304 (अ) या कलमाची नोंद करण्यात आली. तथापि सकाळी 10.30 वाजता वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर त्यांनी यात बदल करून या कलमाऐवजी 304 हे कलमांतर्गत गुन्हा नोंद केला. आरोपीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याने बाल न्यायालयासमोर प्रकरण नेण्यात आले. तेथे देखील 304 या कलमाचीच नोंद असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी आरोपीची तातडीने वैद्यकीय तपासणी केली नसल्याबद्दल पोलीस निरीक्षकांवर कारवाई केली असून पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सक्रियतेने कार्यवाही केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता नसल्याचेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रकरणी आरोपीचे रक्त नमुने बदलण्यात सहभागी असलेल्या डॉक्टरवर तसेच ड्रायव्हरला गुन्ह्याचा आरोप स्वत:वर घेण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी आरोपीचे वडील आणि आजोबांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            या घटनेनंतर पुण्यातील अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करण्यात येत असून इतर पब आणि बार वेळेवर बंद होतात किंवा नाही यावर देखरेखीसाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेवर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी नियमावली तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव पाचोरा रोडवरील रामदेववाडी गावाजवळ 7 मे 2024 रोजी घडलेल्या अपघात प्रकरणी तपास करण्यास विलंब लागल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरया घटनेत जमावाने आरोपींना मारहाण केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यास्तव विलंब लागल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

0000 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करणार

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे

काम त्वरीत पूर्ण करणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. 11 : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. पुतळ्याचे प्रारुप (मॉडेल) सुद्धा मान्य झाले आहे. तथापि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्मारकातील हा पुतळा भव्य असल्याने त्यासाठी वेळ लागत आहे. स्मारकाचे हे संपूर्ण काम लवकर पूर्ण करण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

            सदस्य विजय उर्फ भाई गिरकर यांनी परळ येथील बीआयटी चाळीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या जागेत स्मारक उभारण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला. चर्चेदरम्यान इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.

            मूळ प्रश्नावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले कीबीआयटी चाळ क्रमांक १ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या खोली क्र. ५० व ५१ येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुसाध्यता अहवाल प्राप्त करून पुढील आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. या अनुषंगाने मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन तेथे सध्या राहत असलेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

00000

अंगणवाड्या उभारणी, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतुदीसाठी प्रस्ताव तयार करणार

 अंगणवाड्या उभारणीदुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात

तरतुदीसाठी प्रस्ताव तयार करणार

- मंत्री आदिती तटकरे

             मुंबईदि. 11 : अंगणवाड्या उभारणी तसेच दुरुस्तीसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव महिला व बाल विकास विभागामार्फत तयार करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितली.

            याबाबत सदस्य मोनिका राजळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीअंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेच्या खोल्या उपलब्ध करून देण्याबाबत महिला व बालविकास विभागाने ग्रामविकास विभाग व शालेय शिक्षण विभागास प्रस्ताव पाठवला असून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील 22 हजार 500 अंगणवाड्यांचा इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोगजिल्हा परिषदेचा निधीडोंगरी विकास निधी,जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अंगणवाड्यांची दुरुस्ती तसेच नवीन बांधकाम केली जात आहेत. अंगणवाड्यांमधील शौचालयाकरिता केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार 375 अंगणवाड्यांपैकी चार हजार 65  अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत आहे. अहमदनगर जिल्ह्यात 15व्या वित्त आयोगाने जिल्हा परिषद विकास आराखडा मध्ये 98 अंगणवाडी बांधकामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

****

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद

 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनातील

फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद

- मंत्री गिरीश महाजन

            मुंबईदि. ११ : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उद्योगउर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार किमान वेतन लागू करण्यात आले आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतनातील फरकाची रक्कम प्रदान करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

                  याबाबत सदस्य सुनील भुसारा यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये ओमप्रकाश उर्फ बच्चू कडूनाना पटोलेदीपक चव्हाण, सुरेश वरपूडकर यांनी सहभाग घेतला.

               मंत्री श्री. महाजन म्हणाले कीग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व आकृतीबंधाबाबत शिफारस करण्यासाठी यावलकर समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवाल  वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीचे उत्त्पन्न व लोकसंख्येचा विचार करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी सहाय्यक अनुदानाच्या हिस्साची टक्केवारी ठरविण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम नियमानुसार जमा करण्यात येत असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली असून अनुदानही वेळोवेळी देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

*****

Featured post

Lakshvedhi