सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 21 September 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉटसॲप चॅनेलवर! योजना, निर्णयांची अचूक, अधिकृत माहिती मिळणार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉटसॲप चॅनेलवर!
योजना, निर्णयांची अचूक, अधिकृत माहिती मिळणार…
मुंबई, दि. २० : 'जनसामान्यांचे मुख्यमंत्री', अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉटसॲप चॅनेलचा श्री गणेशा करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, पाच विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
जगभरात संवादाचे प्रभावी व उपयुक्त माध्यम ठरलेल्या ‘व्हॉटसॲप’ने चॅनेलच्या माध्यमातून नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असून त्यावर काल (19 सप्टेंबर), मुख्यमंत्री सचिवालयाचे स्वतंत्र चॅनेल सुरु करण्यात आले आहे. प्रमाणित असलेल्या या चॅनेलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चॅनेल सुरु केल्यानंतर काही वेळेतच सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी चॅनेलला फॉलो केले आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ही अंमलबजावणी करताना शासनाच्या योजना तसेच निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचल्यास त्यांना त्याचा लाभ घेता येईल यासाठी लोकाभिमुख योजना, विकास प्रकल्पांची अचूक आणि वस्तूनिष्ठ माहिती, जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ‘हे सर्वसामान्यांचे सरकार’ असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सदैव जनतेपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे, आता हातातील स्मार्ट फोनवर थेट मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची, शासकीय योजनांची माहिती मिळत असल्याने हा संवाद अधिक प्रभावी होणार आहे.
मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षामार्फत जनतेला माहिती देण्यासाठी सध्या एक्स (ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम, यु ट्यूब, थ्रेडस, कू, टेलिग्राम आदी समाजमाध्यम तसेच इनस्टन्ट मेसेजिंग ॲपचा वापर केला जातो. व्हॉटसॲपने गेल्या आठवड्यात चॅनेलची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयाने कंपनीकडे संपर्क केला आणि ‘CMO Maharashtra’ या नावाने स्वतंत्र, प्रमाणित चॅनेलचा काल ‘श्रीगणेशा’ करण्यात आला आहे. या चॅनेलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काही तासांतच सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी या चॅनेलचे अनुसरण केले आहे.
चॅनेलला असे करा फॉलो :
व्हॉटस ॲपवरील ‘अपडेट्स’ मेनूमध्ये गेल्यावर तिथे चॅनेल सेक्शन असून तिथे ‘Find channels’ मध्ये ‘CMO Maharashtra’ हे टाइप केल्यावर चॅनेलच्या यादीमध्ये हे प्रमाणित चॅनेल दिसेल, त्याला क्लिक करुन फॉलो केले की तुम्हाला सर्व अपडेट्स विनासायास उपलब्ध होणार आहेत. https://whatsapp.com/channel/0029Va4FQfl72WTydH1lnP3h या लिंकवर व्हॉटसॲपधारकांनी क्लिक केल्यास ‘CMO Maharashtra’ चॅनेलला फॉलो करता येणार आहे.
००००
खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत
खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत
मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.
खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार, कारागीर व बलुतेदारांच्या उद्योगाचे स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृद्धी करणे तसेच कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण देणे, तयार मालाच्या विक्रीस मदत करणे इत्यादी कामे प्रामुख्याने केली जात आहेत. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागिरांच्या जीवनमानामध्ये अमूलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे मुख्य ध्येय असून ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरिता मंडळ प्रभावी योजना राबवत आहे. मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांबाबत मंडळाचे सभापती श्री. साठे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार दि. 21 सप्टेंबर, 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक - https://www.facebook.com/
यू ट्यूब - https://www.youtube.co/
००००
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज मोहिमेतसहभागासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज मोहिमेतसहभागासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
मुंबई, दि. २० : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ मोहीम ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे, असे मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभाग व नावीन्यता विभागातर्फे स्टार्टअप धोरण जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या नव कल्पनांना मूर्तस्वरूप देण्यासाठी सोसायटीतर्फे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंतचे भांडवल मिळणार आहे. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नव संकल्पनांचा शोध घेणे व त्यांच्या उद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी पाठबळ पुरविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
ही स्पर्धा तीन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात संस्थांची नोंदणी व संस्थास्तरावर संकल्पनांची निवड, दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय सादरीकरण व संकल्पनांची निवड, तिसऱ्या टप्प्यात इन्क्युबेशन प्रोग्रॅमचा समावेश असेल. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे बक्षिसे मिळणार आहेत. त्यात तालुकास्तरावरील उत्तम तीन विजेत्यांना रोख पारितोषिक, जिल्हास्तरावरील सर्वोत्तम १० विजेत्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे बीज भांडवल, राज्यस्तरावर सर्वोत्तम १० विजेत्या नवउद्योजकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बीज भांडवल मिळेल. याशिवाय विशेष इन्क्युबेशन प्रोग्रॅम, इतर योजनांचा लाभ आणि शैक्षणिक संस्था आणि जिल्ह्यांना पारितोषिके मिळतील.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शासनाच्या www.msins.in अथवा www.schemes.msins.in या संकेतस्थळावर जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. सुरवसे यांनी कळविले आहे.
डेक्कन ओडिसी ट्रेन २.० पुन्हा नव्या रूपात धावण्यास सज्ज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी शुभारंभ
डेक्कन ओडिसी ट्रेन २.० पुन्हा नव्या रूपात धावण्यास सज्ज
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी शुभारंभ
मुंबई, दि. २० : आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० नव्या रुपात धावण्यास सज्ज झाली आहे. डेक्कन ओडिसी २.० या ट्रेनचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फलाट क्रमांक १८ येथे गुरूवार दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा, भारतीय रेल्वेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. मान्यवरांना घेवून ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे असा प्रवास करणार आहे.
देशातील प्रसिध्द ४ शाही रेल्वेपैकी एक असणारी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० ही नव्या रुपात पुन्हा पर्यटकांसाठी खुली होणार आहे. या ट्रेनमध्ये उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात येतात. सन २००४ ते २०२० पर्यंत या अलिशान व आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र, सध्या डेक्कन ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयीसुविधांनी पुन्हा पर्यटकांच्या सेवेकरिता सुरू होत आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातल्या अन्य राज्यामधील पर्यटन स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.
0000
मंत्री सुधीर मुनगंटीवार आता व्हॉटसॲप चॅनेलवर, व्हॉटसअप चॅनेल फॉलो करण्याचे आवाहन
मंत्री सुधीर मुनगंटीवार आता व्हॉटसॲप चॅनेलवर,
व्हॉटसअप चॅनेल फॉलो करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 20 : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आता राज्यातील जनतेशी थेट व्हॉटसॲपवरून जोडले गेले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या व्हॉटसॲप चॅनेलचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत असलेल्या तीनही विभागांचे महत्वाचे निर्णय, त्यांनी केलेली विविध कामे, संबंधित योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती, त्यांचे विविध कार्यक्रम, दौरे, बैठका यांची माहिती या व्हॉट्सअप चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहे.
समाजातील संवाद माध्यमांमध्ये नवीन तंत्रज्ञानानुसार वेगाने बदल होत असून सर्वसामान्यांचे संवादाचे प्रभावी माध्यम ठरलेल्या ‘व्हॉटसॲप’ने चॅनलच्या माध्यमातून संवादाचा नवीन मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
सोबत दिलेल्या दुव्यावरून आपल्या या चॅनेलला फॉलो करण्याचे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे. या चॅनेलवरून सोप्या पद्धतीने सर्व अधिकृत माहिती जनतेला थेट हातातील स्मार्टफोनवर मिळणार आहे.
या व्हॉट्सअप चॅनेलला केवळ स्वतःच्या व्हॉट्सअपवरून फॉलो करायचे आहे. त्यासाठी कुठलीही नोंदणी करण्याची आवश्यकता नसून आपला व्हॉट्सअप क्रमांकही व्हॉटसअपकडून गुप्त राखला जातो. शिवाय एका व्हॉट्सअप चॅनेलला किती लोकांनी फॉलो करावे यावरही व्हॉट्सअप ग्रुपसारखे काही बंधन नाही. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनेल हे अधिक मुक्त, स्वतंत्र आणि प्रभावी असे लोकप्रिय संवाद माध्यम ठरेल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
चॅनेलला असे करा फॉलो :
व्हॉटसॲपवरील ‘अपडेट्स’ मेनूमध्ये गेल्यावर तिथे चॅनेल विभागात हे चॅनेल आहे. त्याला क्लिक करुन फॉलो केले की तुम्हाला सर्व अपडेट्स विनासायास उपलब्ध होणार आहेत. https://whatsapp.com/channel/
Wednesday, 20 September 2023
आयुष्मान भव:’ मोहिमेतून होणार आरोग्य सेवांचा जागर
आयुष्मान भव:’ मोहिमेतून होणार आरोग्य सेवांचा जागर
केंद्र शासन देशभर 17 सप्टेंबरपासून आयुष्मान भव: मोहीम राबवीत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विविधस्तरावर आरोग्य विषयक सेवा देण्यात येत आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. देशभर मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी करण्यात आला. राज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमाचे मुंबईतही 13 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. ही मोहीम 31 डिसेंबर 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. आयुष्मान भव: शब्दाप्रमाणे सर्वांना सुदृढ आरोग्य मिळावे, या हेतूने शासन काम असून मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य सेवांचा जागर करण्यात येत आहे.
आयुष्मान भव: हा आशिर्वादरूपी शब्द आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे. या शब्दाच्या अर्थावरच ही मोहीम आधारित आहे. मोहिमेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 17 सप्टेंबरपासून झाला आहे. राज्यातही राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत मोहिमेचा कार्यारंभ करण्यात आला. मोहिमेदरम्यान क्षयरोग मुक्त भारत अभियान जोरकसपणे राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त निक्षय मित्र बनवून क्षयरोग मुक्त भारत अभियानाला बळ देण्यात येत आहे. देशभरात मोहिमेदरम्यान घेतलेल्या उपक्रमांची, कार्यक्रमांची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संकेतस्थळही विकसित केले आहे. मोहिमेची संपूर्ण माहिती डॅश बोर्ड स्वरूपात https:// ayushmanbhav. mohfw. gov. in/public/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर देशातील कुठल्याही जिल्ह्यातील माहिती उपलब्ध आहे.
मोहिमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्याच्या समारोपप्रसंगी 2 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
आयुष्मान आपल्या दारी 3.0 :
‘आयुष्मान आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आजपर्यंत संपूर्ण देशात 25 कोटी आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. या अनुषंगाने या उपक्रमामधून सर्व जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काळजी घेण्यात येत आहे. वैयक्तिकस्तरावर आयुष्मान कार्ड संपृक्तता प्राप्त करणे, आयुष्मान कार्डची छपाई आणि वितरण अशाप्रकारे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयुष्मान कार्ड वितरण मोहीम सुरू झालेली आहे.
आयुष्मान सभा :
हा उपक्रम गावपातळीवर आरोग्य सेवा सुविधांची जनजागृती करण्याकरीता ग्रामपंचायत व व्हीएचएसएनसी (व्हिलेज हेल्थ, सॅनिटेशन अॅण्ड न्युट्रीशन कमिटी) यांच्यामार्फत राबविण्यात येतो. या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट आयुष्मान कार्ड व आभा कार्डबाबत जनजागृती करणे, आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य आजार, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग आदीबाबत जनजागृती करणे, तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर मिळणाऱ्या सेवा सुविधांचे मूल्यमापन करणे हा आहे. या सभेद्वारे आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करणे, प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची व प्रत्यक्षात लाभ घेतेलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करणे, संलग्न रुग्णालयांची यादी प्रसिद्धी देणे, असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, आयुष्मान कार्ड व आभा कार्ड यांची जनजागृती करण्यात येत आहे. आयुष्मान भव: मोहिमेमध्ये 'निरोगी गावे' आणि 'निरोगी ग्रामपंचायती' निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे. ज्या पंचायती आरोग्य योजना यशस्वीपणे पूर्ण करतात, त्यांना 'आयुष्मान ग्रामपंचायत' किंवा 'आयुष्मान अर्बन वॉर्ड' म्हणून सन्मान देण्यात येणार आहे, जे त्यांच्या न्याय आरोग्य सेवेच्या तरतुदीच्या समर्पणाचे प्रतीक आहे.
आयुष्मान मेळावा :
आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवार किंवा रविवारला संकल्पनेनुसार उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजारांविषयी तपासणी, दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग आणि अन्य संसर्गजन्य आजारांची तपासणी, तिसऱ्या आठवड्यात माता व बाल आरोग्य, पोषण आहार व लसीकरण, चौथ्या आठवड्यात डोळ्यांची तपासणी व डोळ्यांचे आरोग्य ही संकल्पना असणार आहे. या मेळाव्यादरम्यान आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करण्यात येणार आहे. सर्व समावेशक आरोग्य सेवा, आयुष, मानसिक आरोग्य, वाढत्या वयातील आजार व उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा, योगा व वेलनेस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी तसेच टेलीकन्सल्टेशन सेवा देण्यात येत आहेत.
सामुदायिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्फत आठवड्याला किमान एक आरोग्य मेळाव्याचे आयोजनही करण्यात येणार आहे. या मेळाव्यात तज्ज्ञ सेवांपासून वंचित रुग्णांना सेवा पुरविण्यात येणार आहे. तसेच ज्या तालुक्यांमध्ये तज्ज्ञ सेवांचा अभाव आहे, अशा तालुक्यांमध्ये रुग्णांना तज्ज्ञ सेवांचा लाभ देण्यात येणार आहे.
अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी
या उपक्रमांतर्गत सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. मुलांची 32 सामान्य आजारांची वेळेवर तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार मुलांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मोहिमेत रक्तदान शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे. अशाप्रकारे राज्यात 17 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आयुष्मान भव : मोहिमेतून 31 डिसेंबरपर्यंत आरोग्यविषयक सेवांचा जागर सुरू आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...