Monday, 18 September 2023

बेडेकरांच्या फ्रोजन उकडीच्या मोदकांची जाहिरात

 📚            वाचनीय              📚


बेडेकरांच्या फ्रोजन उकडीच्या मोदकांची जाहिरात पाहिली.त्यात म्हटल्याप्रमाणे, त्यांच्या कंपनीने गेल्या वर्षी एकट्या अमेरिकेत सव्वा लाख मोदक अमेरिकेला निर्यात केले. ऐकून बरं वाटलं. गिरगावातल्या सदाशिव गल्लीत उघडलेल्या एका साध्या दुकानाची ही परदेशातील झेप पाहून आनंद वाटला.एके काळी किराणा मालाची विक्री करणारे बेडेकर काळाची पावले ओळखून मसाला,लोणचे क्षेत्रात शिरले आणि आपल्या दर्जेदार उत्पादनांनी लोकांच्या जीभेचे चोचले पुरवत एका आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले हे अभिमानास्पद आहे. आपल्या या  यशोगाथेची कथा खुद्द  वासुदेव विश्वनाथ बेडेकर यांनी  ' बेडेकर जीवन वृत्तांत ' या पुस्तकात 📖सांगितली आहे. २६ जानेवारी १९६१ साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाची किंमत होती ४ रुपये.


त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे स्वातंत्र्य पूर्व काळात बेडेकर कुटुंब कोकणातून मुंबईमध्ये चरितार्थासाठी आले. गिरगावातल्या सदाशिव गल्लीत विश्वनाथ बेडेकरांनी  दुकान उघडलं. त्यावेळी त्यांची  गिऱ्हाईक म्हणजे नवी वाडीपासून खेतवाडीपर्यंत स्वतःच्या घरात राहणारी सधन व खानदानी अशा पाठारे प्रभु, खत्री,सारस्वत,, पाचकळशी वगैरे ज्ञातीतील होती. त्यावेळची दुकानदारीची पद्धत म्हणजे दररोज सकाळच्या वेळी विश्वनाथराव   गिऱ्हाईकांच्या घरोघरी जाऊन त्यांना हव्या असलेल्या मालाची यादी आणायचे  व तो माल त्यांना नंतर घरी पोहचवायचे.म्हणजे होम डिलिव्हरीची पद्धत तेव्हापासून आहे असं म्हणण्यास हरकत नाही. पुढे ते दुकान बंद करून  त्यांनी शांतारामाच्या चाळीत नवीन दुकान उघडलं.


काही दिवसांनी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव वासुदेवराव दुकानात बसू लागले.ते महत्त्वाकांक्षी होते. त्यांनी पाहिलं की नुसतं किराणा माल विकून आपल्या धंद्याची प्रगती होणार नाही, त्यासाठी निराळं काही तरी करावं लागेल. त्यांनी मसाला बनवून तो विकायचं ठरवलं. त्यांचा हा  मसाले कुटून विकण्याचा धंदा त्यांच्या वडिलांना-दादांना-- रुचत नव्हता. कारण  त्याकाळात वस्तू तयार करून विकणे, हे एक प्रकारचे कमीपणाचे समजले जाई. हाँटेल, खानावळी हे जसे वस्तू तयार करून विकतात तसेच हे दादांना वाटे. त्यांना हे पसंत नाही, म्हणून सुरुवातीला दादा बाहेर गेले असतील अशावेळीच ते गोडा मसाला शेर दीड शेर कुटून ठेवीत असत. त्यांच्या या मसाल्याचा सुगंध आसमंतात दरवळला. मग लोकांची पाऊलं आपोआप त्यांच्या दुकानाकडे वळू लागली. खास मसाला विकत घेण्यासाठी दुकानात येऊ लागले. परंतु दादांचा या धंद्याला विरोध असल्यामुळे ते दुकानात नसतानाच मसाल्याची विक्री होई. ते असताना गिऱ्हाईक आल्यास त्यांची पंचाईत होई आणि विनोदी परिस्थिती निर्माण होई. दादा असले, की वासुदेवराव मसाला आम्ही विकत नाही म्हणून सांगायचे. पण गिऱ्हाईक म्हणत, "नाही कसा, मी परवा तर नेला होता." तेव्हा ' पूर्वी करत होतो आता आम्ही मसाला करीत नाही' ' असं सांगून ते वेळ मारून न्यायचे. पण पुढे मसाल्याच्या खपाचं प्रमाण वाढू लागल्यावर तसे म्हणणेही जमेना. काळाची पावले ओळखून त्यांनी आपल्या मालाची जाहिरात करण्याचं ठरवलं. त्याकाळच्या'  लोकमान्य ' दैनिकात दररोज 'बेडेकर मसाल्या'ची  जाहिरात प्रसिद्ध होऊ लागली. परंतु ती जाहिरात दादांच्या वाचनात आल्यानंतर , त्यांनी हा निष्फळ प्रयत्न असल्याचं सांगितलं.आता  दादा दुकानात असतानाही ते मसाला विकू लागले. त्यामुळे पितापुत्रात खटके उडू लागले. शेवटी १९२१ साली दादा रागाने  गावी गेले. त्यामुळे वासुदेवरावांना वाईट वाटलं. पण आपला  निर्णय धंद्याच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे, याबाबत त्यांना खात्री वाटत होती.आणि खरोखरच त्यांना मसाल्याच्या धंद्याने हात दिला.' मसालेदार ' यश दिलं !


बेडेकरांचा लोणच्याच्या धंद्यातील प्रवेश हा अनपेक्षितरित्या झाला.

एकदा वासुदेवराव तापाने आजारी होते. तापात होतं तसं त्यांच्या तोंडाची चव अजिबात गेली होती. त्यामुळे काहीतरी आंबट असं लोणचं  खाण्याची इच्छा झाली. परंतु मागणार कोणाकडे ? एके दिवशी त्यांचे मित्र दाबके यांनी अगदी थोडं  जुनं व मुरलेलं  लिंबाचं लोणचं आणून दिलं‌. ते अधूनमधून खात त्यांनी  महिनाभर पुरवलं. यावेळी त्यांच्या डोक्यात  कल्पना आली की ,कोणाला जर असं लोणचं  खाण्याची इच्छा झाली तर त्याला मिळायची सोय काय ? बाजारात लोणची मिळत पण ती काही खास नसत. झालं !  वासुदेवरावांनी मसाल्याबरोबर  लोणचीही बनवायचं हे मनोमनी ठरवलं. सुरुवात करावी, म्हणून दोनशे लिंबे आणून लोणचं बनवलं. ते हातोहात खपलं.बेडेकरांचं लिंबाचं लोणचं लोकांच्या पसंतीस पडलं. तसचं यश पुढे त्यांना आंब्याच्या लोणच्याच्या धंद्यातही मिळालं. याही क्षेत्रात असाच अनपेक्षितपणे त्यांचा प्रवेश झाला.

एक दिवस दुकानात असताना त्यांच्याकडे विनायकराव फडके नावाचे गृहस्थ आले. त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी भेट देण्यासाठी म्हणून गावावरून १५-२० हिरवे कच्चे  आंबे आणले होते.पण ज्यांना ते द्यायचे होते ते गृहस्थ न भेटल्यामुळे परत  गावी जातेवेळी  त्यांनी  'ते आंबे तुम्हालाच ठेवा 'असं म्हणून ते वासुदेवरावांकडे दिले. या कल्पक माणसाने  त्या आंब्याचे  लोणचं घातलं व ते विकायला ठेवलं. या नवीन उत्पादनानेही मुंबईकरांची मने जिंकली. त्या १९२२ च्या चैत्रात त्यांनी सुमारे दोन मण लोणचं घातलं आणि  ते लोणचेही लोकांना आवडून त्याचाही खप झाला. मसाला, लोणचं यामार्गे बेडेकरांनी गृहिणींच्या घरात व मनात प्रवेश केला. मग काय आजतागायत हे बेडेकरांचं लिंबाचं आणि आंब्याचं लोणचं लोकांच्या सेवेसी तत्पर आहे.  


या धंद्यात तशी मेहनतही होती. सुरुवातीला दोन चार वर्षे ते  चर्नीरोड अगर नळबाजार येथेच आंबे विकत घेत. पुढे काही वर्षानंतर भायखळ्याहून आंबे आणून त्याचे लोणचे बनवण्यास सुरुवात केली. तेथे जायला पहाटे पावणेपाचला उठून ट्रँमने सहा वाजता तेथे पोहचत असत.पाहिजे तेवढ्या कैऱ्या  घेतल्यानंतर व्हिक्टोरियात म्हणजे घोडागाडीत टाकून ती दुकानात घेऊन यायचे. स्नान करून दोन तीन माणसांसह आंबे कापायला बसायचे.फक्त जेवणापुरते घरी जाऊन लगेच पुन्हा कैरी कापायला सुरुवात करून ८-९ वाजेपर्यंत फोडी कापून, फोडीत मसाला मिसळून पिंपात ते लोणचे भरून ठेवायचे. अशी त्यांच्या कामाची पद्धत असे.चैत्र व वैशाखात आंब्याचे व  ज्येष्ठ,आषाढ महिन्यात लिंबूचे लोणचे घालीत असत. जुलै १९५९ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय आंबा प्रदर्शनात बेडेकरांच्या आंब्याच्या लोणच्याला पहिलं बक्षीस मिळालं.आता महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांतही त्यांची उत्पादने पोहचू लागली.


बेडेकरांनी आपल्या कल्पकतेने, मेहनतीने धंदा बरकतीला आणला. हाती पैसा खेळू लागला. पूर्वी दुकानदार बेडेकरांची त्यांच्या काही नातेवाईक, परिचित मंडळीना लाज वाटे. त्यांच्या दुकानावरून जाताना ते  त्यांच्या दुकानाच्या विरूद्ध बाजूने जात, पण त्यांच्या  दुकानाच्या बाजूने कधी जात नसत. तसेच काही दुकानदारही कधी भेट झाल्यास  कुत्सित भाषेत बोलत. लग्न समारंभात अगदी नजिकच्या व चांगल्या स्नेह्यांकडूनही त्यांना आमंत्रण नसे. त्या लग्नाला माल मात्र बेडेकरांकडून गेलेला असे. पण आता बेडेकरांच्या दारी  लक्ष्मी आल्यावर लोकांची दृष्टी बदलली. आता बेडेकरांशी आपला संबंध आहे, हे दाखवणं त्यांना मोठेपणाचं वाटू लागलं. बेडेकरांनी नवी दुकाने उघडली. गिरगावातील काही चाळी विकत घेतल्या. १९४९ साली ' कोकण नेव्हीगेशन कंपनी ' ही स्टीमर कंपनी स्थापन झाली. त्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव ते त्या कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर गेले. त्या कंपनीने ' सदाफुली ' व ' गुलछडी ' या नावाच्या दोन लाँचेस रेवस धरमतरला चालवण्यासाठी म्हणून विकत घेतल्या.( या ' सदाफुली ' बोटीने मी भाऊचा धक्का ते मोरा बंदर (उरण ) प्रवास केला आहे.)काही दिवसानंतर कंपनीचे मूळ चालक श्री. मुणगेकर निघून गेले. यानंतर काही काळ कंपनी चालली.नंतर बेडेकर बोर्डावरून निवृत्त झाले.या अगोदरच सुप्रसिद्ध लेखक गंगाधर गाडगीळ यांचे वडीलही बोटीच्या व्यवसायात उतरले होते. १९४७ साली बुडालेली 'रामदास ' ही बोट ज्या कंपनीत ते डायरेक्टर होते, त्याच कंपनीची.


घरी श्रीमंती आल्यानंतरही वासुदेवराव उतले नाहीत की  मातले नाहीत. १९४८ साली गांधी हत्येनंतर ब्राह्मण म्हणून मुंबईतील त्यांच्याही दुकांनावर हल्ले झाले. त्यांचे परळचे दुकान फोडून सर्वस्वी लुटले गेले. दादरच्या दुकानाचीही नासधूस झाली. त्यांच्या मुगभाटच्या दुकानावरही दगडफेक झाली‌. त्याचप्रमाणे ठाकूरद्वारचे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला, पण तो यशस्वी झाला नाही. फक्त फोर्टमधील  दुकानाला मात्र काही  झालं नाही. गांधींच्या हत्येनंतर  पुणे,सातारा, सांगली,वाई वगैरे भागातून खेडोपाडी अनेक  ब्राह्मणांची घरे जाळली गेली व पुष्कळसा ब्राह्मणवर्ग निर्वासित झाला. तेव्हा आपल्या दुकानांवरील हल्ल्याचं दु:ख गोंजारत न बसता ते त्या अभागी लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी आपल्या पुराणिक, वैद्य, देवबुवा या मित्रांसोबत एक '  हिंदु धर्मसंवर्धक मंडळ 'नावाची संस्था स्थापन केली. दंगलग्रस्तांच्या याद्या मिळवून  प्रत्येकाच्या नावाने पंचवीस रुपये याप्रमाणे मनीआँर्डरीने रकमा पाठवल्या. त्या त्यांना गणपतीच्या पूर्वी मिळाल्या.यावेळी त्यांच्यापैकी काहींकडून जी पत्रे आली त्यावरून असं दिसून आलं, की  यांच्याकडची मदत प्रथम मिळालेली मदत असून त्यांना तोपर्यंत इतर कुठूनही मदत मिळालेली नव्हती. ही मदत करत असतानाही त्यांनी आपपरभाव ठेवला नाही, तर ब्राह्मणांच्या घराजवळ असल्यामुळे काही इतर ज्ञातींची घरेही या जळितात जळली होती. त्यांनाही  सर्वांप्रमाणे मदत पाठवली गेली. त्यानंतर पुन्हा दिवाळीपूर्वी प्रत्येकी वीस रुपये याप्रमाणे आर्थिक मदत पाठवली. त्यावेळी हायस्कूल शिकणाऱ्यांना मँट्रीकपर्यंत व काँलेजमध्ये शिकणाऱ्यांना त्यांचा अभ्यासक्रम संपेपर्यंत मदत केली.


२०१७ साली बेडेकर कंपनीने शंभरी पूर्ण केली. एका मराठी उद्योजकाचं हे  यश वाखाणण्याजोगं  आहे.त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे बेडेकरांच्या पुढच्या पिढीनेही या उद्योगात रस घेऊन आपल्या कंपनीची यशोपताका समुद्रापार नेली आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे !



प्रदीप राऊत


🖋️🖋️🖋️

आपला सवगडी कुठे बसलाय बघ

 


वाचन, पाहणं, समजणं, आणि त्या प्रकारे वागणे या

 वाचन, पाहणं, समजणं, आणि त्या प्रकारे वागणे या गोष्टीत खूप फरक असतो जे वाचले ते सर्वच समजत नसते, जे पाहिले ते सर्वच लक्षात येत नसते, आणि जे समजले ते दरवेळेस बरोबरच असते असेही होत नसते व या सर्व गोष्टी नीट आल्यावर आपली वागणूक योग्य होत असते त्यामुळे याच गोष्टींचा जीवनात नीट ताळमेळ लावता आला की जीवन सुखकर होत असते आणि याच गोष्टींमध्ये फरक झाला तर जीवन जगणं मुश्किल होत असते त्यामुळे जे वाचलंय ते सर्वच समजत असते, असा विश्वास ठेवू नका, जे पाहिले ते पूर्ण सत्य आहे असेही जीवनात समजत जाऊ नका, कारण दिसणं आणि असणं यातही फरक होत असतो म्हणूनच माणूस फसवणुकीची शिकार होत असतो व सर्वच गोष्टी समजल्या असे समजून जर वागताल तर अशा व्यक्तीला काहीच समजत नाही असेच मानावं लागतं कारण समज कोणत्याही गोष्टीची सहजासहजी येत नसते त्यातही खूप अभ्यास करावा लागतो व अभ्यास करूनही सर्व गोष्टी समजतात असेही होणं शक्य नसतं ,आणि ते आचरणात आणणेही फार अवघड असतं ,

        🙏🌹

छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, आंध्र प्रदेश


 छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, आंध्र प्रदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेअर्पिता वाघिणीच्या बछड्यांचे नामकरण

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेअर्पिता वाघिणीच्या बछड्यांचे नामकरण

छत्रपती संभाजीनगरदि.17(जिमाका)- सिद्धार्थ उद्यानातील अर्पिता’ या वाघिणीने काही दिवसांपूर्वी बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांचे नामकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आले. अर्पिता वाघिणीने दोन नर व एक मादी बछड्याला जन्म दिला होता. त्यांची नावे चिठ्ठी निवडून देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चिठ्ठ्या काढल्या. त्यावरील श्रावणी’, ‘विक्रम’ आणि कान्हा’ अशी नावे या बछड्यांना देण्यात आली. बछड्यांची नावे घोषित होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

00000

वयोवृद्ध स्वातंत्र्य सेनानींप्रति मुख्यमंत्र्यांचा आदरभाव;

 वयोवृद्ध स्वातंत्र्य सेनानींप्रति मुख्यमंत्र्यांचा आदरभाव;


श्रीमती देशपांडे यांना त्यांच्या जागेवर जाऊन भेटले


छत्रपती संभाजीनगर, दि.17(जिमाका)- ज्येष्ठस्वातंत्र्य सेनानी श्रीमती विमल देशपांडे या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत असतांना त्यांना तेथेच बसू द्या; मीच येऊन भेटतो असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांच्यापर्यंत गर्दितून वाट काढत पोहोचले व त्यांची आस्थेने विचारपुस केली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांप्रती असलेल्या आदरभावाचे दर्शन उपस्थितांना झाले. मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे हे सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यासाठी गेले. तेथे भेटत असतांना समोरुन 90 हून अधिक वर्षे वय असणाऱ्या श्रीमती विमल देशपांडे या त्यांना भेटण्यासाठी येत असतांना मुख्यमंत्र्यांना दिसल्या. त्यांना वयोमानामुळे गर्दीतून वाट काढणे शक्य होत नव्हते. त्यांची अवस्था पाहून मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की, त्यांना तेथेच बसू द्या, मीच तेथे येतो. असे म्हणत मुख्यमंत्री श्री. शिंदे श्रीमती देशपांडे यांच्या पर्यंत पोहोचले आणि त्यांची विचारपूस केली

महाराष्ट्र आणि काश्मिरच्या नव्या मैत्री पर्वाला सुरूवात

 महाराष्ट्र आणि काश्मिरच्या नव्या मैत्री पर्वाला सुरूवात


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर


मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे श्रीनगर येथे आगमन झाले. सरहद संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हम सब एक है या कार्यक्रमासह कारगिल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन, युद्ध स्मारकाला भेट, जवानांशी आणि काश्मीर मधील मराठी कुटुंबियांशी संवाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्र-काश्मीर मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठक, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण आदी कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी काश्मिरकडे प्रयाण केले. त्यांच्या समवेत प्रधान सचिव ब्रिजेश सिंह उपस्थित आहेत.


            पुणे येथील 'सरहद' संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या 'हम सब एक है' या विशेष कार्यक्रमासह महाराष्ट्र काश्मीर मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात म्हणून काश्मिर मधील 73 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारी श्रीनगर येथे हा कार्यक्रम होत आहे. यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे काश्मीर मधील मराठी बांधवांशी संवाद साधणार आहेत.


कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन


सोमवार दि. 18 सप्टेंबरला कारगिल येथे सकाळी सहाव्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर डॉ. अली इराणी तसेच फिजिओथेरपी डॉक्टरांद्वारे कारगिल विजयाच्या रौप्य महोत्सवा निमित्त आयोजित वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. छानीगुंड येथे सरहद संस्थेच्या माध्यमातून भारतीय लष्करासाठीच्या 72 फुटी तिरंगा झेंड्याचे अनावरण देखील मुख्यमंत्री करणार आहेत.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे द्रास येथील युद्ध स्मारकाला देखील भेट देणार असून यावेळी ते लष्कराचे अधिकारी आणि जवानांशी संवाद साधणार आहेत. जनरल वेद प्रकाश मलिक यांच्या कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन देखील मुख्यमंत्री करणार आहेत. या दोन दिवसांच्या या काश्मीर दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र- काश्मीर मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


००००

Featured post

Lakshvedhi