Monday, 28 August 2023

परभणी येथे ‘शासन आपल्या दारी’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 8 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

 परभणी येथे ‘शासन आपल्या दारी’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 8 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती


जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार- मुख्यमंत्र्यांची ग्वाही


 


            परभणी, दि.27: परभणी जिल्ह्यात पायाभूत विकासाचे अनेक प्रश्न असून, ते सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शहरात ‘अमृत’ योजनेतून भूयारी गटार, काँक्रिटचे रस्ते, औद्योगिक वसाहत, नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना आदी कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. 


            परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मैदानावर आज ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री विक्रम काळे, अब्दुल्लाह खान अ. लतीफ खान उर्फ बाबाजानी दुर्राणी, विप्लव बाजोरिया, मेघना साकोरे-बोर्डीकर, सुरेश वरपुडकर, रत्नाकर गुट्टे, बालाजी कल्याणकर, माजी मंत्री अर्जून खोतकर, विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, पोलीस अधीक्षक रागसुधा आर, महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना, सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.


परभणीसाठी आपले सरकार आता पर्वणी म्हणजे सुवर्णसंधी घेऊन आले आहे. विकास केवळ मुंबई – पुणे - नागपूर एवढाच मर्यादित असता कामा नये, तो चौफेर असला पाहिजे म्हणूनच अगदी गडचिरोलीपासून ते सिंधुदुर्गापर्यंत म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही. राज्याचा समतोल विकास झाला पाहिजे या भूमिकेतून आम्ही काम करीत आहोत, असे सांगून ‘शासन आपल्या दारी’ ही या देशातील क्रांतीकारी योजना ठरत आहे. करोडो रुपयांचे लाभ देऊन या अभियाने देशात विक्रम केला असून आतापर्यंत १ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ दिला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.  


            परभणी जिल्ह्यात 8.75 लाख लाभार्थ्यांना लाभ


            एकट्या परभणी जिल्ह्यात 8 लाख 75 हजार लाभार्थ्यांची नोंदणी केली आहे, त्यांना सुमारे १ हजार 464 कोटींचे लाभ आपण देत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


या अभियानाच्या माध्यमातून राज्य शासन सर्वसामान्याच्या घरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थ्यांना 22 हजार ट्रॅक्टर, 4 हजार पॉवर टिलर, 22 हजार 500 रोटाव्हिटर तसेच 4 लाख लाभार्थ्यांना 1351 कोटी रुपयांचा लाभ डिबीटीच्या माध्यमातून देण्यात आल्याचे सांगून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी घेत असलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.


शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही


                                – मुख्यमंत्री


            सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीपाचे पिक धोक्यात आले आहे. मात्र, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका, काळजी करु नका, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.


            पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत अजून 6 हजार रुपयांची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना राज्याने सुरु केली असून आता पात्र शेतकरी लाभार्थ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना विविध पिकांचा केवळ एका रुपयात विमा काढून भविष्यात येणाऱ्या आपत्तींपासून संरक्षित केले आहे. महिलांना महिला बचतगटाच्या माध्यमातून अर्थिक मदत करुन महिलांचे शक्तीगट तयार करण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. राज्य शासनाने 75 हजार नोकऱ्या देण्याचे जाहीर केले होते. परंतू प्रत्यक्षात दीड लाखापेक्षा जास्त नोकऱ्या देण्याचे काम सुरु आहे. 'लेक लाडकी' योजना सुरू केली आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं काम हे सरकार करीत असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. 

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा

 राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या

प्रकल्पांना केंद्राने मदत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा




गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            गांधीनगर, दिनांक २८ : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या २६ व्या बैठकीत बोलत होते.


            बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे होते. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री आणि दादरा व नगर हवेली, दमण आणि दिव या केंद्रशासित राज्याचे प्रशासक, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक देखील उपस्थित होते.


            तिलारी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गोवा राज्यासोबत समन्वयाने काम करीत असून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी


            नाफेडने कांदा खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले तसेच ही खरेदी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी, अशी विनंतीही केली.


मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा


            मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. हा मराठी अस्मितेचा प्रश्न असून याबाबतीत केंद्राने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


कोस्टल रोडसाठी मागणी


            राज्य शासन डहाणू ते सिंधुदुर्गपर्यंत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोस्टल रोड (किनारी मार्ग) तयार करीत आहे. गोवा आणि गुजरात या राज्यांशी, जर हा मार्ग जोडला गेला, तर निश्चितच या राज्यात पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


सामंजस्य करारांची चांगली अंमलबजावणी


            यावेळी प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षभरात राज्य शासनाद्वारे चालविल्या जाणाऱ्या उपक्रम आणि कार्यक्रमांची माहितीही दिली. ‘शासन आपल्या दारी’ सारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाद्वारे एकाच छताखाली आतापर्यंत १.५ कोटीपेक्षा जास्त लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे, असे ते म्हणाले.


            आज महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीत देशातील आघाडीचे राज्य बनले आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील सामंजस्य कराराची ७५ टक्के अंमलबजावणी देखील झाली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जपानहून महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी सकारात्मक चर्चा केली आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नवीन बंदरे धोरण, माहिती तंत्रज्ञान धोरण, वस्त्रोद्योग धोरण आणि हरित हायड्रोजन धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आघाडीवर नेण्यात येत आहे. सीझेडएमपीची मान्यता मिळाल्यामुळे राज्यातील ५ किनारी जिल्ह्यांमध्ये पर्यटनाला चालना मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


कुपोषण समस्या सोडविणार, ‘आपला दवाखाना’ उपक्रम


            महाराष्ट्रात देशात सर्वाधिक २० हजार ८७० प्राथमिक कृषी पतसंस्था असून पुढील दोन वर्षांत आम्ही राज्यातील १२ हजार संस्थांचे संगणकीकरण करणार आहोत. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वांसाठी चाचणी आणि उपचार मोफत करण्यात आले आहेत. विमा संरक्षण एक लाखावरून पाच लाखांपर्यंत वाढवले आहे. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेतून प्राथमिक तपासणीची सुविधा दिली आहे. आदिवासी भागातील कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी राज्य कार्य दलाची स्थापना केली आहे, असेही मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.


आणखी ३४ योजना डीबीटीमध्ये जोडणार


            आज महाराष्ट्रातील २ हजार ४४४ ग्रामपंचायती भारत नेटद्वारे जोडल्या जातील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, १२ हजार ५१३ ग्रामपंचायतींनी 'फायबर टू द होम कनेक्शन'साठी बीएसएनएल सोबत सामंजस्य करार केला आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक खरेदीमध्ये 'मेक इन इंडिया'ला प्राधान्य देत राज्य खरेदी धोरणात सुधारणा केली आहे. तसेच शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थीपर्यंत पोहोचावा यासाठी राज्यात महाडीबीटी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात आणखी ३४ योजना जोडण्याचे काम सुरु आहे.


            महाराष्ट्रातील १ लाख ८० हजार मच्छिमारांना बायोमेट्रिक कार्ड देण्यात आले आहेत. तसेच राज्यात बँकिंग नेटवर्कचे जवळपास १०० टक्के कव्हरेज उपलब्ध असून जी गावे उरली आहेत तेथे राज्य बँकर्स समितीला ही सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


महिला अत्याचारावर जलद कार्यवाही


            महिलांवरील अत्याचारांसंदर्भात राज्य शासन गंभीर असून लैंगिक गुन्हे, महिला आणि मुलांवरील बलात्काराच्या प्रकरणांचा तपास जलदगतीने सुरु आहे. लैंगिक गुन्ह्यांसाठी तपास ट्रॅकिंग सिस्ट‍िमच्या अनुपालन दरामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. महाराष्ट्रातील दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण सुमारे ४६ टक्के आहे. बलात्कार आणि ‘पॉस्को’ कायद्यातील खटल्यांवर जलद कारवाईसाठी १३८ 'फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट' स्थापन करण्यात आली आहेत, असे ते म्हणाले.


            शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देण्यासाठी पीक विमा योजना केवळ एक रुपयात राबविण्यात येत आहे. तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेंतर्गत राज्यातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्यात येत आहेत या

ची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 


0000


सप्ताह सोहळा सरला बेट विकासासाठी 15 कोटींचा निधी

 सप्ताह सोहळा सरला बेट विकासासाठी 15 कोटींचा निधी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैजापूर येथे घोषणा


            औरंगाबाद, दि. 27(जिमाका) –संत गंगागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सरला बेट या परिसरातील पायाभूत सुविधा विकासासाठी 15 कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वैजापूर येथे केली.


 


            येथील योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज 176 व्याअखंड हरिनाम सप्ताहासाठी आज मुख्यमंत्री शिंदे आले होते. या सोहळ्यास राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार प्रा. रमेश बोरनारे, मठाधिपती संत रामगिरी महाराज तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनीही या सोहळ्यास उपस्थिती दिली होती.


 


            या अभूतपूर्व अध्यात्मिक सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित भाविकांशी 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम' असा गजर करीत संवाद साधण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, आपणा सर्व भाविकांना भेटता आलं हे माझं भाग्य. हरीनाम सप्ताहासारख्या अध्यात्मिक उपक्रमातून संत महात्मे हे चांगल्या गोष्टी शिकवून समाजाचे प्रबोधन करत असतात. वारकरी संप्रदाय हा अशाच लोकसेवेची शिकवण अंगिकारणारा संप्रदाय आहे. पंढरपूर येथे सुद्धा आषाढी -कार्तिकीला जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा शासन देत आहे. त्यात सुधारणा करून वारकऱ्यांना अधिक सेवा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.


 


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, संत गंगागिरी महाराजांच्या शिकवणीचा अवलंब करुन जीवन जगल्यास प्रपंच करतांनाही परमार्थ साधता येतो. अशा प्रकारे दुसऱ्यांची सेवा करीत आयुष्य जगल्यास आपल्या वाट्याला दुःख येत नाही. राज्यातील सरकार हे सामान्यांचे सरकार असून शेतकरी सुखी व्हावा यासाठी शासन काम करीत आहे. पावसाने सध्या ओढ दिली आहे. पाऊस चांगला पडावा यासाठी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगारांना, श्रमिकांना चांगले यावे यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उपस्थित भाविकांना आश्वस्त केले.


            संत गंगागिरी महाराज यांच्या मठाकडून मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद अशा तीनही जिल्ह्यातून लाखो भाविक या सोहळ्यास उपस्थित होते.


00000


 


 


 


 


 


 


 


 

मुंबईतील पर्यटन स्थळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार

 मुंबईतील पर्यटन स्थळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार

- विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर


            मुंबई दि २७ – शहरातील हरित उद्याने तयार करण्यात नागरिकांचाही मोठा सहभाग आहे. लवकरच कोळीवाडा मच्छिमार क्षेत्र, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेट वे ऑफ इंडिया येथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

            कुलाबा, कफ परेड येथे सुरक्षा उद्यानाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर बोलत होते.

            अध्यक्ष ॲड् नार्वेकर म्हणाले की, उद्यानाचे लोकार्पण नागरिक आणि येथील रहिवाशी संघाचे यश आहे. या क्षेत्रात रहिवाशांच्या तुलनेत कामानिमित्त विविध कार्यालय आणि संस्थांमध्ये असलेली लोकसंख्या जास्त आहे. या परिसरात हरित उद्यानाबरोबरच लवकरच नव-नवीन बदल घडणार आहेत. परिसर स्वच्छ व दुरूस्ती देखभालीमध्ये सातत्य राखणे नागरिकांचे कर्तव्य आहे. 

मुंबईतील हरित क्षेत्रात वाढ करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई शहरात राहण्यासाठी सुयोग्य आणि शाश्वत विकासाचा बदल घडवून आणणार आहे. शहरात हरित क्षेत्रात वाढ करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.


             या वर्ष अखेरीस शहराच्या सागर तटीय मार्गाचा काही भाग नागरिकांना प्रवासासाठी सुरू करण्यात येणार असून, कफ परेड ते विरारचा प्रवास सुकर आणि कमी वेळात होणार आहे. ट्रान्स हार्बर आयकॉनिक ब्रिजमुळे मुंबई आणि नवी मुंबई शहरे जोडली जाणार आहेत. तसेच तेथून नवी मुंबई विमानतळासाठी दूसरा सागरी मार्ग तयार करण्यात येणार आहे. समुद्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रकिया करण्यासाठी मानके तयार करण्यात आले आहेत. लवकरच १०० टक्के प्रक्रिया केलेले पाणीच समुद्रात सोडले जाईल. तसेच भरती आली की शहरात साचलेले पाणी भुमार्गातून समुद्रात जाण्यासाठी जपानच्या सहायाने यंत्रणा तयार करण्यात येणार आहे


            यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पुर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू , अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे, नगरसेवक हर्षिता नार्वेकर, मकरंद नार्वेकर , कफ परेड रहिवाशी संघाचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.


 


*****


 

मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करुया

 मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करुया

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि.२७ : राज्यशासन, मुंबई महानगर पालिका, नरिमन पॉइंट चर्चगेट रहिवाशी संघ आणि नागरिक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करण्याचे, आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

             मुंबईतील मादाम कामा रोड येथे पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाच्या सुशोभिकरण केलेल्या कामांचे आणि मनोरंजन उद्यानाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुशोभीकरणाचा प्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत 20 हजार चौरस फूट विविध उद्याने तसेच मियावाकी जंगल विकसित करण्याचे काम सुरू आहे. राज्यात जास्तीत जास्त हरित क्षेत्र निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. हे केवळ नागरिकांच्या सहाय्याने शक्य आहे.

        नरिमन पॉइंट चर्चगेट रहिवाशी संघ यांनी या उद्यानसाठी केलेल्या प्रयत्नांना आज यश आले असून, संघाचे सदस्य, नागरिक, मनपा आणि लोकप्रतिनिधींना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

      यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पुर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारासू , अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे, नगरसेवक हर्शिता नार्वेकर, मकरंद नार्वेकर , रहिवाशी संघाचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.


*****


 


 


 


 


 


 

मोटेने पाणी काढणारी विहीर तुम्ही पाहिलीए? - ऐतिहासिक जलव्यवस्था पाहण्याची संधी

 



मोटेने पाणी काढणारी विहीर तुम्ही पाहिलीए?- ऐतिहासिक जलव्यवस्था पाहण्याची संधी


मोट... हा शब्द आता अनेकांना आठवत नसेल. मग पलान, धाव, थारोळं, पखाल, वाडवान, पायटा हे शब्द खूपच लांबचे. ते मोटेच्या व्यवस्थेतील विविध भागांचे शब्द. मोटेचे महत्त्व असे की, त्याद्वारे उपसलेल्या पाण्यामुळे आपल्या आधीच्या कितीतरी पिढ्यांची शेती फुलली आणि अर्थकारण सुरू राहिले. आता अशा मोटेच्या विहिरी उरल्या नाहीत. ज्या आहेत त्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत.

पण आजही अशी एक विहीर आहे. जिच्यावर मोट बसवली आणि बैलजोडी जुंपली की लागलीच पाणी काढता येईल. तिचे सर्व भाग व्यवस्थित आहेत. मोटेची विहीर नेमकी कशी होती, हे या विहिरीवरून नेमके समजते. ही विहीर आहे, सातारा जिल्ह्यातील फलटण आणि दहिवडी या दोन प्रमुख गावांच्या दरम्यान. तिचे वय भरेल, साधारणत: दोनशे-अडीचशे वर्षे. अशा क्वचितच विहिरी महाराष्ट्रात शिल्लक आहेत. हीसुद्धा किती काळ अशी राहील हे सांगता येत नाही.

ही मोटेची विहीर आणि अशा कितीतरी भन्नाट जलव्यवस्था पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी ‘भवताल’ने दोन दिवसांची इकोटूर आयोजित केली आहे. ती शनिवार-रविवार, १६ व १७ सप्टेंबर २०२३ या काळात होणार आहे. आपला वारसा जाणून घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही संधी आहे.

ती तुम्ही घेणार का?


अधिक माहिती व नावनोंदणीची लिंक: 

https://bhavatal.com/Ecotour/Watersystems


किंवा


संपर्कासाठी: 

9545350862 / 9922063621 

जागा मर्यादित असल्याने फार वेळ दवडू नका, हे आवाहन.


- भवताल टीम


Vihir 1.jpg


--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9

545350862 / bhavatal@gmail.com

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील पहिल्या सुवर्णपदकाबद्दल भालाफेकपटू नीरज चोप्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

 जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील पहिल्या सुवर्णपदकाबद्दल

भालाफेकपटू नीरज चोप्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन


 


            मुंबई, दि. 28 :- हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 88.17 मीटर भालाफेक करुन भारताला जागतिक अॅथलेटिक्सचे पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.


            2021 च्या टोकियो ऑलिंपिकमधल्या सुवर्णपदकानंतर, जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील नीरजची आजची सुवर्ण कामगिरी कोट्यवधी भारतीयांचा सन्मान वाढवणारी, भारतीय क्रीडाक्षेत्राला ऊर्जा देणारी, देशातील तरुण पिढीला खेळांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीरज चोप्राच्या सुवर्ण कामगिरीचे कौतुक करुन त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


            जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत आतापर्यंत भारताला केवळ तीन पदके मिळाली आहेत. 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्ज यांनी महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. गेल्यावर्षी नीरजने रौप्यपदक जिंकले होते. यंदा सुवर्णपदकाला गवसणी घालून नीरजने देशासाठी जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतलं पदकांचं वर्तुळ पूर्ण केले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी नीरज चोप्राच्या सुवर्णकामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. 


            याच स्पर्धेत भालाफेकपटू किशोर जाना याने 84.77 मीटर भालाफेक करून पाचवे स्थान मिळविले आहे. भालाफेकपटू डी.पी. मनू याने 84.14 मीटरपर्यंत भालाफेक करून सहावे स्थान मिळविले आहे. या दोघांचेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी कौतुक केले असून भविष्यातील चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Featured post

Lakshvedhi