Thursday, 24 August 2023

व्याज परतावा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे मंत्री अतुल सावे यांचे हस्ते उद्घाटन इतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी योजनेचा लाभ घ्यावा

 व्याज परतावा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे मंत्री अतुल सावे यांचे हस्ते उद्घाटन

इतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी योजनेचा लाभ घ्यावा


- मंत्री अतुल सावे


 


            मुंबई, दि. २४ : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘गट कर्ज व्याज परतावा योजने’च्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.अध्यक्ष अतुल सावे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. राज्यातील इतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, स्वतःच्या उद्योग उभारणीतून समाजातील अन्य गरजू व्यक्तींनादेखील रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी आणि राज्याच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री श्री.सावे यांनी केले.


            यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.चे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर, एसडीएफसी बँकेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष प्रिती शर्मा, महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.  


            मंत्री श्री सावे म्हणाले की, राज्यातील इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश असलेल्या शासन प्रमाणिकरण प्राप्त गटांना स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरिता बँकेतर्फे देण्यात येणाऱ्या कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत देण्यात येणार आहे.या योजनेमुळे मोठया प्रमाणत रोजगार उपलब्ध होणार आहे.


            गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत प्रती गटास बँकेकडून जास्तीत जास्त १० लाख रुपये आणि उद्योग उभारणीकरिता बँकेमार्फत ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषीसंलग्न व पारंपरिक उपक्रम तसेच लघु उत्पादन व व्यापार / विक्री संदर्भातील लघु व मध्यम उद्योग त्याचप्रमाणे सेवाक्षेत्रातील गट या योजनेचा लाभ घेऊ शकतील.


            कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि १५ लाख रुपये इतक्या रक्कमेच्या मर्यादेत व्याजाची रक्कम गटाच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळाद्वारे जमा करण्यात असल्याचे ही त्यांनी सांगीतले.


            महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरीता वैयक्तिक व्याज परतावा योजना (रु.१०.०० लक्ष पर्यंत) देखील ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, बँकेमार्फत राबविण्यात येणाच्या या योजनेंतर्गत आतापर्यंत ४ हजार २७३ लाभार्थींना महामंडळामार्फत Letter of Intent (Lol) लाभ देण्यात आला आहे.


            गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या अधिक माहिती व सहभागाकरिता इच्छुकांनी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन योजनांचे पोर्टल या Menu वरील गट कर्ज व्याज परतावा या योजनेवर Click करुन माहिती घ्यावी, असे महामंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडूनज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना श्रद्धांजली



            मुंबई, दि. 24 - ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

चतुरस्त्र अभिनेत्री हरपली


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            “चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे,” अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


            “भारतीय चित्रपट सृष्टीत रमेश देव आणि सीमा देव यांनी आगळी ओळख निर्माण केली होती. पडद्यावर आणि प्रत्यक्षातही आदर्श दाम्पत्य, प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध राहिले आहेत. देव कुटुंबीय गेली कित्येक दशके कला क्षेत्राची सेवा करत आहे. सीमा देव यांनी अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारून आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा परिचय दिला आहे. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबीय आणि चाहत्यांवर आघात झाला आहे. त्यांना यातून सावरण्याची ताकद मिळावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री हरपली


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            “मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आपण गमावली आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


            “सीमाताई देव यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात भूमिका केल्या. रमेश देव आणि सीमाताई देव हे केवळ त्यांच्या जीवनातील नाही तर पडद्यावरचेसुद्धा समीकरण होते. एक मोठा कालखंड या दोघांनी गाजविला. 'आनंद' चित्रपटातील त्यांची संस्मरणीय भूमिका असो किंवा अनेक मराठी चित्रपटांमधील सोज्वळ नायिका असा एक मोठा कालखंड त्यांनी गाजवला. सीमाताईंचे आपल्यातून निघून जाणे ही सिनेमा जगतातील एका अध्यायाची अखेर आहे. मी सीमाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना,’’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत


-उपमुख्यमंत्री अजित पवार


      “ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानं मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. आपल्या सहज, सोज्वळ, सात्विक अभिनयानं चित्रपटरसिकांच्या हृदयावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवणाऱ्या गुणी अभिनेत्रीला आज आपण मुकलो आहोत. गेल्यावर्षी, 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर दीड वर्षांनी आज, सीमा देव यांचं झालेलं निधन, ही देशभरातील चित्रपट रसिकांच्या, मराठी माणसाच्या मनाला धक्का देणारी घटना आहे. सीमा आणि रमेश देव ही जोडी रुपेरी पडद्यावरची आणि वास्तव जीवनातीलही पती-पत्नींची आदर्श जोडी होती. सीमा देव यांचं निधन ही मराठी चित्रपटसृष्टीची, भारतातील कला क्षेत्राची मोठी हानी आहे. मी सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


सिनेसृष्टीतले बहुगुणी सालस व्यक्तिमत्व हरपले


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


            “भारतीय सिनेसृष्टीतले एक सालस व्यक्तिमत्व हरपले आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाच्या काळात चित्रपट सृष्टीसारख्या क्षेत्रात अतिशय उच्च स्थान निर्माण करतांना आणि आयुष्यभर ते स्थान कायम राखतानाही स्वतःवरील आणि आपल्या कुटुंबावरील भारतीय संस्कार जतन करणाऱ्या सीमाताई भारतीयांच्या कायम लक्षात राहतील,” अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनेत्री सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


            “सीमाताईंच्या व्यक्तिमत्वात साधेपणा आणि सुसंस्कृत, सालसपणा ठासून भरला होता. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत रमेश देव, सीमा देव या दोघांनीही आपआपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते, त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका अजरामर म्हणाव्यात अशा आहेत. ईश्वर सीमाताईंना सद्गती देवो. या दुःखाच्या काळात मी देव परिवाराच्या सोबत आहे. या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ ईश्वर देव परिवारास देवो ही प्रार्थना करतो,” असे श्री.मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


००००



 

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाराज्यातील कारागिरांना लाभदायकसुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री आदी उद्योगांच्या कारागिरांचा समावेश आहे.

 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाराज्यातील कारागिरांना लाभदायक

सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री आदी उद्योगांच्या कारागिरांचा समावेश आहे.

- आर. विमला


            मुंबई, दि. 23 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कारागिरांच्या हिताची असून राज्यातील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सात लाख ग्रामीण कारागिरांना याचा थेट लाभ होणार असल्याचे मत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी व्यक्त केले.


            खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्यालयात आज दृकश्राव्य माध्यमाद्वारे राज्यातील 311 कारागीर बलुतेदार संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला बोलत होत्या.


            नव्याने सुरु होत असलेल्या 'प्रधानमंत्री विश्वकर्मा' योजनेची सविस्तर माहिती देताना श्रीमती विमला म्हणाल्या की, "खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे राज्यात जवळपास सात लाख कारागीर नोंदणीकृत आहेत. यात सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री आदी उद्योगांच्या कारागिरांचा समावेश आहे.


            केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात कर्ज, कौशल्य वाढीसाठी प्रशिक्षण, आणि विद्यावेतन देखील मिळणार आहे याचा लाभ कारागिरांनी घ्यावा. या योजनेत मंडळाच्या कारागिरांनी जास्तीत जास्त सहभागी होणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जास्तीत जास्त कारागिरांना सहभागी करून घेण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


            या योजनेची सविस्तर माहिती केंद्र सरकारकडून मिळणार आहे. ही योजना ऑनलाईन उपलब्ध होणार असून आवश्यक ते कागदपत्रे आधारकार्ड, रेशनिंग कार्ड कारागिरांनी तयार ठेवावीत. कारागिरांना कारागीर म्हणून नवे ओळखपत्र या योजनेत दिले जाणार असून त्यामुळे 'कारागीर' म्हणून शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच या योजनेत प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. जेणेकरून हस्तकला आणि कारागिरांना महत्व प्राप्त होईल. या योजनेबाबत अधिक माहिती मंडळाच्या जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयात मिळेल.


            या सभेस राज्यातील बलुतेदार कारागीर संस्थांचे अध्यक्ष, सचिव, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आदी उपस्थित होते. मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी आभार मानले.


००००

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसारकरण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा

 पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसारकरण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा


- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 23 :- पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग पूर्ण करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यातील अडचणी दूर कराव्यात. या अनुषंगाने पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पुणे-नाशिक ग्रीनफिल्ड ब्रॉडगेज हायस्पीड रेल्वेमार्गासंदर्भात आज मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीस आमदार अतुल बेनके, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, व्यवस्थापकीय संचालक (महारेल) राजेशकुमार जैसवाल तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पुणे-नाशिक रेल्वेमार्ग करण्याबाबत गेल्या २५ वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, विविध कारणांमुळे हा मार्ग तयार करण्याचे काम रेल्वेला शक्य झाले नाही. त्यामुळे हा मार्ग मेट्रो कायद्यानुसार ‘महारेल’च्या माध्यमातून पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले.


००००

पत्रकारांवरील हल्ले निंदनीय:

 ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान

पत्रकारांवरील हल्ले निंदनीय: राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 23 : पत्रकारांवरील हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही असे राज्यपालांनी सांगितले.


            ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारे 'आचार्य अत्रे पुरस्कार' राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते, पत्रकार संघाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यंदा आचार्य अत्रे यांचे १२५ वे जयंती वर्ष आहे.


            साधारण १९९५ नंतर देशात इलेक्ट्रॉनिक माध्यमे मोठ्या प्रमाणात आली. गेल्या दशकात त्यासोबत डिजिटल व समाज माध्यमे देखील आली. परंतु, ही सर्व माध्यमे एकमेकांना पूरक ठरली आहेत असे सांगताना माध्यम जगातील क्रांतीनंतर देखील वृत्तपत्रांनी आपली विश्वसनीयता टिकवून ठेवली आहे असे राज्यपालांनी सांगितले.


            पत्रकार समाजाचे कान आणि डोळे असतात. ते लोकशाहीचे पहारेकरी व जनसामान्यांचे हितरक्षक असतात. आज माध्यमांना आपली प्रासंगिकता व निष्पक्षता टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी सामान्य जनतेशी निगडित बातम्या दिल्या पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. 


            एखाद्या व्यक्तीविषयी वृत्तपत्रामध्ये बदनामीकारक बातमी छापली तर त्या व्यक्तीला मोठा मनस्ताप होतो. अशा मनस्तापाचा आपण स्वतः अनुभव घेतला आहे असे त्यांनी सांगितले. खोट्या बातमीमुळे आंदोलने होतात, जाळपोळ व हिंसा होते. त्यामुळे पत्रकार म्हणून जबाबदारीने काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  


            माध्यमांनी अनुसूचित जाती, आदिवासी, मागास वर्गीय, दिव्यांग, अल्पसंख्याक, शेतकरी व महिलांच्या प्रश्नांना प्राधान्याने स्थान दिल्यास माध्यमांची विश्वासार्हता टिकून राहील, असे राज्यपालांनी सांगितले. 


            विजय वैद्य यांना देण्यात आलेला ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून तो मानवी चेहऱ्यासह पत्रकारितेच्या मोठ्या परंपरेचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी सांगितले. विजय वैद्य यांनी पत्रकारितेला व्यापक समाजसेवेचे माध्यम बनवले. त्यांच्याकरिता पत्रकारिता अंतिम ध्येय नव्हते तर देशातील सामान्य माणसांचा आवाज सरकार दरबारी पोहोचविण्याचे ते एक साधन होते, असे त्यांनी सांगितले. एक व्यक्ती आपल्या जीवनात किती मोठे काम करू शकतो याचे विजय वैद्य हे उत्तम उदाहरण आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 


            आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला याचा अतिशय आनंद झाला असे विजय वैद्य यांनी सत्काराला दिलेल्या उत्तरात सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व कार्यवाह संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर विष्णू सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.


            यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी नगरपाल डॉ जगन्नाथ हेगडे, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या पत्रकारांच्या पाल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


००००

ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेटमहिला सुरक्षा, शोषण यावर झाली चर्चा.

 ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेटमहिला सुरक्षा, शोषण यावर झाली चर्चा.


            मुंबई, दि. 23 : ऑस्ट्रेलियाचे उप महावाणिज्यदूत मायकेल ब्राऊन आणि मुंबईतील महावाणिज्यदूत कार्यालयाच्या प्रमुख मॅजेल हाइंड यांच्या शिष्टमंडळाने आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानभवनात सदिच्छा भेट घेतली.


            उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधानभवन कार्यपद्धती याचबरोबर सर्वपक्षीय आमदारांचे शिष्टमंडळ युरोप दौऱ्यावर जाणार असल्याचीही माहिती दिली. यामध्ये जास्तीत जास्त महिला आमदार आहेत. महाराष्ट्रात स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा, त्यांचे हक्क यासाठी होत असलेल्या कामाची माहिती दिली.


            राज्यात प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अखत्यारित असलेल्या महिला दक्षता कमिटीच्या माध्यमातून ज्या सामाजिक संस्थांमधून महिलांविषयक कार्य केले जात आहे त्यांचे समुपदेशनसुद्धा या माध्यमातून सुरू आहे. वाणिज्यदूतांमार्फत त्या संस्थेला निधी उपलब्ध करून दिला तर त्याचा लाभ होईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.


            पोलीस हेल्पलाईन सुरू केल्याने विविध अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यास प्रशासनाला यश आले आहे. महिलांमध्ये आपल्या हक्काची जागृती येण्यासाठी पोलिसांसाठी ‘स्त्री-पुरुष समानता: पोलीस मार्गदर्शक’ पुस्तिका तयार केली आहे. याच्या माध्यमातून आणि ऑनलाईन बैठकातूनही पिडीत महिला, मुली यांना प्रशिक्षणाद्वारे आधार देण्याचे काम आगामी काळात करण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.


            येत्या १३ सप्टेंबर २०२३ रोजी विधानभवनामध्ये ‘फेमीनिस्ट फॉरेन पॉलिसी’ यावर कार्यशाळा होणार असून यामध्ये जपान, मेक्सिको, नेदरलँड, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा यांचे वाणिज्यदूत सहभागी होणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या वाणिज्यदूताने सहभागी व्हावे याबद्दल मायकेल ब्राऊन आणि श्रीमती हाइंड यांना डॉ. गोऱ्हे यांनी निमंत्रण दिले.  


            पोलीस मार्गदर्शक पुस्तिका जास्तीत जास्त महिलांपर्यंत प्रसारित होण्यासाठी ऑस्ट्रेलियन महावाणिज्यदूत सहाय्य करेल, असे श्री. ब्राऊन यांनी सांगितले.


००००

चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅण्डिगबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे

 चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅण्डिगबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन


 


            मुंबई, दि. 23 : जपान दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्व‍ितेबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे अभिनंदन केले असून हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. भारताच्या अंतराळातील पुढील सर्व मोहिमांना चांद्रयान-3 मोहिमेमुळे बळ मिळाले आहे. भारत जगातील एक महत्त्वाचा देश बनला असून आगामी काळात जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. या मोहिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि खंबीर पाठिंब्यामुळे भारत अंतराळात एक शक्ती म्हणून उदयास येत आहे.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात की, चांद्रयान-3 मोहीम भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाची आहे. या मोहिमेतून चंद्राचे अनेक रहस्य उलगडले जातील. आगामी काळात भारत चंद्रावर नक्की मानव उतरवेल. भारतीय शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण मोहीम पूर्ण केली आहे. भारत अंतराळात एक शक्ती म्हणून उदयास आला आहे. भारतीय नागरिक, शास्रज्ञ, तंत्रज्ञ या सर्वांचे मी अभिनंदन करतो. याबरोबरच मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलडाणा, वालचंदनगर, जुन्नर या शहरांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे, त्यांचाही अभिमान वाटतो. या ऐतिहासिक क्षणांचे आपण साक्षीदार झालो याबद्दल जगभरातील भारतीयांचे अभिनंदन.


००००



 


वृत्त क्र. 2850


भारतीयांची मान उंचावणारा दिवस


- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा


 


 


            मुंबई, दि. २३ : भारताच्या आकांक्षाना नवे आकाश देणारे ‘चांद्रयान ३’ आज चंद्रावर उतरले. सर्वच भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता! भारतीयांनी देखील एकत्र येऊन हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. राज्यात सुद्धा विविध ठिकाणी नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरिकांसाठी ‘चांद्रयान ३’ च्या सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण दाखवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम पालकमंत्री श्री. लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातील वसंतराव नाईक चौक गार्डन ताडदेव सर्कल, मलबार हिल येथे झाला.


            "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, त्यांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांवर दाखवलेला दृढ विश्वास आणि या मोहिमेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्वच लोकांमुळे आज १४० कोटी भारतीयांची मान उंचावणारा क्षण आहे. चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचा क्षण अनुभवताना प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून आला असणार हे नक्की आहे, असेही मंत्री श्री. लोढा यांनी म्हटले आहे.


****

Featured post

Lakshvedhi