Saturday, 22 July 2023

बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार -केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी

 बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार -केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी


            मुंबई, दि.22 : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध करून देईल अशी घोषणा केंद्रीय महिला व बाल कल्याण, अल्पसंख्यांक मंत्री श्रीमती स्मृती जुबिन इराणी यांनी केली.


            षण्मुखानंद ऑडिटोरियम, सायन पूर्व मुंबई येथे राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग भारत सरकार व महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “वत्सल भारत” या विभागीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल कल्याण, अल्पसंख्यांक मंत्री श्रीमती स्मृती इराणी बोलत होत्या. या कार्यक्रमास महाराष्ट्र सह गुजरात, आंध्रप्रदेश, गोवा, दादरा नगर हवेली, दमन, दिव राज्यातील सदस्य सहभागी झाले होते.


            केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या, 'चाइल्ड ट्रॅकिंग' या सिस्टम च्या माध्यमांतून जी मुले हरवली होती अशी देशातील चार लाख मुले शोधली आहेत आणि त्या मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं आहे. 2 हजार 500 मुलं ही दत्तक घेतली गेली आहेत. पोक्सो अंतर्गत महिलांना भारत सरकार पूर्णपणे मदत करणार असून त्यांचा कायदेशीर दृष्ट्या येणारा आर्थिक भार देखील भारत सरकार उचलणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अवैध मानवी तस्करी रोखण्यासाठी युनिट बनवलेले आहे, यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या जरूर आम्हाला कळवाव्यात. प्रत्येक गावागावाच्या बाल सुरक्षा समित्या कार्यरत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर एखाद्या बालकाला जर मदतीची आवश्यकता असले तर त्याची माहिती भारत सरकारला कळवावी, आम्ही त्याच्यासाठी नक्की मदत करू.


            प्रत्येक जण आप आपल्या परीने स्वताच्या राज्यातील वेगवेगळ्या शासकीय व निम शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लहान मुलांची बालकांची काळजी समर्पित भाव ठेऊन सेवा देत आहात याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे. शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी केंद्र शासन पूर्णपणे प्रयत्न करेल असेही मंत्री श्रीमती स्मृती इराणी म्हणाल्या.


            यावेळी केंद्रीय महिला बालविकास विभागाचे अतिरिक्त सचिव संजीव कुमार चड्ढा यांनी बाल हक्क अधिनियम कशाप्रकारे लागू केला जात आहे, वत्सल भारत योजनेबाबत माहिती दिली. यावेळी सहसचिव इंद्रा मालो यांनी वत्सल भारत योजनेसाठी सर्व राज्यांचे सहकार्य मिळत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच मिशन वस्तूंचे ते पोर्टल देखील लॉन्च केले असल्याची माहिती यावेळी दिली.


            केंद्रीय बाल संरक्षण बालसुरक्षा आणि बाल कल्याण विभागाच्या सदस्य सचिव रूपाली बॅनर्जी, महाराष्ट्र राज्याचे महिला बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहुल मोरे, बापूराव भवाने, जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, शोभा शेलार आणि अब्दुल चौधरी यासह राज्यातील जिल्हा महिला बालविकास अधिकारी उपस्थित होते.


0000

महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ

 महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ


                                                                      - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री यांनी घेतली सहकुटुंब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट


            नवी दिल्ली, दि. 22 : राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली. 


            आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. श्री. शिंदे यांनी त्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व त्यांची पत्नी वृषाली शिंदे, नातु रूद्रांश यांच्या समवेत भेट घेतली.


            या भेटी दरम्यान कुटुंबियांची प्रधानमंत्री यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली असल्याचे भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासोबतच राज्याच्या सर्वंकष विषयांवर चर्चा करून राज्यात सुरू असलेल्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पाठबळ असल्याचे आश्वासक आश्वासनही यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिले असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इरशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून दुर्घटना घडली होती. या घटनेबाबत सहवेदना प्रधानमंत्री श्री. मोंदी यांनी व्यक्त करत या दुःखाच्या समयी केंद्र सरकार खंबीरपणे पाठीशी उभे असल्याच्या भावना प्रधानमंत्री यांनी यावेळी व्यक्त केल्या असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी सुरू असलेले बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबतची माहिती जाणून घेतली.


            धारावी प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावेल त्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. त्याचबरोबर मुंबईतील पुनर्विकासांचे रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची चर्चा यावेळी झाली. यासोबतच प्रत्येक कुटुबांला हक्काचे घर मिळावे, असे केंद्र शासनाचे धोरण असून राज्य त्या दिशेनेही काम करीत असल्याचे समाधान प्रधानमंत्री यांनी व्यक्त केले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            राज्यातील रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावावेत. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे राज्यातील असे सर्व प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशाही सूचना प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी केल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासह राज्यात वांरवार होणारी अतिवृष्टी त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचे होणारे नुकसान याबाबतही प्रधानमंत्री यांनी विचारपूस केली. कोकणात येणारा उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळविता येईल, यावर भविष्यात काही उपाययोजना आखता येतील का याबाबतही चर्चा करण्यात आली. मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनेबाबतची माहिती प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी घेतली. यासह राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा याबाबतही विचारणा केली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यां

नी सांगितले.


महिला उद्योजिका स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र चेंबरचे नेहमीच पाठबळ : संगीता पाटील

 महिला उद्योजिका स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र चेंबरचे नेहमीच पाठबळ : संगीता पाटील


महाराष्ट्र चेंबरची महिला समिती आणि मुंबई जिल्हा सहकारी बँकेतर्फे व्याख्यान संपन्न


मुंबई : `मूळत: उद्यशील स्वभाव असलेल्या महिलांनी उद्योजिका होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले पाहिजे. महिला सक्षम आहेतच, त्यांनी उदयोग क्षेत्रात आपला ठसा उमटविला पाहिजे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे पाठबळ कायम राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर, महिला उद्योजकता समिती व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित `आंतरराष्ट्रीय व्यापार व महिला उद्योजकांसाठी भांडवल उभारणी `या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. मुंबई फोर्ट येथील डॉ. डी. एन. रोडवरील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित येथील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात हे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, महिला उद्योजकता समितीच्या को-चेअरपर्सन कविता देशमुख, महाराष्ट्र चेंबरचे सहकार्यवाह सागर नागरे यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम झाला.

या वेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र चेंबरच्या महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील म्हणाल्या, `महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र चेंबर अंतर्गत महिलांसाठी धोरण आखले गेले आहे. ३६ जिल्ह्यासाठी हे धोरण आहे. महिला या मुळातच उदयोजक, उत्तम प्रशासक असतात, मात्र अनेकदा ते घरापुरतं मर्यांदित राहतं. घराबाहेरच्या विशाल जगात त्या गुणांचं सार्थक व्हावे, म्हणून उद्योजिका होण्याचे स्वप्न महिलांनी प्रत्यक्षात आणायला हवे. त्यासाठी महाराष्ट्र चेंबर महिलांसाठी दीपस्तंभाचे काम करीत असून महिलांना सातत्याने पाठबळ देत राहणार आहे.

चेंबरतर्फे राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्र चेंबरने महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच पाठबळ दिले आहे. केवळ वर्कशॉप, सेमिनार एवढाच उद्देश महाराष्ट्र चेंबरचा नसून त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वोतोपरी मदत करते. महिलांनी उद्योग जगतात पाऊले ठेवायला हवीत. परंतू, नवीन उद्योग स्थापन करताना महिलांसमोर भांडवल हा विषय असतो. त्यामुळे आपल्या बँकेतर्फे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असेही समितीच्या अध्यक्षा संगीता पाटील यांनी आवाहन केले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईच्या संचालिका रुपा नाईक यांनी `आंतरराष्ट्रीय व्यापार` या विषयावर मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी काय करावे, महिलांसाठी उपलब्ध असलेल्या संधी, केंद्र आणि राज्य सरकारच्या उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय सरव्यवस्थापक समीर महापुष्पे, संदीप सुर्वे यांनी `महिला उद्योजकांसाठी भांडवल उभारणी` या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी मुंबई बँकतर्फे महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली. महिलांसाठी विशेष कर्ज योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

 *हे एक जुने मराठी गाणे आहे, यात जवळ जवळ 25-30 म्हणी आहेत. सध्या अभावानेच या म्हणींचा वापर होतो पण आजच्या परिस्थितीत हे


गाणं चपखल बसतं.. ऐका, जुन्यांची नक्की आठवण येईल. 👇👇

सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठीतात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

 सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठीतात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर


            मुंबई, दि. २१- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट अ या संवर्गातील ५४७ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयेागामार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयेागामार्फत घेण्यात आल्या होत्या, त्यातील पात्र उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयेागाच्या संकेतस्थळावर आज, दि. २१ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


            या संवर्गाची इतक्या मोठया प्रमाणात पदभरती आयोगाने अत्यंत कमी वेळेत पूर्ण केली आहे. आज जाहीर करण्यात आलेली सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

*💥 टिक बाइट म्हणजे काय

 ⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️


  *💥 टिक बाइट म्हणजे काय ? 💥*


⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️



टिक हा एक किडा आहे ज्याच्या चाव्या व्दारे होणाऱ्या संसर्गास टिक बाइट म्हणतात. 


त्वचेवर चावा घेऊन ते रक्त काढतात. हा किडा बहुतेक डोंगराळ भागात आढळत असून तपकिरी, काळा किंवा लाल रंगाचा असू शकतो. 


टिक चावल्यावर त्वचेचा रंग लाल होतो किंवा पुरळ येऊन त्या ठिकाणची त्वचा जळते. 


टिक चावल्यानंतरही गंभीर लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.


*लक्षणे :*


टिक चावल्यानंतर त्वचा लाल होते. सर्व टिक्स हानिकारक नसतात. मात्र, आपल्याला त्याला हलक्यात घेऊ नये. 


संक्रमण पसरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. असे काही कीटक असतात जे मानवा मधून प्राण्यांमध्ये किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे संसर्ग पसरवतात. 


टिक चावल्यानंतर तीव्र संसर्ग असेल तर श्वास घेण्यास त्रास होणे, डोक्यात वेदना आदी लक्षणं जाणवतात.


*निदान :*


टिक न चावताच तुमच्या त्वचेला खाज सुटत असेल तर आपले डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक्स देउ शकतील.


किडा चावल्यानंतर त्याचा काटा जर त्वचेतून काढला नसेल तर डॉक्टर त्यास चिमटा किंवा इतर साधना मधून काढेल.


आपण घरीच त्वचेतून कीटक देखील काढून टाकू शकता. परंतु, जर कीटकांचा काही भाग आपल्या शरीरात राहिला तर संसर्ग होण्याचा धोका असतो.


*टिक बाइट टाळण्यासाठी ?*


टिक बाईट टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तेथे गवत किंवा झुडपे असलेल्या ठिकाणी न जाणे.


तुम्ही डोंगराळ किंवा गवताळ प्रदेशात गेलात तरी कीटकांच्या जवळ जाणे टाळा.


गवत किंवा डोंगराळ भागात जाताना आपल्या शरीराचा अधिक भाग लपविण्यासाठी संपूर्ण स्लीव्हचा शर्ट आणि संपूर्ण पँट घाला.


बाहेर जाताना पांढरे कपडे घाला. कारण लवकरच तुमच्या आसपास कीटक येणार नाहीत.


संसर्ग होण्याचा धोका कमी करण्यासाठी बाहेरून येण्याच्या दोन तासांच्या आत शॉवर घ्या.


(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन' चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे)


*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*


*सौजन्य : सकाळ*


⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालीइरशाळगडाचे बचावकार्य युध्दपातळीवर सुरु

 आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालीइरशाळगडाचे बचावकार्य युध्दपातळीवर सुरु

            नवी मुंबई, दि.21:- रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ दुर्गम भागात असलेल्या इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यांवर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत अनेक कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले गेले आहेत. ही घटना घडल्याचे कळताच कोंकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणांना बचाव कार्यासाठी आदेश दिले. डॉ. महेंद्र कल्याणकर हे स्वत: 19 जुलै रोजी रात्री दीड वाजता घटना स्थळी प्रत्यक्षात पोहोचले. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी अजित नैराळे. खालापूर तहसिलदार अयुब तांबोळी यांनी रात्री परिस्थितीचा अंदाज घेत, बचावकार्यासाठी आवश्यक साधन सामग्री, मनुष्यबळाची तयारी केली.  


            डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश दिल्याने बचाव कार्य त्वरीत व वेगाने सुरु झाले. एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले. इरशाळवाडी पर्यंत पोहचण्याचा मार्ग सोपा नाही. निमुळता रस्ता तोही धड मातीचा नाही की धड दगडाचा नाही. डोंगरमाथ्यावरुन वेगाने येणारे पावसाचे पाणी, पायवाटेच्या खाली उतार अशा परिस्थितीत आयुक्त कल्याणकर स्वत: घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बचाव कार्याचे नेतृत्व केले. 24 तासाहून अधिक काळ आयुक्त डॉ. कल्याणकर आणि महसूल यंत्रणेसह इतर खात्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी कार्यरत आहेत. दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने मदत कार्य थांबू नये यासाठी माहिती असलेल्या स्थानिकांची व संस्थांची मदत घेतली जात आहे. यामध्ये युवा संघटना, महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, विविध ट्रेकर्सचा देखील सहभाग आहे.


            आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी प्रशासन आणि खासगी यंत्रणांमार्फत युध्दपातळीवर बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफच्या 4 तुकड्या एकूण 100 जवान , टीडीआरएफ चे 80 जवान, इमॅजीका कंपनीचे 82 कामगार तर सिडकोचे 460 कामगार बाचाव कार्यात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर चौक, वरोसे, खोपोली येथील ग्रामस्थ, वेगवेगळ्या एनजीओ, ट्रेकर ग्रूप मधून एकूण 900 पेक्षा अधिक लोक बचावकार्यात सहभागी झाले आहेत. रात्रीच्यावेळी बचावकार्य चालू ठेवण्यासाठी फ्लूड लाईट्स लावण्यात आले आहेत. 5000 फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले आहे. या दूर्घटनेत वाचलेल्या लोकांच्या निवाऱ्यासाठी 60 कंटेनर मागविण्यात आले असून त्यापैकी 30 ते 40 कंटेनर आज घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांच्या राहण्याची तात्पूरती व्यवस्था या कंटेनरमध्ये करण्यात आली आहे. तसेच 20 तात्पूरती शौचालये आणि 20 तात्पूरती स्नानगृहे तयार करण्यात आली आहेत. वेगवेगळ्या माध्यमांतून बचावकार्यासाठी लागणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्री मागविण्यात आल्या आहेत. मात्र घटनास्थळ डोंगर माथ्यावर असल्याने या यंत्रसामग्री घटनास्थळापर्यंत नेण्यास अडचणी येत आहेत. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर हे स्वत: संपूर्ण बचावकार्यावर लक्ष देत आहेत.


            या दरड प्रलयात इरशाळवाडीतील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत होवून पशुधनाचे व खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था/ट्रस्ट/फाऊंडेशन्स/सीएसआर/दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते नंबर व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


            ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund), • बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर:-38222872300, IFSC Code:-SBIN0000308या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा.


ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अजित नैराळे,मो.8390090040, खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, मो.क्र.9975751076 यांच्याशी संपर्क करुन ठिकाणी मदत पोहोच करावी. लोकप्रतिनिधी, नागरिकांनी पुढे येऊन मोठ्या संख्येने मदत करावी, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्‍त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.  


0000

Featured post

Lakshvedhi