Thursday, 22 June 2023

परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 5 जुलै पर्यंत मुदतवाढ

 परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 5 जुलै पर्यंत मुदतवाढ.

            मुंबई, दि. 21 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिता अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून दि. ५ जुलै २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.


            अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सदर करण्याची अंतिम मुदत ही दिनांक २० जून २०२३ पर्यंत होती, परंतू विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुदतवाढ देण्यात आली असून दि. ५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत.


            या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जाती प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking) 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रांसह, समाज कल्याण आयुक्तालय 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001 या पत्यावर अर्ज करावेत.


            या योजनेसाठी पात्र असण्याऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी.

पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठीविठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना"

 पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठीविठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना"


शासन निर्णय जारी


            मुंबई, दि. 21 :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे १५ ते २० लक्ष वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना" सुरु करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून विमा छत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


            या निर्णयानुसार “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना" या योजनेची अंमलबजावणी, संनियंत्रण तसेच विमाहप्ता भरण्याची कार्यवाही शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येणार आहे. या संदर्भात आज वित्त विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.


 विमा योजनेचे स्वरुप


            विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेंतर्गत दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत / अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये शासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.


            याव्यतिरिक्त, खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीच्या सहाय्याने विमा योजना राबविण्यात येणार आहे. दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास विमा कंपनीकडून प्रतिव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येईल. दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात/पाय व एक डोळा निकामी झाल्यास एक लाख रुपये तर एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.


            वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी ३५ हजार रुपये किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येईल, असे या योजनेचे स्वरुप असणार आहे.


            या विमा योजनेसंबंधीच्या अटी, शर्ती व अन्य तरतुदी शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत.


            या विमा योजनेबाबत आवश्यकतेनुसार विमा संचालनालयाचा सल्ला घेण्यात येईल, असे वित्त विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


००००

प्रतिबंधात्मक उपचारासाठी नियमित योग अनेक व्‍याधींवर परिणामकारक

 प्रतिबंधात्मक उपचारासाठी नियमित योग अनेक व्‍याधींवर परिणामकारक        


– धीरज कुमार


आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयात जागतिक योग दिन साजरा


               मुंबई, दि. 22 : “मानवी जीवनात असंसर्गजन्‍य आजारांचे वाढत असलेले प्रमाण चिंताजनक आहे. या आजारांवर नियंत्रणासाठी योगासारख्‍या अखर्चिक व किमान संसाधनांची आवश्‍यकता असलेल्‍या प्रतिबंधात्‍मक उपचारांचा वापर होणे आवश्‍यक आहे. मेडिटेशन, योग यासारख्‍या थेरपींमध्‍ये सातत्‍य व नियमीतपणा ठेवला, तर अनेक आजारांपासून दूर राहणे शक्‍य आहे. परदेशामध्‍ये ज्‍या प्रमाणात योगोपचाराचा वापर केला जात आहे, त्‍या प्रमाणात आपल्‍या देशात प्रसार होणे गरजेचे आहे. शारीरिक आजारांव्‍यतिरिक्‍त क्रोध, मानसिक व्‍याधींवर नियंत्रण मिळवण्‍याचे सामर्थ्‍य योगामध्‍ये असल्‍यामुळे सर्वांनी आपल्‍या दिनचर्येतील काही वेळ योगासाठी व्‍यतीत करावा”, असे मनोगत आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी व्यक्त केले. 


             आरोग्‍य विभागाच्‍यावतीने आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयात जागतिक योग दिनाच्‍यानिमित्‍ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्‍य सेवा आयुक्‍त धीरज कुमार यांच्या हस्‍ते झाले. वित्‍त संचालक जयगोपाल मेनन, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड आदींसह आयुक्‍तालयातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ‘सचित्र योगक्रम’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्‍यात आले.


              सहायक संचालक डॉ. सुभाष घोलप यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जागतिक योग दिवसाची पार्श्‍वभूमी व महत्त्व विषद केले. उद्घाटन समारंभानंतर ‘ताण तणावापासून मुक्‍तीसाठी योग’ या विषयावर लोणवळयाच्‍या कैवल्‍यधामचे सहायक प्राध्‍यापक डॉ.सतीश पाठक, ‘असांसर्गिक रोगांमधील योगाचे महत्त्व’या विषयावर कैवल्‍यधामचे प्राध्‍यापक डॉ. शरदचंद्र भालेकर आणि ‘अष्‍टांग योग-समज/ गैरसमज’ या विषयावर सायन येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्‍यापक डॉ. गोरक्षनाथ आव्‍हाड यांची व्‍याख्‍याने झाली. तसेच डॉ. साक्षी हडप व डॉ. निकेश अंधारे यांनी उपस्थितांकडून योगाची प्रात्‍यक्षिक करवून घेतली.    


            कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रसाद भंडारी यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. सुभाष घोलप यांनी केले.


 

नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.


            मुंबई, दि. 22 : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये प्रवेशासाठी 30 जून 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मुंबई यांनी केले आहे.


            अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश देण्यात येतो. या योजनेसाठी इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री मध्ये प्रवेश घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावे व पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 30 जून 2023 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत करणार

 बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत करणार


- ॲड. श्रीमती सुशीबेन शाह, अध्यक्ष, बाल हक्क आयोग


 


            मुंबई, दि. 22 : पोक्सो व बाल न्याय अधिनियम या कायद्यांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील. येत्या काळात सर्वांना प्रशिक्षण देवून बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल, असे बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह यांनी सांगितले.


            महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत कोकण विभागातील सहा जिल्ह्यांत दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य, विशेष पोलीस महानिरीक्षक (महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभाग) दीपक पांडे, बाल कल्याण समिती सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य, बालगृहांचे अधीक्षक, जिल्हा महिला व बाल संरक्षण विभागाचे, खासगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यातील बाल कल्याण समितीचे सदस्य, जेजेबी चे सदस्यांनी पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायदा राबवताना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली व कायद्यांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी सूचना केल्या.


            अध्यक्ष ॲड. शाह यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायदा अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील. येत्या काळात सर्वांना प्रशिक्षण देवून बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल, असे सांगितले. तसेच सपोर्ट पर्सन, सदस्यांकडून शिफारशी मागवून तीन महिन्यात अहवाल सादर केला जाईल. सर्व कर्मचारी व सदस्यांनी आपसात संवाद साधल्यास अजून जोमाने व गंभीरपणे कार्य करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.


            बैठकीस उपस्थित लोकायुक्त (निवृत्त) न्या. वि. एम. कानडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. पोलीस दल आणि बाल कल्याण समिती यांच्याकडून पोक्सो व बाल न्याय अधिनियमासंदर्भात प्राप्त माहितीचे विश्लेषण बाल हक्क आयोगाच्या सदस्य ॲड. नीलिमा चव्हाण व मजलिस संस्थेच्या संचालक ऑड्री डिमेलो यांनी केले. यावेळेस सखी सावित्री कायद्याची जनजागृती करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.


*****

संधीवात रोग*

 *संधीवात रोग* 


संधीवात या रोगात, सांधे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये सूज उद्भवते आणि रुग्ण वेदनांनी त्रस्त राहतो. चालण्यात त्रास व वेदना जाणवतात. या रोगामुळे शरीराच्या तंतुंमध्ये विकार निर्माण होतो, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, सांधे सूजतात, चालण्यात त्रास होतो. कधीकधी ताप येतो, भूक न लागणे देखील या आजाराचे लक्षण आहे. वेळेवर उपचार न केल्यास डोळे, फुफ्फुसे, हृदय आणि इतर अवयव प्रभावित होऊ लागतात.


संधिवात कारणे


 १) अनुवांशिक कारणे

 २) चुकीचे फास्ट फूड

 ३) सांध्यावर अधिक शारीरिक दबाव, ४) जोड्यांचा कमी किंवा जास्त वापर करणे

 ५) तंतुंमध्ये विकार आणि चयापचय मध्ये त्रास.

 ६) थंड वातावरणात राहण्या मुळे दुष्परिणाम

 ७) वृद्धत्व आणि हार्मोन असुंतुलन


 *काय काळजी घ्यावी ?* 

१) सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णाला हवामानानुसार २४ तासांत ३ ते ४ लिटर पाणी पिण्याची सवय लावावी. यूरिक अँसिड शरीराच्या सांध्यामध्ये जमा होतो आणि त्यापासून या वायू रोगाचा जन्म होतो. जास्त पाणी प्यायल्यामुळे जास्त लघवी होईल आणि यूरिक अँसिड बाहेर निघून जाईल

२) फळं आणि हिरव्या भाज्या आपल्या आहारात मुबलक प्रमाणात समाविष्ट करा. त्यात समृद्ध अँटीऑक्सिडेंट असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती बळकट होते. रोजाना ५०-५० ग्रॅम फळे किंवा भाज्या किंवा दोन्ही वापरत रहा. जर तुम्ही यांचा रस प्यायला तर तुम्हाला तेच फायदे मिळतील.  


 ३) ताज्या गाजरचा रस आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा आणि दररोज अर्धा कप सेवन करा. 

४) काकडीचा रस पिल्याने संधिवातात फायदेशीर ठरते.


५) संधीवात असलेल्यांनी हिवाळ्यामध्ये उन्हात बसावे. त्यामुळे Vit-D तयार होते

६) चहा, कॉफी, मांसामुळे रुग्णालां आजार उद्भवू शकतात त्यामुळे ते टाळावे. किमान प्रमाण तरी कमी करावे.

७)साखरेचा वापर हानिकारक असतो.

८) तळलेले अन्न, मीठ, साखर, मिरची-मसाले, अल्कोहोल वर्ज्य असते.

९) संधीवाताच्या रुग्णाला आठवड्यातून दोन दिवस उपवास करणे आवश्यक आहे.


१०) कॉड लिव्हर ऑईल 5 ml. सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यास संधीवात कमी होऊन त्वरित लाभ मिळतो.

११) कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी पूरक आहार घेणे आवश्यक असते.. जर आपण हे जीवनसत्त्वे अन्नाद्वारे घेत असाल तर ते अधिक चांगले .

१२) तीन लिंबू रस आणि 40 ग्रॅम इप्सम सॉल्ट अर्धा लिटर गरम पाण्यात मिसळा आणि एका बाटलीमध्ये भरा. आणि हे सकाळी आणि संध्याकाळी 5 मिलीलीटर औषध प्या. ही कृती खूप प्रभावी आहे.

 १३) संधीवात रोगात बटाट्याचा रस पिण्याने आराम मिळतो. दररोज २०० मिलीलीटर रस प्यावे हा पण प्रयोग प्रभाव शाली आहे.

१५) अधिक पायर्‍या चढणे हानिकारक आहे.

१६) विश्रांती दरम्यान संतुलन राखणे महत्वाचे आहे.

१७) आल्याचा रस पिल्याने संधीवातात होणाऱ्या वेदना कमी होते.

 १८) मिक्सरमध्ये जवस (अळशी) बिया घालून पावडर बनवा. आणि सकाळी २० ग्रॅम आणि संध्याकाळी २० ग्रॅम पाण्यात घ्या. यामध्ये ओमेगा फेटी अँसिड असते, जे या आजारात खूप फायदेशीर मानले गेले आहे. यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास देखील मदत होते. जवसाच्या सेवनाने अंगात कधी उष्णता होऊ शकते. जर असे झाल्यास प्रमाण कमी करावे आणि पाणी मात्र भरपूर प्यावे.


१९) चोपचीनी: कोकणात यास घोट वेल म्हणतात. जर ही मिळत असेल तर तिचा काढा करून प्यावा याने युरीक अँसीड कमी होईल.


२०) शिवाय निलगिरी तेल, दालचीनी तेल, राई तेल, कापूर आणि लवंग तेल ही बाजारातून आणून सम प्रमाणात मिक्स करून याने घुडगे किंवा दुखंणाऱ्या भागावर नित्य मालिश करून त्या भागावर सोसवेल इतक्या गरम पाण्याची धार धरावी. याने घामावाटे युरीक अँसीड तसेच त्या भागातील विष द्रव्ये निघून जातील.


अशा आजारासाठी असे काही उपाय आपण घरच्या घरी करुन गुण तर येईलच. पण कोणत्याही गोष्टीत जर श्रध्दा ठेवली आणि श्रध्दा पूर्वक केली तर तर त्याचा परिणाम पण चांगलाच येतो.


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,



वेळ चुकली तरी चालेल,पण दिशा चुकली तर काळ घात करतो,कालाय तस्मै नमः

: *आजची तरुणाई चुकीच्या मार्गाने जात आहे* 

दोन दिवसापूर्वी सर्व वर्तमानपत्रे व टीव्ही चॅनल वर बातमी दाखवली ,आणि काळजाचा ठोकाच चुकला ,

नुकत्याच MPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला, कोपरगाव ची *दर्शना पवार* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली, 26 वर्षी वनक्षेत्र विभागात अधिकारी *RFO* तिचे व तिच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले.

काही दिवसातच कुटुंबाचे धुळीस मिळाले,

पुण्याला सत्कार समारंभासाठी आली, कार्यक्रम संपल्यानंतर मित्राबरोबर राजगड फिरण्यासाठी गेली व तिथेच तिचा खून झाला, ज्या मित्राबरोबर गेली होती तो मित्र गायब आहे,

 *दर्शना पवार* अतिशय हुशार मुलगी होती परीक्षा साठी दोन वर्ष तिने घरात कोंडून घेतले होते ती अधिकारी झाल्यावर संपूर्ण गावाने तिचा सत्कार केला होता, तिच्या आणि आई-वडिलांच्या कष्टाचे फळ मिळाले होते पण एका दिवसातच सगळे 'होत्याचे नव्हते झाले,'

ज्याला आपण मित्र मैत्रिणी म्हणतो तेच एकमेकांच्या जीवावर उठले आहेत मैत्रीच्या नावाखाली, अनेक मुलींची फसवणूक होत आहे, आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात भरकटत चाललेली आहे मित्र-मैत्रिणी बाहेर फिरायला जाणे, विविध प्रकारचे व्यसन करणे, पब च्या नावाखाली तोकडे कपडे घालून दारू पिऊन रात्रभर बीभत्सपने नाचणे, आपले शौक पूर्ण करण्यासाठी मित्र-मैत्रिणीचे नाते जोडणे, अशा पद्धतीने आजची तरुणाई चुकीच्या मार्गाने जात आहे,

आई वडील कबाड कष्ट करत आहेत, मुलींना विश्वासाने घराच्या बाहेर पाठवतात, आमच्या आयुष्यात जे आम्हाला मिळाले नाही जे आम्ही भोगले आहे, ते आमच्या मुलांच्या वाट्याला यायला नको, म्हणून ते आपल्या जिवाचा आटापिटा करत आहे ,आजचे तरुण मुले त्यांच्या ह्याच गोष्टीचा फायदा घेत आहेत,

 *चेन्नई च्या उच्च न्यायालयाने* आजच्या तरुण पिढी बद्दल खेद व्यक्त करताना म्हटले की चित्रपटातील अश्लील शब्द आणि गाणी हिंसाचार या सर्व गोष्टीमुळे आजच्या तरुणांवर परिणाम होत आहे, त्यात आणखी भर म्हणजे सोशल मीडिया व मोबाईल एक व्यसन झाले आहे,

ग्रामीण भागातील आई वडील शिक्षणासाठी, आपल्या मुला-मुलींना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पाठवत असतात, त्यांच्या कष्टाची त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची जाणीव, मुला-मुलींनी ठेवली पाहिजे, आपल्या मुलांना अडचण यायला नको म्हणून, ते फक्त पैसे पाठवण्याचे काम करत असतात ,आणि हे तरुण शिकायचे सोडून असले धंदे करत असतात,हल्ली पुण्या मुंबई सारख्या शहरात कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुली सर्रास पणे वाईन शॉप मध्ये जाऊन दारू खरेदी करताना दिसतात, स्त्री पुरुष समानता वैगरे सर्व मान्य केले तरी अल्पवयीन मुला मुलींना उपलब्ध होणारी दारू आणि स्वयराचार योग्य आहे का .तसेच आपण आपल्या पाल्याना पुढील काळात येणाऱ्या या परिस्थितीतला तोंड देण्यासाठी कसे तयार करावे. हे पालकांसमोर एक आव्हान आहे.?

आजचे तरुण विद्यार्थी कुठे चुकत आहे, यापेक्षा त्यांनी आपली जीवनशैली, विचारसरणीत काही गोष्टी आत्मसात केल्या तर, सकारात्मक गोष्टी घडु शकतात. आपला मुलगा मुलगी सध्या कुठलेही शिक्षण घेत असल्यास प्रथमच विचार करा, की आपण जे करीत आहोत त्यांच्या जीवनात कसा उपयोग होईल. दिशा नसली तर हवेतील विमान व पाण्यातील जहाज पण भरकटतात , आयुष्यात प्रसंग व अपघात पण घडतात. त्या मुळे *दिशा निश्चित करा* स्वतःचे कौटुंबिक सामाजिक दायित्व लक्षात घेऊन चांगले संस्कार, आपली संस्कृती आणि नैतिकता जोपासण्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी तुम्ही आम्ही नक्कीच प्रयत्न करू यात

 *विजय खरात* 🙏

 *पनवेल नवी मुंबई*

[

Featured post

Lakshvedhi