Saturday, 17 June 2023

उष्णतेमुळे सतत तोंड येतय? मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय करत मिळवा आराम.....*

 *उष्णतेमुळे सतत तोंड येतय? मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय करत मिळवा आराम.....*


 उन्हाळा सुरु होताच तोंड येण्याची अर्थात अल्सरची समस्या वाढू लागते. यावेळी काही खाल्लं किंवा अगदी पाणी पितानाही किंवा बोलतानाही वेदना होतात. यामागे पोटात वाढती उष्णता, मसालेदार आणि आम्लयुक्त अन्नाचे सेवन, निर्जलीकरण, जीवनसत्व बी आणि सी यासारख्या पोषक तत्वांची कमतरता ही कारणे आहेत. हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण जेवण कमी करतात किंवा जेवतच नाहीत, पण यानेही ही समस्या न सुटता आणखी वाढते. कारण पोटात अन्न नसल्याने अॅसिडीटी होते, ज्यामुळे उष्णता वाढते. अशावेळी तोंड येण्याचा त्रास आणखी वाढतो. यामुळे तोंड येण्याच्या समस्येपासून आराम मिळावा यासाठी आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत जे तुम्हाला मदत करु शकतात.


*१) खोबरेल तेल...*

खोबरेल तेलात दाहकविरोधी गुणधर्म असल्याने ते सूज आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करते. तोंडातील अल्सरचे चट्टे कमी करण्यासाठी तुम्ही कापसाचा तुकडा खोबरेल तेलात बुडवून ते प्रभावित भागावर लावा. यामुळे तुम्हाला अल्सरच्या समस्येपासून आराम मिळेल.


*२) मीठाचे काही...*

मिठाच्या पाण्याचे गुळण्या केल्याने तोंडातील अल्सरचे फोड अथवा चट्टे कमी होतात. मीठ हे संक्रमण बरे करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाका आणि चांगले मिसळून झाल्यावर त्याच्या गुळण्या करा.


*३) काळे मनुके...*

तोंडातील लाल वेदनादायी चट्टे कमी करण्यासाठी तुम्हा काळे मनुके सुमारे ३ तास पाण्यात भिजवून ठेवा, रात्री झोपण्यापूर्वी ते खा, यामुळे पोटातील उष्णता कमी होत अल्सरपासून आराम मिळतो.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


व्यायाम व योगा करण्याचे फायदे.....*

 *व्यायाम व योगा करण्याचे फायदे.....* 


*1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते...*🙂🙂

व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते.


*2) नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे...*🙂🙂

व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच पण ते त्वचा, केस, आणि नखांवर प्रतिबिंबित होत असतात. नियमित व्यायाम करणार्‍यांचे केस भराभर वाढतात व त्याच्यावर उत्तम चकाकी असते. अशा व्यक्तींची त्वचा नितळ असते आणि नखांची वाढसुध्दा निरोगीपणे होत असते.


*3) शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो...*🙂

आपल्या शरीरामध्ये मेंदू, हृदय, हात, पाय इत्यादी अनेक अवयवांची जोडी (दोन) असते – डावे आणि उजवे. त्यांच्यात जेवढा चांगला समन्वय असेल तेवढा जीवनाचा दर्जा चांगला असतो. नियमितपणे व्यायाम केल्याने डाव्या आणि उजव्यामध्ये चांगला समन्वय साधला जातो.


*4) शरीराची कार्यक्षमता वाढते...*🙂

नियमितपणे व्यायाम करणार्‍यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते आणि त्यामुळेच त्यांची उर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात.


*5) मन सकारात्मक राहते...*🙂

व्यायाम करणार्‍यांची विचार करण्याची पध्दत सकारात्मक असते त्यामुळे त्यांची उत्पादकताही चांगली असते. कमी उर्जेमध्ये आणि कमी वेळेमध्ये उत्तम काम करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झालेली असते. कोणत्याही गोष्टीचा आळस येत नाही. उत्साहवर्धक वाटते.

*---------------------*


*कंबर दुखी.....*🙂


*१. बाभळीची साल...*

 १.१ बाभळीची साल काढायची.

 १.२ पाण्यात टाकुन कडक उकळवा.

 १.३ त्या पाण्याने गुढघे किंवा पाय दुखत असेल तिथून धुवून टाखा. १० मिनटात फरक पडतो. 


*२. जवस...* 

 २.१ रोज सकाळ संद्याकाळी बडी सौफ झाल्यासारखे जेवण झाल्यावर जवस खा.

 २.२ जवस शरीरातील वंगण सारखे काम करते, गुडखे दुखी ला खूप फरक पडतो.


*३. पांढरे तीळ...* खात जा, हाडे मजबूत होतात.


*४. एरंडेल तेल...*

 ४.१ भाकरीचा गोळ्यात अर्धा चमचा एरंडेल तेल घाला.

 ४.२ त्याची भाकरी १५ दिवस रोज रात्री जेवताना खा.

 ४.३ पंधरा दिवस करा हे, याने गुढघे दुखी, कंबर दुखी बरी होते.


*५ तिळाचे तेल...*

 ५.१ गुडखे फारच दुखत असतील तर, तिळाचे तेल सकाळ - संद्याकाळ प्या.

 ५.२ त्या वर कोमट पाणी प्या.

 ५.३ पंधरा दिवसात गुडखे दुखी थांबते.


*संतोष ढगे,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

ज्ञानात वृद्धी होण्यासाठी वाचन महत्वाचे

 ज्ञा





नात वृद्धी होण्यासाठी वाचन महत्वाचे


बँक व्यवस्थापक आतिष म्हात्रे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


अलिबाग, (प्रतिनिधी) : जीवनात पुढे जाऊन चांगले करिअर घडवायचे असल्यास आणि ज्ञानात वृद्धी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने हाती मिळेल त्या पुस्तकाचे वाचन करावे. असे मत अलिबागच्या एन.के.जी.एस.बी. या बँकेचे शाखा व्यवस्थापक आतिष म्हात्रे यांनी आज येथे केले.


रायगड जिल्हा फोटोग्राफर्स अँन्ड व्हीडिओग्राफर असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन व अश्विनी टीचर्स क्लासेस अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या स्व. अनंत पाटील सभागृहात अलिबाग तालुक्यातील दहावी व बारावी परिक्षेत चांगले यश संपादन केलेल्या गुणवंतांच्या गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही यावेळी असोसिएशनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.


चांगले करिअर घडविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शक्यतो परदेशी जाऊन चांगले शिक्षण घ्यावे असे सुचवितांनाच आपली संगत चांगल्या माणसांबरोबर असल्यास जीवनात आपण चांगले यश संपादन करु शकतो असेही म्हात्रे म्हणाले. अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा सुप्रसिद्ध वकील मानसी म्हात्रे यांनी गुणवंतांचा सत्कार करताना दहावी आणि बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असून, या टप्प्यावरच त्यांच्यात सामाजिक संस्कार रुजविण्याचे काम असोसिएशनने केल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले. अलिबाग नगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुप्रसिद्ध वकिल प्रविण ठाकूर यांनी गुणवंतांचे अभिनंदन करीत या गुणवंतांचा सन्मान केल्याबद्दल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले. अश्विनी क्लासेसच्या अश्विनी मेहता यांनी पालकांना सुचना करताना पालकांनी आपले निर्णय मुलांवर लादू नका असे सांगत, त्यांना त्यांचे करिअर करण्यासाठी त्यांनाच निर्णय घेऊ द्या असे आवाहन केले.  


अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचे हे १५ वे वर्षे असून, ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्य़ाचे सांगितले. या कार्यक्रमाबरोबरच अन्य सामाजिक उपक्रमही असोसिएशनतर्फे राबविले जात असल्याचे मालोदे यांनी सांगितले. याप्रसंगी आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, सचिन राऊळ, रायगड फोटोग्राफर्स असोसिएशनचे खजिनदार जितेंद्र मेहता, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, अलिबागकर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतम सुतार यांनी केले, तर अमोल नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले .....................................समाप्त......................................

वारी -लबाड लांडगा द्वांग करताय, लगीन करायचं सोंग करतय कटू अनुभव

 "संस्कृतीची कीर्ती सांभाळली पाहिजे"

वारी -लबाड लांडगा द्वांग करताय, लगीन करायचं सोंग करतय 

"अति तिथे अवज्ञा" हा जगाचा नियमच आहे मित्रहो..

वारीत चालणारा प्रत्येकजण वारकरी नसतो. त्याला पोट असलं तरीही ते माणसाचं पोट असतं, बकासुराचं नसतं, हे आपण लक्षात कधी घेणार?


वर्षानुवर्षं मीच काय, माझ्यासारखे शेकडो लोक पाहत असतील - विविध पदार्थ किंवा वस्तू वाटणाऱ्या लोकांच्या अंगावर ही वारीत चालणारी माणसं चक्क धावून जातात. त्यांच्या हातून पदार्थ अक्षरशः ओरबाडून घेतात. वाटणाऱ्या माणसाला प्रचंड धक्काबुक्की करतात. कधी चिमटे काढतात, कधी त्याच्याशी अर्वाच्य भाषेत भांडतात सुध्दा...!


आज माझ्या शेजारी एक बाई बिस्किटांचे पुडे वाटण्यासाठी उभ्या होत्या. त्या अगदी शांतपणे देवाचं नाव घेत घेत पुडे वाटण्याच्या प्रयत्नात होत्या. पण पंधरावीस जणांनी त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांची पिशवी चक्क हिसकावून घेऊन तिथून पोबारा केला. झडप घालणारे सगळे वारकरी पोशाखातलेच होते. त्यात स्त्रियाही होत्या. कपाळाला वारकरी गंध होतं, गळ्यात तुळशीची माळ होती, हातात पताका आणि टाळ होते. म्हणजे वरवर पाहता तरी वारकरी संप्रदायातीलच वाटले. पण त्यांनी त्या बाईंना धक्काबुक्की केली, त्यांच्यावरच आवाज चढवला आणि त्यांना धाडकन खाली पाडलं..! 


बरं, हे सगळं टोळकं ( कारण, ह्या प्रकारानंतर त्यांना वारकरी कोण म्हणेल?) ज्या वारीत सामील झालं होतं, त्या संतश्रेष्ठींना त्यांच्या काळात एक साधा खापराचा तुकडा सुध्दा लोकांनी मिळू दिला नव्हता, हा इतिहास आहे. पण केवळ त्या संतांच्या श्रेष्ठत्वामुळे आज लोक ह्यांना वारकरी समजून रेनकोट वाटतायत, हेल्थ कीट वाटतायत, खाद्यपदार्थ तर अमर्याद उपलब्ध आहेत, मोफत दवाखाना आहे, मोफत रुग्णवाहिका आहे, पिण्याचं शुद्ध पाणी मोफत उपलब्ध आहे...! पण ह्या सगळ्या गोष्टी योग्य त्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत का? याचा पत्ताच नाही. 


कोणा एका अज्ञात परम बुद्धिमान दात्यानं आज लक्ष्मी रस्त्यावर चिकू वाटप केलं. लोकांनी घेताना मोठ्या हातानं घेतले, पण खाल्ले नाहीत. अनेकांनी चालता चालता तसेच पायाखाली टाकून दिले. त्या कुस्करलेल्या चिकूवरुन एका आजींचा पाय घसरला आणि त्या जोरात पडल्या. पलिकडून एक तरुण मोठ्या उत्साहात स्मार्टफोनवरुन गर्दीचे व्हिडिओ काढत होता, त्याचं पाठीमागं लक्षच नव्हतं. अनपेक्षितपणे त्याचा पाय अडखळला आणि तो उंचापुरा, सुदृढ तरुण त्या आजींवर धाडकन पडला. हा सगळा अनर्थ एका बापड्या चिकूमुळे घडला असला तरी, त्या चिकूची शेकडो भावंडं लोकांमध्ये वाटून टाकून, भरघोस पुण्य पदरात पाडून घेतल्याच्या आनंदात तो विवक्षित दाता निवांत होता..! 


वारकरी म्हणून वावरणारे कितीतरी लोक खरे वारकरी नाहीतच, हे सहज लक्षात येतं. पिशव्या,पोती,बोचकी असं जे मिळेल ते गच्च भरुन घेण्याकडे कल असणारे हजारो लोक आहेत. यांच्यामुळे भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा अपमान होत नाही का? अन्नाची प्रचंड नासाडी अन् अपमान करणाऱ्यांकडून वारकरी संप्रदायाचा अपमान होत नाही का? आपण वारकरी आहोत, पोटार्थी नाही, याची जाणीव यांना कुणी का करुन देत नाहीत? हाच प्रश्न फार महत्वाचा आहे. ही माणसं निश्चित अडाणी आहेत. कदाचित वारकरी संप्रदायाची शुचिता त्यांना माहितीही नसेल. पण वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्यांचं काय? 


वारकरी संप्रदायात नियम पाळण्याला आणि वडीलधाऱ्यांचा मान राखण्याला फार महत्त्व आहे. तुळशीची माळ गळ्यात घातली की,जगण्या-वागण्याची नीती पाळलीच पाहिजे. जे आपलं नाही किंवा ज्यावर आपला काहीही अधिकार नाही, त्याचा हव्यास धरणं वारकरी संप्रदायात पूर्ण निषिद्ध आहे. ज्यातलं आपल्याला काहीही माहिती नाही, आणि ज्याचे संभाव्य परिणाम काय होतील, याची कल्पना करण्याइतपत बुद्धी नाही,अशा माणसानं तर मौनातच राहायला हवं. 


वेळ काय आहे, प्रसंग काय आहे आणि आपण कसं वागतो आहोत, याचं साधं भान असू नये, याचं वाईट वाटलं. मी हौशी वारकरी नाही तर, मी वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, याचं भान त्या विद्यार्थ्यानं सांभाळणं अगदी स्वाभाविक अपेक्षित होतं. "आत्ताचा क्षण संपूर्ण संप्रदायाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा क्षण असतो. माझ्यासारख्याच अनेकांना प्रस्थानप्रसंगी आत जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. कितीतरी वारकरी माझ्या वयाच्या तिपटीने मोठे असूनही त्यांनाही पास मिळालेला नाही. हजारो लोक लांबून लांबून पायी चालत आलेले असूनही त्यांनाही प्रस्थानप्रसंगाचा पास नाही. आम्ही तर आळंदीतच राहतो आणि माऊलींचं दर्शन रोजच घेतो. पण आजचा प्रसंग वेगळा आहे. कसलाही अधिकार नसताना मी नियम मोडणं योग्य ठरणार नाही." असा विचार यांना का करता आला नाही ? हा फार महत्वाचा प्रश्न आहे.


पण काहीही कारण नसताना नियम मोडल्यानं सोहळ्याला गालबोट लागलं. वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ते लागलं. मग मीडियानं त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना प्रश्न का विचारले नाहीत? हे विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांच्या ऐकण्यात नाहीत का? ज्यांना परवानगीच नव्हती असे विद्यार्थी अनधिकृतपणे घुसत होते तेव्हा त्यांचे संस्थाचालक काय करत होते ? असे प्रश्न राहुल कुलकर्णींनी विचारले नाहीत. "इतक्या वर्षांत असं कधी झालं नाही, मग आताच असं कसं झालं ? आणि यात पोलिसांची चूक आहे" असंच ते म्हणत राहिले. वारंवार म्हणत राहिले. ब्रेकिंग न्यूज सुरु राहिली, सोशल मीडियावर पडसाद उमटत राहिले. परिणाम व्हायचा तोच झाला. लोकांनी राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावर प्रचंड शिवीगाळ केली. पुन्हा एकदा लोक त्यांच्या जातीवर गेले. महाराष्ट्रातल्या अत्यंत शुभ प्रसंगी आपण चुकीची गोष्ट ब्रेकिंग न्यूज म्हणून लावल्यानं लोक देवेंद्र फडणवीसांच्या थेट जातीवर गेले, याचं मिडीयाला सोयरसुतक नाही...!


वीस बावीस वर्षांचा मुलगा स्वतःच नियम मोडून, पुन्हा "महाराष्ट्रात असं पुढच्या काळातही घडू शकतं" असं म्हणतो, त्याच्या या मताशी मिडिया सहमत कसा होतो? सगळी जाणती माणसं याला थांबवण्याऐवजी दुजोरा कसा काय देतात? त्याचा संबंध ब्राह्मण जातीशी लावून लोक मोकळे कसे होतात? आणि हे सगळं प्रकरण पेटवून देण्यात आपल्या टीआरपी विषयक हावरटपणाचा वाटा सगळ्यात मोठा आहे, हे मिडीयाला अजूनही समजत नाहीय? 


आपल्या स्वार्थापेक्षा आपल्या संप्रदायाची, आपल्या सांस्कृतिक परंपरांची आणि आपल्या सामाजिक शांततेची प्रतिष्ठा फार मोठी आहे, याची जाणीव प्रत्येकालाच असली पाहिजे. त्या परंपरेला आपण झळाळी प्राप्त करुन देऊ शकत नसू तरी एकवेळ चालेल. पण तिचा अपमान होईल असं वागण्याचा अधिकार आपल्याला कुणीही दिलेला नाही, हेही समजून घेण्याची गरज आहे. वडीलधाऱ्यांनी आणि अनुभवी जाणत्यांनी तरुणांना नीट समजावण्याची गरज आहे. प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. ज्याला त्याला आपलं उत्तरदायित्व नीट ओळखता आलंच पाहिजे. 


वारी सगळ्यांचीच आहे. ती जशी देणाऱ्यांची आहे, तशीच ती घेणाऱ्यांचीही आहे. तिथं प्रत्येकाला स्वीकृती आहे. पण वारीचीही एक आचारसंहिता आहे, तिचा विचार प्रत्येकानंच केला पाहिजे. वारी निर्विघ्न पार पाडण्याचं उत्तरदायित्व प्रत्येकाचं आहे. 


संप्रदाय सगळ्यांचाच आहे. पण त्याचेही नियम आहेत, त्याचीही बंधनं आहेत. सामाजिक नैतिकतेची आणि शिस्तीची बंधनं तर निश्चित आहेत. "नाठाळाचे माथी हाणू काठी" असं साक्षात् तुकोबारायांचं वचन आहे. त्याचा विसर संप्रदायाच्या विद्यार्थ्यांनाच पडावा, हेच आश्चर्य आहे. "मी कुणी विशेष आहे" असं कधी ज्ञानोबाराय - तुकोबाराय सुद्धा म्हणाले नाहीत, तिथं माझी काय पात्रता? असा विचार हे विद्यार्थी करु शकले नाहीत, हे या घटनेतून उघड झालं आहे. 


प्रत्येकाला सुबुद्धी देण्यासाठी परमेश्वर आहेच. पण, एकूणच सुधारण्याची आणि बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्या सगळ्यांनाच...!


मयुरेश डंके

उष्णतेमुळे सतत तोंड येतय? मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय करत मिळवा आराम.....*

 *उष्णतेमुळे सतत तोंड येतय? मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय करत मिळवा आराम.....*


 उन्हाळा सुरु होताच तोंड येण्याची अर्थात अल्सरची समस्या वाढू लागते. यावेळी काही खाल्लं किंवा अगदी पाणी पितानाही किंवा बोलतानाही वेदना होतात. यामागे पोटात वाढती उष्णता, मसालेदार आणि आम्लयुक्त अन्नाचे सेवन, निर्जलीकरण, जीवनसत्व बी आणि सी यासारख्या पोषक तत्वांची कमतरता ही कारणे आहेत. हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण जेवण कमी करतात किंवा जेवतच नाहीत, पण यानेही ही समस्या न सुटता आणखी वाढते. कारण पोटात अन्न नसल्याने अॅसिडीटी होते, ज्यामुळे उष्णता वाढते. अशावेळी तोंड येण्याचा त्रास आणखी वाढतो. यामुळे तोंड येण्याच्या समस्येपासून आराम मिळावा यासाठी आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत जे तुम्हाला मदत करु शकतात.


*१) खोबरेल तेल...*

खोबरेल तेलात दाहकविरोधी गुणधर्म असल्याने ते सूज आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करते. तोंडातील अल्सरचे चट्टे कमी करण्यासाठी तुम्ही कापसाचा तुकडा खोबरेल तेलात बुडवून ते प्रभावित भागावर लावा. यामुळे तुम्हाला अल्सरच्या समस्येपासून आराम मिळेल.


*२) मीठाचे काही...*

मिठाच्या पाण्याचे गुळण्या केल्याने तोंडातील अल्सरचे फोड अथवा चट्टे कमी होतात. मीठ हे संक्रमण बरे करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाका आणि चांगले मिसळून झाल्यावर त्याच्या गुळण्या करा.


*३) काळे मनुके...*

तोंडातील लाल वेदनादायी चट्टे कमी करण्यासाठी तुम्हा काळे मनुके सुमारे ३ तास पाण्यात भिजवून ठेवा, रात्री झोपण्यापूर्वी ते खा, यामुळे पोटातील उष्णता कमी होत अल्सरपासून आराम मिळतो.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


20 परिषदेत उद्यापासून पुण्यात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विषयावर बैठक

 -20 परिषदेत उद्यापासून पुण्यात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विषयावर बैठक


‘रन फॉर एज्युकेशन’च्या माध्यमातून शिक्षणाबाबत जागृती करणार


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


            मुंबई, ता. 16 : भारतात होत असलेल्या जी-20 परिषदेअंतर्गत चौथ्या शैक्षणिक कार्यगटाची बैठक शनिवार दि. 17 जून पासून पुणे येथे होत आहे. या बैठकीत ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ (फाऊंडेशनल लिटरसी अँड न्युमरसी) (एफएलएन) या विषयावर चर्चा होणार असून शिक्षणाबाबत जागृतीसाठी 20 जून रोजी राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक स्तरावर ‘रन फॉर एज्युकेशन’चे आयोजन केले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले, जी-20 परिषदेअंतर्गत चौथ्या शैक्षणिक कार्यगटाच्या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य यजमानपदाची भूमिका पार पाडीत आहे. ही बैठक दिनांक 17 ते 22 जून, 2023 दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होत आहे. बैठकीमध्ये विविध प्रकारच्या आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा समावेश करून ‘ब्लेंडेड लर्निंग’ ही संकल्पना राबवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामध्ये विशेषत: वय वर्ष 3 ते 6 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानामध्ये वाढ करण्यावर भर देण्यात येत आहे. विविध राज्यांमध्ये या संदर्भात राबविण्यात येत असलेल्या उत्तम कार्यक्रमांची माहितीही सादर करण्यात येणार आहे.


            मुलांच्या शिक्षणाची सुरूवात मातृभाषेतून झाली तर मुलांना ते ज्ञान आत्मसात करणे सोपे जाते व त्यांना शिक्षणाप्रती आत्मविश्वास वाढतो हे जागतिक स्तरावरील अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. ही बाब विचारात घेऊन मुलांच्या पायाभूत शिक्षणाचा पाया भक्कम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी राज्यात शाळापूर्व तयारी अभियान (पहिले पाऊल) राबविले जात आहे. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये त्यांच्या पालकांना समाविष्ट करून घेतल्यामुळे पालक समुदाय विशेषत: माता-पालक मुलांच्या शिक्षणात अधिक सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. पहिले पाऊल उपक्रमाचे भारत सरकार व जागतिक बँकेने विशेष कौतुक केले असून इतर राज्यांनासुद्धा अशाच प्रकारे अभियान राबविण्याचे सुचविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


            दिनांक 20 जून, 2023 रोजी राज्यातील सर्व आठ शैक्षणिक विभागीय स्तरांवर ‘रन फॉर एज्युकेशन’ रॅली आयोजित करण्यात येत आहे. या रॅलीमध्ये प्रत्येक विभाग स्तरावर किमान 500 विद्यार्थी सहभागी होतील. त्यांना टी शर्ट आणि टोपी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक सुदृढता निर्माण व्हावी, खेळांविषयी आवड निर्माण व्हावी, आनंददायी शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी तसेच नवीन शैक्षणिक धोरण जनसामान्यांपर्यंत पोहचावे यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले.


            शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना कौशल्य आधारित शिक्षण मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडण्यात आली आहेत. आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश तसेच बूट आणि सॉक्स देखील देण्यात येत आहेत. टीसी अभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचा शालेय प्रवेश सुलभ करण्यात येत आहे. याचबरोबर शाळांमधून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.


0000




 


जलजीवन, स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणीमिशन मोड’वर करावी

 जलजीवन, स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणीमिशन मोड’वर करावी


- मुख्य सचिव मनोज सौनिक


 


            मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र हे विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आघाडीवर असलेले राज्य आहे. त्यामुळे जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी मिशन मोडवर करण्यावर सर्व जिल्ह्यांनी भर द्यावा. स्वच्छ भारत मिशनमध्ये महिलांचा आणि स्वयंसहायता गटांचा सहभाग घेऊन गाव ‘ओडीएफ प्लस’ करून स्वच्छ महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करावे, असे निर्देश मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आज दिले.


            राज्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) या कार्यक्रमांच्या जिल्ह्यांच्या प्रगतीचा आढावा दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्य सचिव श्री. सौनिक यांनी केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन, सहसचिव जितेंद्र श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात घेतला. या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जलजीवन मिशनचे संचालक रणजित कुमार, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वित्त आणि नियोजन विभागाच्या सचिव श्रीमती ए. शैला यांसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य अभियंता आदी उपस्थित होते.


                स्वच्छता मोहिमेबाबत ग्रामीण भागात राज्यस्तरीय जनजागृती मोहिम राबविण्याच्या सूचना करीत मुख्य सचिव श्री. सौनिक म्हणाले, सामान्य माणसांशी निगडीत असलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामविकास विभागाने विशेष मोहीम हाती घ्यावी. गुणवत्ता व दर्जात्मक कामे करण्यावर भर द्यावा. स्वच्छतेविषयी लोकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. यासाठी आठवड्यातून केवळ एक दिवस नाही, तर सर्व दिवस हे स्वच्छतेसाठी द्यावे. त्याप्रमाणे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कामाचे नियोजन करावे, अशा सूचनाही श्री सौनिक यांनी यावेळी दिल्या.


            राज्यात जलजीवन मिशनमधील काही कामे वन, रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ना - हरकतीसाठी प्रलंबित आहे. या कामांना तातडीने ना - हरकत देवून कामे पूर्ण करावी. प्रकल्प प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी शाळा, अंगणवाड्या व अन्य शासकीय इमारतींच्या पाणी पुरवठ्याबाबत सर्वेक्षण करावे. जिल्ह्यातील संपूर्ण शाळा, अंगणवाडी यांना 100 टक्के पाणी पुरवठा होण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.


               केंद्रीय सचिव विनी महाजन यांनी जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) ची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे करावी. गावपातळीवर पाणी पुरवठा समित्या कार्यान्व‍ित कराव्यात. त्यासोबतच स्वयंसहायता गटांनाही सक्रिय करावे.


            ग्रामसभा घेऊन गाव ओडीएफ प्लस झाल्याचे जाहीर करावे. ओडीएफ प्लस गाव हे आदर्श गाव आहे. त्यामुळे गाव आदर्श ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. गावातील प्रत्येक घरात नळ जोडणी द्यावी. कुणीही स्वच्छ पाणी पुरवठ्यापासून वंचित राहू नये. यादृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.


               सहसचिव श्री. श्रीवास्तव यांनी स्वच्छ भारत अभियान (ग्रा)चा आढावा घेत गोवर्धन प्रकल्प, बायोगॅस व कचरा निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या. जलजीवन मिशनचे संचालक रणजित कुमार यांनी यावेळी जल जीवन मिशनच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीदरम्यान मुख्य सचिव श्री. सौनिक यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यांचा आढावा घेतला.


००००

Featured post

Lakshvedhi