Wednesday, 17 May 2023

जमिन अधिग्रहण पद्धत, मोबदला देण्याची कार्यप्रणाली निश्चित करावी

 जमिन अधिग्रहण पद्धत, मोबदला देण्याची कार्यप्रणाली निश्चित करावी


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

            मुंबई, दि. 16: सामुहिक आणि वैयक्तिक वनहक्क अंतर्गत प्राप्त झालेले वनपट्टे शासकीय किंवा निमशासकीय प्रकल्पासाठी संपादित केल्यानंतर जमिन अधिग्रहण करण्यासाठीची पद्धत आणि अधिग्रहीत जमिनीसाठी द्यावयाचा मोबदला याबाबतची कार्यप्रणाली निश्चित करण्यात यावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज दिले.


            वैयक्तिक वनहक्क धारकांची गाव नमुना नंबर 7/12 च्या धारण धिकार सदरी भोगवटादार वर्ग -2 नोंदी घेणे आणि अन्य विषयांच्या अनुषंगाने गठित अभ्यास समितीची बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.


            एखाद्या प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहीत केल्यास त्यांना भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना नुकसान भरपाई दिली जाते. ही नुकसान भरपाई किंवा मोबदला नेमका किती असावा याचा अभ्यास करण्यात यावा, असे यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            वनहक्क प्राप्त धारकांना बँकेकडून कर्ज मिळण्यास अडचण येणार नाही यासाठी आवश्यक असणारे परिपत्रक पुन्हा एकदा निर्गमित करण्यात यावे, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी दिल्या.


            वनहक्क निश्चित करण्यासाठी कमीत कमी दोन पुरावे सादर करणे आवश्यक असते. हे नेमके दोन पुरावे कोणते असावे याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्यात याव्या, अशा सूचना मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केल्या.


            अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारणा नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये वैयक्तिक वनहक्क धारकांची गाव नमुना नंबर 7/12 सदरी भोगवटादार वर्ग-2 (नवीन व अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या जमिनी) अशी नोंद घेणेबाबत महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती 24 मार्च 2023 रोजी नियुक्त करण्यात आली आहे. या अभ्यास समितीची पहिली बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या समितीने सर्व बाबींचा अभ्यास करुन शिफारशींचा अहवाल शासनास सादर करणार आहे.


            भूसंपादन केल्यानंतर मोबदला न मिळणे, शेती कर्ज मिळण्यास होणाऱ्या अडचणी, शासनाच्या इतर शेती विषयक योजनांचा लाभ मिळण्यास येणाऱ्या अडचणी, वनहक्काच्या अनुषंगाने इतर सूचना याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.


०००

चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातकार्यप्रणाली तयार करण्यात येणार

 चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातकार्यप्रणाली तयार करण्यात येणार


 -सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


 


            मुंबई, दि. 16: महाराष्ट्रात मराठीसह अन्य विषयांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळेच येणाऱ्या काळाम चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये प्राईम टाईम उपलब्ध करुन देण्याबाबतची बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे, मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक तसेच चित्रपटगृहांचे मालक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, निश्चित कार्यप्रणाली करण्यामागे सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार असून यासाठी गृह विभागासह विविध विभागांचे समन्वय आवश्यक असणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली करण्यात येईल.


            आज झालेल्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी येत्या 15 दिवसांमध्ये मराठी चित्रपट निर्मात्यांनी आपली निवेदने द्यावीत जेणेकरुन याविषयाबाबत विस्तृत बैठक 15 जूननंतर घेण्यात येईल असे यावेळी सांगितले. आज अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असताना याबाबतही काही नियमावली तयार करता येईल का याबाबतचा अभ्यासही करण्यात यावा अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.


००००

सातारा जिल्ह्यातील धरण प्रकल्पाच्या प्रलंबित कामांना गती द्यावी

 सातारा जिल्ह्यातील धरण प्रकल्पाच्या प्रलंबित कामांना गती द्यावी


- मंत्री शंभूराज देसाई.

            मुंबई, दि. 16 : सातारा जिल्ह्यातील तारळी धरण, मोरणा गुरेघर प्रकल्प व उत्तरमांड प्रकल्पाच्या विविध प्रलंबित मंजूर कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.


            आज मंत्रालयात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील धरण प्रकल्पातील विविध प्रलंबित कामांसंदर्भात बैठक झाली.


            या बैठकीस सचिव राजेंद्र मोहिते, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे उपस्थित होते.


            मंत्री श्री. देसाई यांनी तारळी धरण प्रकल्पातील 100 मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनांच्या मंजूर कामांच्या सद्यस्थितीचा व अन्य प्रलंबित कामांचा आढावा यावेळी घेतला. तारळी धरण प्रकल्पांतर्गत टप्पा क्र.2 अंतर्गत तारळे, बांबवडे, धुमकवाडी, आवर्डे व कोंजवडे या योजना लवकरात लवकर पूर्ण करुन कार्यान्वित कराव्यात. तसेच उपसा सिंचन योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

कोयना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने सातारा जिल्ह्यात जमीन देणार

 कोयना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने सातारा जिल्ह्यात जमीन देणार


- मंत्री शंभूराज देसाई


            मुंबई, दि. 16 :- कोयना प्रकल्प हा राज्यातील सर्वात जुना प्रकल्प असून हा प्रकल्प मूळ सातारा जिल्ह्यातील आहे. कोयना प्रकल्पास निश्चित असे लाभक्षेत्र नाही. काही कोयना प्रकल्पग्रस्तांना अद्याप काहीही पर्यायी जमीन मिळालेली नाही. त्यामुळे कोयना प्रकल्पग्रस्तांचा वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी उच्चस्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने सातारा जिल्ह्यात जमीन देण्यात येणार असल्याचे कोयना प्रकल्पग्रस्त संदर्भातील उच्चस्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.


            आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली.


            या बैठकीस मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी उपस्थित होते.


            मंत्री श्री.देसाई म्हणाले की, राज्याच्या विकासात कोयना धरणाचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाकडे बघितलं जात. या धरणासाठी प्रकल्पग्रस्त झालेल्या कुटुंबांचा त्याग मोठा आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांना अद्याप पर्यायी जमीन मिळाली नाही. अशा प्रकल्पग्रस्तांचे पर्यायी जमिनी संदर्भात तातडीने कार्यवाही करावी. कोयना प्रकल्पग्रस्त हा मूळ सातारा जिल्ह्यातील असून त्या जिल्ह्यात मुबलक पर्यायी जमीन उपलब्ध असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या जमीन कोयना प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील आहेत. सातारा जिल्ह्यातील पुनर्वसन भूसंचायातील जमिनीसाठी कोयना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याबाबत राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीकडे शिफारस करावी, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.


            मंत्री श्री.देसाई म्हणाले, जिल्हाधिकारी सातारा यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांना सातारा जिल्ह्यातील पुनर्वसन भूसंचायातील जमिनी मागणी करण्याबाबत कोयना प्रकल्पग्रस्तांना आवाहन करून या संदर्भात एक आठवड्यात शिबिर आयोजित करून पर्यायी जमीन वाटप करण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन करीता अर्ज करताना त्यांच्याकडून कमीत कमी कागदपत्राची मागणी करावी. प्रकल्पग्रस्तांचे संकलन अद्यावत करण्यासाठी आवश्यक माहिती संबंधित जिल्हाधिकारी यांनी व्यक्तिशः लक्ष देऊन पडताळणी करून सातारा जिल्हा कार्यालयास उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मंत्री श्री. देसाई यांनी दिले.

औषधे जेवणापूर्वी घ्यावी की जेवणानंतर ?* 📕

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*
📕 *औषधे जेवणापूर्वी घ्यावी की जेवणानंतर ?* 📕
*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

जेवल्यानंतरच औषधे घ्यावी, असा एक समज समाजात आढळून येतो. गोळ्या गरम पडतात, उष्ण असतात आणि त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जेवण करून मगच औषध घ्यावे; असेही काही जणांना वाटत असते. 

औषधे केव्हा घेणे जास्त योग्य ते आता पाहू. एक मात्र नक्की की आजारी पडल्याखेरीज औषधे कधीही घेऊ नयेत. कारण आजकाल काही लोक स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनतात आणि टिव्हीवरच्या जाहिराती पाहून तापाच्या स्मरणशक्ती वाढवण्याच्या किंवा शक्ती वाढवण्याच्या गोळ्या घेतात. अर्थात याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात.

काही औषधे उपाशीपोटी म्हणजे जेवणाच्या तासभर अगोदर घेतली, तर त्याचे रक्तात शोषण चांगले होते आणि त्यांचा परिणामही चांगला घडून येतो. अशा औषधांमध्ये पेनिसिलीन, अ‍ॅम्पीसिलीन, रिफॅम्पीसीन, टेट्रासायक्लीन या जंतूनाशकांचा समावेश होतो. 

टेट्रासायक्लीन घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर तासभर तरी दूध पिऊ नये. अ‍ॅस्पीरिन, लोहयुक्त गोळ्या औषधे, जीवनसत्त्वे, एरिथ्रोमायसीन, पॅराअमायनो सॅलीसिलीक अ‍ॅसीड आदी औषधे मात्र जेवणानंतर किंवा जेवताना घ्यावीत. 

औषधांमुळे जठराच्या आवरणावर दाह निर्माण होऊन आम्लनिर्मिती वाढते. त्यामुळे मळमळ, उलट्या आदी त्रास होण्याची शक्यता असते. जेल्यूसील सारख्या गोळ्या पोट रिकामे असताना घेतल्यास त्यांचा चांगला परिणाम दिसून येतो.

औषधांबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. प्रत्येक औषध प्रत्येक माणसा प्रमाणेच वेगळे असते. त्यामुळे ते केव्हा, कसे घ्यायचे याची डॉक्टरांकडून माहिती घ्यावी आणि मगच त्यांचा उपयोग करावा. कारण एक लक्षात ठेवा की, औषध आणि विष यांच्यात फक्त देणाऱ्याच्या हेतूचाच फरक असतो.

*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन* 

*संकलक - दिपक तरवडे*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺
*

Tuesday, 16 May 2023

सैन्यदलातील अधिकारी पदभरती परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी

 सैन्यदलातील अधिकारी पदभरती परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी

            मुंबई दि.१५: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी आणि प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यासाठी मुलाखती होणार असून मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात बुधवारी १७ मे २०२३ रोजी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.


            नाशिकमधील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे राज्य शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. २९ मे ते ७ जून २०२३ या कालावधीत एसएसबीचे कोर्स क्र ५३ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.


            इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे दि. १७ मे २०२३ रोजी मुलाखतीस हजार रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी पुणे सैनिक कल्याण विभागाच्या (Department of Sainik Welfare, Pune (DSW) या फेसबुक पेजवर सर्च करून त्यामधील SSB ५३ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्ठांची प्रत भरून सोबत आणावी.


            केंद्रातील कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी कोणतीही एक पात्रता आवश्यक असून त्यासंबंधीचे प्रमाणपत्र सोबत आणावेत. त्यानुसार कंम्बाईंड डिफेंस सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSC-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. किंवा एनसीसी (C) सर्टिफिकेट अ किंवा ब श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.किंवा टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. किंवा विद्यापीठ प्रवेश योजनेसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.


            अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आयडी pctcoic@yahoo.in व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे

चेंबूर येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

 चेंबूर येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन


    मुंबई, दि.16 : मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2022-2023 मधील चेंबूर येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप व स्वीकृती संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, भिक्षेकरी गृह परीसर, आर सी मार्ग, चेंबुर ठिकाणी होणार असून या अर्जांचे वाटप व स्वीकृती दि. 11 मे 23 पासून ते दि.20 मे 2023 पर्यंत करण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांवरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. वसतिगृह प्रवेशासाठी विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.


      मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 750 क्षमतेचे मुलांचे वसतिगृह प्रस्तावित आहे. यापैकी 250 मुलांची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष 2022-23 या वर्षांमध्ये सुरू करण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी निवासस्थान तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपलब्ध झालेले आहेत. या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रस्तावित आहे.


                वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याची पात्रता पुढीलप्रमाणे आहे.विदयार्थी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावा. सदर विद्यार्थ्याकडे पालकांच्या उत्पन्नाचा दाखला असावा.


     विद्यार्थी सन 2022-2023 मध्ये महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशित असावा, स्थानिक रहिवासी नसावा, विद्यार्थ्याचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झालेला असावा. अर्ज सादर केला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही. 


       पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत वसतिगृहात प्रवेशासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, भिक्षेकरी गृह परिसर, आर सी मार्ग, चेंबूर या ठिकाणी अर्ज सादर करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे समाज कल्याण सहायक आयुक्त, प्रसाद खैरनार यांनी केले आहे.


००००



Featured post

Lakshvedhi