Friday, 28 April 2023

बायकोचे वय

 


माकड खेळते नारळ हांडी

 


महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी

 महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी

ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता.

            मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने दिनांक १ मे २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ७.१५ ते ९ वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ७.१५ वाजेपूर्वी किंवा ९ वाजेनंतर करावा, असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.


            या परिपत्रकानुसार मुंबईत शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे राज्यपाल हे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. तर विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील. ज्या ठिकाणी पालकमंत्री उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. तसेच, संबंधित तहसिलदार हे तालुका मुख्यालयी ध्वजारोहण करतील.


            राष्ट्रध्वजाला वंदन करताना ‘राष्ट्रगीत’ म्हणण्यात/ वाजविण्यात यावे. त्यानंतर 'राज्यगीत' म्हणण्यात/ वाजविण्यात यावे. ध्वजारोहण समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९१/(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९८/(ध्वजसंहिता)/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्यात यावी. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल, याचीही दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.


            महाराष्ट्र दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख महाराष्ट्र दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील यांना निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी हे परिपत्रक शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


0000

धर्मादाय रुग्णालयांबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करा

 धर्मादाय रुग्णालयांबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करा


- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत


 


            मुंबई, दि. २७ : धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा व सवलतीच्या दरात उपचार मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.


            धर्मादाय रुग्णालयाच्या कामकाजासंदर्भात आरोग्यमंत्री श्री. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार, धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांच्यासह सार्वजनिक आरोग्य, विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. सावंत म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना जलद व तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी विभागाने धर्मादाय रुग्णालयात राखीव असलेल्या दहा टक्के उपलब्ध खाटांची माहिती देणारे ॲप प्राधान्याने तयार करावे. तसेच हे ॲप सर्वसामान्य नागरिकांना सहज हाताळता येईल, असे असावे. रुग्णांची शिधापत्रिका आणि तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला या दोन कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य कागदपत्रांसाठी अडवणूक होऊ नये, अशा सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिल्या.


             धर्मादाय रुग्णालयात आरोग्य सेवक पदाची भरती आरोग्य विभागाकडून तात्काळ करण्यात यावी. जेणेकरून या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवाकामार्फत योग्य ती मदत अधिक तत्परतेने मिळेल. या योजनांचा लाभ अधिकाधिक गरीब आणि दुर्बल रुग्णांना मिळावा या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे मंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारेसुदानमध्ये अडकलेले

 महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारेसुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत सुखरूप दाखल.

            नवी दिल्ली, 27 : सुदानमध्ये आंतरिक संघर्षामुळे अशांततेचे वातावरण असून तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरु केले आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी रात्री एका विशेष विमानाने एकूण 360 भारतीय नागरिक दिल्लीत सुखरूप दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे. या पाचपैकी तीन नागरिकांना महाराष्ट्र सदन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून स्वगृही पाठविण्यात आले आहे.


थोडक्यात तपशील


            ऑपरेशन कावेरी अंतर्गत विशेष विमान एसवी-3620 जेडाह (सौदी अरब) येथून बुधवारी रात्री इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्ली येथे दाखल झाले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश होता.


महाराष्ट्र सदन सहकार्य कक्ष सुरु


             परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.


            सुदान मधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाचे अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.


            सुदान येथून दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वय केला जात आहे. विमानतळाहून नागरिकांना महाराष्ट्र सदनापर्यंतची वाहतूक व्यवस्था तसेच निवास, भोजन व्यवस्था या कक्षामार्फत करण्यात येत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १६० तक्रारींचे निराकरण

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात१६० तक्रारींचे निराकरण.

            मुंबई, दि. २७ : जी उत्तर वॉर्ड येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात दाखल झालेल्या तक्रारींपैकी १६० तक्रारींचे तत्काळ निराकरण महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. तसेच माहिम कापडबाजार, ढाणागल्ली येथील अंगणवाडीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अथवा कंटेनर अंगणवाडी उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी यंत्रणांना दिले. 


         दादर येथील मुंबई महापालिकेच्या जी उत्तर वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महानगपालिकेचे परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, मुंबई उपनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक यासह अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


          मंत्री श्री.लोढा म्हणाले की, सन २००७ पासून माहिम येथील कापडबाजार, ढाणागल्ली येथे असलेल्या अंगणवाडीसाठी जागेची दीर्घ कालावधीपासूनची मागणी लक्षात घेता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी निर्देशित केले.       


       यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जी उत्तर वॉर्ड येथे बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली.      


            भायखळा ई वॉर्ड येथे गुरूवार दिनांक २८ एप्रिल रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी तीन ते ५.३० या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठीhttps://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते

समाज सुधारण्यासाठी सदानंद महाराजांचे विशेष कार्य

 समाज सुधारण्यासाठी सदानंद महाराजांचे विशेष कार्य

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            पालघर दि. 27 : सिद्ध बालयोगी सदानंद महाराज यांनी समाज सुधारण्यासाठी आणि वनौषधी संगोपनासाठी विशेष कार्य केले आहे. त्यांच्या संस्थेला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            श्री. सदानंद महाराज तीर्थक्षेत्र तुंगारेश्वर डोंगर (वसई) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


             मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कोविड काळात बालयोगी सदानंद महाराज संस्थेने या परिसरातल्या लोकांसाठी उत्तम कार्य केले आहे. सर्वसामान्यांच्या दुःखात धावून जाणे ही परंपरा त्यांनी जोपासली आहे. राज्य सरकार देखील सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी जे निर्णय घेणे आवश्यक आहे, ते आम्ही आतापर्यंत घेतले आहेत. भविष्यातही सर्वसामान्यांचा विचार करूनच आवश्यक ते निर्णय घेतले जातील. सदानंद महाराजांचे कार्य निरंतर चालू राहावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.


             या आश्रमामध्ये दिघे साहेबांसोबत येत असल्याच्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्र्यांनी आश्रम संस्थेकडून भविष्यातही अध्यात्मिक मानवी उन्नतीसाठी आवश्यक असणारे सर्व कार्य व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.


            यावेळी बालयोगी सदानंद महाराज, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, शांताराम मोरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई - विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार आदी उपस्थित होते

.


*********

Featured post

Lakshvedhi