Friday, 24 February 2023

शासकीय अधिकाऱ्यांसाठी 'ताण-तणाव व्यवस्थापन’वर श्री श्री रविशंकर यांचे व्याख्यान.

 शासकीय अधिकाऱ्यांसाठी 'ताण-तणाव व्यवस्थापन’वर

श्री श्री रविशंकर यांचे व्याख्यान.

            मुंबई दि. 23 : प्रशासनात काम करत असताना शासकीय कायद्यांची अंमलबजावणी, उद्देश साध्य करणे, शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम शासकीय अधिकारी आणि कर्मचारी करत असतात. शासकीय कामाचा व्याप असल्याने अधिकाऱ्यांना काहीवेळेस ताण-तणावाला सामोरे जावे लागते. मानसिक तणावाबरोबर शारीरिक तणाव विरहित काम करण्यासाठी ‘ताण-तणाव व्यवस्थापन’ या विषयावर गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 ते 7.00 या कालावधीत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आले आहे.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत सामान्य प्रशासन विभागामार्फत ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचा ‘ताण- तणाव व्यवस्थापन’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, येथे अधिकाधिक अधिकारी यांनी शासकीय ओळखपत्रासह उपस्थित राहावे. तसेच सर्वांना या कार्यक्रमाचे थेट प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि यु ट्यूब या समाजमाध्यमांवरून पाहता येईल.


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


            या लिंकच्या माध्यमातून समाजमाध्यमाद्वारे कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी केले आहे.



लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत सुधारित परीक्षा योजना, अभ्यासक्रम 2025 पासून.

 लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

सुधारित परीक्षा योजना, अभ्यासक्रम 2025 पासून.

            मुंबई, दि. 23 : - राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे.


            ‘या आंदोलनावर उमेदवारांशी आम्ही संवाद साधला होता. त्यांच्याशी वारंवार बोलत होतो. उपमुख्यमंत्र्यांनीही या तरुणांशी चर्चा केली होती. मंत्रीमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करून शासन उमेदवारांच्या भावनांशी सहमत असल्याचे आयोगाला कळवण्यात आले होते. उमेदवारांच्या भावना आणि हित लक्षात घेऊन आपण आयोगाकडे या नव्या परीक्षा पद्धतीसाठी आणखी वेळ देण्याची विनंती केली होती. आयोगानेही या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल आयोगाला धन्यवाद देतो.’ असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचीसुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचीसुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू.

            मुंबई, दि. २३ : राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक स्वरुपात सन २०२३ पासून लागू करण्याबाबतचा निर्णय आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आला होता.


             परंतु ही परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्याची उमेदवारांची मागणी व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती तसेच तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा अशी उमेदवारांनी केलेली मागणी, या बाबी विचारात घेऊन फेरविचारांती सुधारित परीक्षा योजना व नवीन अभ्यासक्रम वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेपासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

राज कपूर, व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासह विशेष योगदान पुरस्काराची रक्कम दुप्पट करणार

 राज कपूर, व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासह

विशेष योगदान पुरस्काराची रक्कम दुप्पट करणार


— सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा.

            मुंबई, दि. 23 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मनोरंजन क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना दरवर्षी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.


            यापूर्वी राज कपूर जीवनगौरव आणि व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे होते आता यापुढे या पुरस्काराचे स्वरुप 10 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असेल. याशिवाय राज कपूर आणि व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप यापूर्वी 3 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे होते, आता या पुरस्काराचे स्वरुप 6 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एका आयोजित कार्यक्रमात लवकरच 2020, 2021 आणि 2022 असे तीन वर्षांचे पुरस्कार वितरित केले जातील, अशी माहितीही श्री. मुनगंटीवार यांनी दिली.


            राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार व विशेष योगदान पुरस्कार निवड समितीची बैठक आज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्यासह दोन्ही पुरस्कार निवड समितीचे सदस्य दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, दिग्दर्शक मधुर भांडारकर, राजदत्तजी, चंद्रप्रकाश द्विवेदी, नीना कुलकर्णी उपस्थित होते.



राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

 राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान


पद्मश्री दर्शना झवेरी यांचा ‘अकादमी रत्न सदस्यता’ ने सन्मा


महाराष्ट्रातील 12 कलावंतांना पुरस्कार.

            नवी दिल्ली, 23 : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील 12 कलावंतांचा समावेश आहे.


            पद्मश्री दर्शना झवेरी यांना मणिपूरी या नृत्यातील विशेष योगदानासाठी ‘अकादमी रत्न सदस्यता’ या संगीत अकादमीच्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            यासह राज्यातून नंदकिशोर कपोते यांना कला प्रदर्शन क्षेत्रातील त्यांच्या सर्वंकष योगदानासाठी गौरविण्यात आले. त्यांच्यासह लोक संगीतकार पांडुरंग घोटकर, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, नाट्य अभिनेते प्रशांत दामले, कथक नृत्यांगना शमा भाटे, दिग्दर्शक कुमार सोहोनी, कळसूत्रीकार मीना नाईक, सुगम संगीत गायक अनूप जलोटा, सतारमेकर मजीद गुलाबसाहेब, ओडिसी नर्तक रबिंद्र कुमार अतिबुद्धि आणि समकालीन नर्तक भुषण लकंद्री यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी आज गौरविण्यात आले.


            येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा व्यासपीठावर उपस्थित होत्या.


            आजच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात सन 2019, सन 2020 आणि सन 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले असून एकूण 128 कलावंताना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात विविध कला क्षेत्रातील 50 महिलांचा समावेश आहे. अकादमी रत्न सदस्यता पुरस्काराचे स्वरूप 3 लाख रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे. तर साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे.


            वर्ष 2019 साठी महाराष्ट्रातील दिग्दर्शन क्षेत्रात योगदान देणारे कुमार सोहोनी यांना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्तीनंतर श्री सोहोनी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, दिग्दर्शनाच्या क्षेत्रात अनेक वर्ष झाली असून याच वर्षी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त होणे हा यथोचित सन्मान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.


            लोक संगीत क्षेत्रात योगदान देणारे पांडुरंग घोटकर यांना त्यांच्या योगदानासाठी सन 2019 च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            सन 2019 साठीचे सतारमेकर मजीद गुलाबसाहेब यांना वाद्य निर्मितीच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.


            सन 2020 साठीच्या पुरस्कारांमध्ये नंदकिशोर कपोते यांना कला प्रदर्शन क्षेत्रातील सर्वंकष योगदानासाठी संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


            हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना सन 2020 च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


            सुप्रसिद्ध सिने तथा नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना नाट्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्तीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत श्री. दामले म्हणाले, मराठी नाटकात काम करण्याचा प्रचंड अभिमान आहे. नाटक हे टिम वर्क असून माझ्यासह निर्माते, सहकलाकार, कुटुंबाचे सदस्य, रसिक प्रेक्षक ते महाराष्ट्रातील, भारतातील वा संपूर्ण जगभरात पसरलेले मराठी नाट्य प्रेमी यांचाही या पुरस्कारात तितकाचा वाटा आहे. आज हा मिळालेला पुरस्कार या सर्वांच्यावतीने मी घेत असल्याचे ते म्हणाले. सोबतच तरूण पिढीला आवाहन करत म्हणाले, चांगल्या कामाचा आनंद आणि पैसे दोन्ही मराठी नाटक देते.


            सन 2020 साठी अभिनेत्री, दिग्दर्शिका कळसुत्रीकार मीना नाईक यांना कळसुत्रीच्या माध्यमातून समाज जागृती तसेच वैविध्यपूर्ण विषयांवर नाटक बसविण्याच्या उल्लेखनीय योगदानासाठी आज संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने त्यांच्या कामाचा सन्मान करण्यात आला.


            सुगम संगीतातील ख्यातनाम गायक अनूप जलोटा यांना संगीत क्षेत्रातील अन्य प्रमुख परंपरा अंतर्गत येणाऱ्या सुगम संगीतासाठी संगीत नाटक अकादमीचा मानाचा सन 2020 साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.


            ओडिसी नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी सन 2020 चा पुरस्कार मुंबईतील रबिंद्र कुमार अतिबुद्ध‍ि यांना प्रदान करण्यात आला. तसेच अहमदनगरचे भूषण लकंद्री यांना समकालीन नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            वर्ष 2021 साठी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शमा भाटे यांना नृत्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.


००००

Thursday, 23 February 2023

मुंबईत शनिवारी रोजगार मेळावा.

 मुंबईत शनिवारी रोजगार मेळावा.

            मुंबई, दि. 23 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी, 2023 रोजी सेंट फ्रान्सिस आयटीआय माऊंट पोनसूर, एस. व्ही. रोड, हिरालाल भगवती हॉस्पिटलजवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचा शुभारंभ होईल.


            या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट संस्था व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. याशिवाय विविध शासकीय आर्थिक विकास मंडळेही मेळाव्यात सहभागी होणार असून त्यांच्यामार्फत स्वयंरोजगारासाठी विविध समाज घटकांकरीता राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर, अभियंते अशा विविध क्षेत्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.


००००

जय शिवाजी

 


Featured post

Lakshvedhi