Tuesday, 7 February 2023

हसते हसते

 


अरे संसार संसार

 छान कविता. 

अरे संसार संसार 

*गरम कढईतल्या मोहरीपेक्षा,*

*माणसं तडतड करत आहेत.*

*काय झालंय कळत नाही,*

*फारच चीडचीड करत आहेत.*


*नातेवाईक असो, मित्र असो,*

*भयंकर स्पर्धा वाढलीय.*

*तेंव्हापासूनच माणसाची,*

*मानसिक अवस्था बिघडलीय.*


*कुणी कुणाला काहीच विचारीना,*

*मनानचं कसंही वागायलेत.*

*आजूबाजूच्या लोकांकडून,*

*जास्तच अपेक्षा ठेवायलेत.*


*कमाई किती, खर्च किती,*

*काहीच कुठे मेळ नाही.*

*भेटायला जाणं, गप्पा मारणं,*

*आता कुणालाच वेळ नाही.*


*कॅपॅसिटी नसतांनाही,*

*खरेदी उगीच करायलेत.*

*Salary व्हायलीय कमी,*

*अन हप्तेच जास्त भरायलेत.*


*शेजारच्यानी Two व्हीलर घेतली,*

*की हा घेतो फोर व्हीलर.*

*दूध बॅग आणायला सांगितली की,*

*मोजीत बसतो चिल्लर.*


*अरे, अंगापेक्षा बोंगा,*

*कशाला वाढवून बसतो.*

*पगार जरी झाली तरी,*

*उदास भकास दिसतो.*


*पर्सनल लोन, Gold लोन,*

*जे भेटेल, ते घ्यायलेत,*

*दिलेले पैसे मागितले तरी,*

*गचांडीलाच धरायलेत.*


*सहनशीलता आणि संयम,*

*कुठे चाललाय कळत नाही,*

*पॅकेज भरपूर मिळायलंय,*

*पण, समाधान काही मिळत नाही.*


*घरी काय दारी काय,*

*नुसत्या किरकीरी वाढल्यात.*

*नवऱ्याला न सांगताच,*

*बायकांनी भिश्या काढल्यात.*


*कितीही साड्या, कितीही पर्स,*

*शर्ट, पँटीला गणतीच नाही.*

*तरीही कुरकुर चालूच असती,*

*धड साडी तर कोणतीच नाही.*


*मग काय ! नवऱ्यानं म्हणावं,*

*तुला अक्कल नाही.*

*बायकोनं म्हणावं,*

*तुम्हालाच काही कळत नाही.*


*दोनदोन दिवस अबोला,*

*कशाऊनहीं भांडणं व्हायलेत.*

*लग्न झालं की पोरं पोरी,*

*वर्षातच घटस्फोट घ्यायलेत.*


*पत्नी पीडित नवऱ्याच्याही,*

*संघटना निघत आहेत.*

*डोळे मोठे करून पोट्टे,*

*बापाकडेच बघत आहेत.*


*दिवेलागण, शुंभकरोती,*

*'स्वस्थ होऊ द्या', गायब झालं,*

*शक्य असेल याच्यामुळेच,*

*माणसां माणसात वितुष्ट आलं.*


*चित्त थोडं शांत ठेऊन,*

*जुनी पाने चाळावी लागतील.*

*यदाकदाचित पुन्हा माणसं,*

*एकमेकाशी प्रेमाने वागतील.* 

🙏🏻

बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू;

 बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू;


बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ.

            मुंबई, दि. 7 : बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवाचा बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर येथे आज शुभारंभ झाला.या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसह पर्यटकांच्या सुविधा मार्गी लागणार असल्याचे बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.


            मंत्री श्री. भुसे यांनी नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बोटीतून बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत प्रवास केला. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.


            यावेळी आमदार मंदा म्हात्रे, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सैनी, नयनतारा कंपनीचे रोहित सिन्हा यांच्यासह विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून प्रवासी सुरक्षित प्रवास करू शकतील. ही सुविधा कमीत कमी दरात असून वेळेचीही बचत होणार आहे. पूर्वी बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया या प्रवासासाठी दीड तास लागत होता. तो आता कमी होऊन 55 मिनिटांपर्यंत आला आहे. या उपक्रमासाठी बंदरे विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने मान्यता दिली आहे. तसेच केंद्र सरकारने केलेली मदतही महत्त्वाची ठरली आहे. पुढील कालावधीत गेटवे ऑफ इंडिया जवळील रेडिओ क्लबजवळ नवीन जेट्टी निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवासी बोटीसाठी सुविधा निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागाच्या पाठिशी असून अशा प्रकल्पांच्या माध्यमातून रस्त्यावरच्या वाहतूक समस्येतून मुक्तता मिळणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. भविष्यात प्रवाशांना आणखी व्यवस्था उभारण्याकरिता ठाणे जवळील 'रॉक क्रिक' चा काही भाग तोडल्यास पालघर, वसई, ठाणे, बेलापूर अशी प्रवासी जल वाहतूक उपलब्ध होईल. अशा वेगवेगळ्या योजनांना विभागाच्या वतीने गती देण्यात येत आहे, मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.


थोडक्यात वॉटर टॅक्सी विषयी


            बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया हे रस्तामार्गे अंतर ४० कि.मी असून त्या करिता अंदाजे १ तास ४५ मिनिटे इतका अवधी लागतो. परंतु बेलापूर ते गेटवे हे जलमार्ग अंतर २४ कि.मी असून त्याकरिता फक्त एक तासाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.


            जेट्टीचे काम हे केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत करण्यात आले असून या कामासाठी 8.37 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत 50:50 या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच वाहनतळ व इतर सुविधांसाठी ठाणे जिल्हा नियोजन समितीकडून 4.35 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला होता. या ठिकाणी 75 चार चाकी आणि 85 दुचाकी वाहनाकरिता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.


            मेसर्स नयनतारा शिपिंग प्रा. लि यांचेकडून नयन XI या बोटीद्वारे ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु आहे. देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार दरम्यान बेलापूर - गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावर धावणार आहे. सकाळी ८.३० वाजता बेलापूर -गेटवे ऑफ इंडिया आणि संध्याकाळी ६.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया -बेलापूर अशा दोन फेऱ्या होणार आहेत. जलवाहतुकीचा प्रवास सर्वसामान्य लोकांकरिता सुलभ, सोईचे व लवकर होण्यासाठी या कंपनीमार्फत सद्यास्थितीत सामान्य बैठकीसाठी रु २५०/- व बिझनेस क्लास करिता रु. ३५०/- इतके तिकीट दर आकारण्यात येणार आहे. या वॉटर टॅक्सीचे ऑनलाईन बुकीग My Boat Ride या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.


            1 जानेवारी 2022 पासून नव्याने सुरु झालेल्या जलमार्गावरील फेरी आणि रो-रो बोटीद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच पाळीव प्राणी, वाहन, माल इत्यादीवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून आकारल्या जाणाऱ्या प्रवासी करात पुढील 3 वर्षासाठी म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत सूट देण्यात आली आहे.


00000

आरे’ वसाहतीचा कायापालट करण्यासंदर्भात कार्यवाही करावी

 आरे’ वसाहतीचा कायापालट करण्यासंदर्भात कार्यवाही करावी


- पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील.

            मुंबई, दि. 7 : ‘आरे’ दुग्धवसाहतीतील पडीक जमिनी वापरात आणून त्याद्वारे शासनाला उत्पन्न मिळेल यासंदर्भात उपाययोजना कराव्यात. आरे वसाहतीचा कायापालट करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.


            गोरेगाव येथील आरे दुग्धवसाहतीसंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री विखे-पाटील बोलत होते. बैठकीला विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आयुक्त श्रीकांत शिपूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. विखे-पाटील यांनी आरे येथील राज्य शासनाच्या विविध विभागांना हस्तांतरीत जमिनी आणि तेथे सुरू असलेले प्रकल्प याबाबत आढावा घेतला. ज्या जमिनी पडीक आहेत, त्या संपादित करून शासनास उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. जे तबेले धारक आहेत, त्यांच्याकडून थकबाकी वसूल करावी तसेच डागडुजी व स्वच्छता राहील या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. पर्यटन स्थळे, नौका विहार, पिकनिक गार्डन, व्यापारी गाळे, पॅराग्रास ठेका, संरक्षण भिंत, रस्ते या ठिकाणांचे संवर्धन व जतन करून ते पुन्हा सुरू करण्यात यावे. आरे वसाहतीतील जमिनींवर जनतेच्या उपयोगी प्रकल्प सुरू करून त्याचा कायापालट करण्यासाठी उपाययोजना आखून अहवाल तयार करावा, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.


०००

खेलो इंडिया’ युथ गेम्स २०२२-२३

 खेलो इंडिया’ युथ गेम्स २०२२-२३


महाराष्ट्राचे नवव्या दिवशी ८३ पदकांसह अग्रस्थान कायम


            मुंबई, दि. ७ : गुजरात मधील राष्ट्रीय क्रीडास्पर्धांपाठोपाठ मध्यप्रदेश येथे आयोजित पाचव्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धेत राज्याच्या संघातील युवा खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. जागतिक स्तरावरील स्पर्धा गाजवण्याची क्षमता असलेले युवा खेळाडू सध्या ‘खेलो इंडिया’ मध्ये पदकांचे मानकरी ठरत आहेत. याच दर्जेदार कामगिरीमुळे महाराष्ट्राचे खेळाडू निश्चितपणे आगामी काळामध्ये ऑलम्पिक सारखी स्पर्धा गाजवतील, ही प्रचंड क्षमता या युवा खेळाडूंमध्ये आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी संघावर कौतुकाचा वर्षाव केला.


            तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान मिळवण्यासाठी महाराष्ट्र संघ ‘खेलो इंडिया’ मध्ये आगेकूच करत आहे. महाराष्ट्र संघाने ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक आणि योगासन खेळ प्रकारांत पदकांचे अर्धशतक साजरे केले. याशिवाय महाराष्ट्र संघाला या तिन्ही खेळ प्रकारात चॅम्पियनशिपचा बहुमान देत गौरवण्यात आले. त्यामुळेच महाराष्ट्र संघाला ८३ पदकांसह नवव्या दिवसाअखेर पदक तालिकेतील आपले अव्वल स्थान राखून ठेवता आले. आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्त काळेने गोल्डन चौकार मारून पुन्हा एकदा महाराष्ट्र संघाला पदक तालिकेत अव्वल स्थानाचा बहुमान मिळवून दिला. त्याचबरोबर महिला युवा धावपटूंनी भोपाळच्या ट्रॅकवर सोनेरी यशाचा पल्ला गाठत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. रिलेमध्ये डबल गोल्डन धमाका उडवत महाराष्ट्राचा संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यादरम्यान जिम्नॅस्टिक मधील संयुक्ता काळे, ॲथलेटिक्स मध्ये रिया पाटील आणि तिच्या सहकारी खेळाडूंची कामगिरी, योगासनात नवयुवा योगपटू यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला यजमान मध्यप्रदेश आणि हरियाणा संघाला धोबीपछाड देत पुन्हा अग्रस्थानी धडक मारता आली.


एकट्या महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघाचा पदकांचा दुहेरी आकडा;


चार संघांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राची सात सुवर्णपदके"


            संयुक्ता काळे, आर्यन , सार्थक, सारा यांच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाला खेलो इंडिया युथ गेम्समधील जिम्नॅस्टिक खेळात वर्चस्व गाजवता आले. एकट्या महाराष्ट्र संघाने या इव्हेंटमध्ये पदकांचा दुहेरी आकडा गाठला. महाराष्ट्राने या खेळ प्रकारात सर्वाधिक १९ पदके जिंकली. यादरम्यान पदक तालिकेत दोन ते पाचव्या स्थानावर असलेल्या चार संघांच्या एकूण सुवर्णांच्या तुलनेन एकट्या महाराष्ट्राने सात सुवर्ण पटकावले आहेत. उत्तर प्रदेश ३, मध्य प्रदेश २, जम्मू-कश्मीर व गुजरात यांचे प्रत्येक १ सुवर्णपदक आहे. यात अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्राच्या नावे सर्वाधिक ७ सुवर्णपदके आहेत.

सर्वाधिक १६ पदके योगासनात


            योगासन खेळ प्रकारात महाराष्ट्र संघाला आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले. पदार्पणातील या योगासन खेळ प्रकारात महाराष्ट्र संघाने सर्वाधिक १६ पदकांची कमाई केली. यामध्ये ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ पूजा दानोळे आणि संज्ञा पाटील यांच्या सुवर्ण यशाने लक्षवेधी ठरलेल्या सायकलिंग क्रीडा प्रकारात सात पदकांची कमाई करता आली.


खो-खो, बॅडमिंटन, बॉक्सिंग मध्ये पदकाचा बहुमान


            महाराष्ट्र संघाने पाचव्या सत्रातील ‘खेलो इंडिया’ युथ गेम्स मध्ये खो खो, बॅडमिंटन आणि बॉक्सिंग मध्ये सोनेरी यशाची मोहीम कायम ठेवत पदकाचा बहुमान पटकावला. नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष खो-खो संघाने सोनेरी यशाचा पल्ला गाठला. तसेच खो-खो मध्ये महाराष्ट्राचा महिला संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला. ठाण्याच्या १४ वर्षीय नाईशा कौरने बॅडमिंटनच्या महिला एकेरीत महाराष्ट्राला रौप्य पदक जिंकून दिले. देविका घोरपडे, उमर शेख आणि कुणाल घोरपडे यांनी अचूक ठोसे मारून महाराष्ट्र संघाला गोल्डन हॅट्रिक साजरी करून दिली.


संयुक्तामुळे जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा


            आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या युवा खेळाडू संयुक्ता काळेने गोल्डन चौकार मारून महाराष्ट्र संघाला खेलो इंडिया मध्ये पदक तालिकेत मोठी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला आता आपले वर्चस्व गाजवता येत आहे. तिच्यामुळे संघातील युवा खेळाडूंना सोनेरी यश संपादन करण्याची प्रेरणा मिळाली. यामुळे महाराष्ट्र संघाने जिम्नॅस्टिक्समध्ये १५ पेक्षा अधिक पदके जिंकण्याचा बहुमान पटकावला आहे.


महाराष्ट्र संघाच्या धावपटूंची कामगिरी कौतुकास्पद


            महाराष्ट्राच्या युवा धावपटूंनी प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये पदकाचा पल्ला गाठला आहे. घवघवीत सोनेरी यश संपादन करणारी महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद ठरलेली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला चॅम्पियनशिपच्या बहुमनाने गौरवण्यात आले आहे.


0000

तत्व

.








 

भवताल"साठी अॅडमिनसांभाळणारी व्यक्ती हवी !

 भवताल"साठी अॅडमिनसांभाळणारी व्यक्ती हवी !


'भवताल'च्या कोथरूड (पुणे) येथील ऑफिसचे कामकाज (अॅडमिनिस्ट्रेशन व इतर बाबी) सक्षमपणे सांभाळू शकेल अशा व्यक्तीच्या शोधात आम्ही आहोत. आपण स्वत: किंवा आपल्या संपर्कात अशा व्यक्ती असल्यास आणि पूर्ण वेळ काम करण्याची इच्छा असल्यास पुढे दिलेल्या लिंकद्वारे लवकरात लवकर संपर्क साधावा.


माहिती व अर्ज करण्यासाठी लिंक:

https://bit.ly/3wRS8q6


संपर्कासाठी ई-मेल:

bhavatal@gmail.com


#भवताल #Bhavatal

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


Featured post

Lakshvedhi