सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 15 December 2022
रोजगार हमी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरपंचांना मार्गदर्शन
रोजगार हमी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरपंचांना मार्गदर्शन
- मंत्री संदिपान भुमरे.
मुंबई, दि. 13 : रोजगार हमी आणि फलोत्पादन योजनांची गाव पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर सरपंचांना मार्गदर्शन करण्याकरिता ‘सरपंच मार्गदर्शन कार्यक्रम’ घेण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील रोहयोंच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणीसंदर्भात राज्यातील सरपंच प्रतिनिधींबरोबर मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार आणि मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.भुमरे म्हणाले, “राज्यात मोठ्या प्रमाणात रोहयोची कामे सुरू आहेत. पानंद रस्ते, विहिरींना मंजुरी देण्यात येत आहे. अनेक उपक्रमांचे नियम व अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. सरपंचांनी शासन निर्णयांचा अभ्यास करावा. गावाच्या विकासासाठी सरपंचांनी रोहयो अंतर्गत येणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना श्री. भुमरे यांनी सरपंचांना दिल्या.
रोजगार हमीची बिले वेळेत उपलब्ध करण्यात यावीत. अकुशल कामांची दर आठवड्याला तर कुशल कामांची बिले एक महिन्याच्या आत मिळावीत. कुशल कामांच्या बिलांच्याबाबतीत आढावा तसेच थकीत बिलांचा आढावा घेऊन ती अदा करण्यात यावीत.
खोट्या तक्रारींची चौकशी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत व्हावी यासह इतर समस्या सरपंच शिष्टमंडळाने यावेळी उपस्थित केल्या. त्यावर मंत्री श्री भुमरे यांनी राज्य शासनाच्या स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल, असे यावेळी सांगितले.
या बैठकीस पंचायत राज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत सर्जेराव पाटील यांच्यासह राज्यातील विविध ठिकाणचे
जी-20 परिषदेत हस्तकला प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद
जी-20 परिषदेत हस्तकला प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद
मुंबई, दि. 14 : जागतिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातील प्रतिनिधी मुंबईत आले आहेत. जी – 20 परिषदेचा आज दुसरा दिवस होता. यानिमित्ताने सांताक्रूझ येथील ग्रॅन्ड हयात येथे महाराष्ट्राच्या हस्तकला उद्योगांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.
महाराष्ट्र राज्य समूह विकास योजना तसेच उद्योग विभागाच्या इतर योजनेचा लाभ घेतलेले हे उद्योग आहेत. यावेळी प्रतिनिधींना औरंगाबादची हिमरू शाल भेट म्हणून प्रदान करण्यात आली. चार स्टॉलमध्ये सात कलांचे प्रदर्शन असून, पैठणी साडी, हिमरू शाल, बंजारा कलाकुसरच्या वस्तू, कोल्हापुरी चप्पल, हुपरी दागिने, सांगली-मीरजेची संगीत उपकरण तयार करणारे समूह, बिद्री कलाकुसर यांचा समावेश आहे.
प्राचीन कला आणि हस्त कलेवर आधारित कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या उद्योजकांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनात उद्योग विभागाने स्टॉल लावले आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनात राज्याची गौरवशाली परंपरा जागतिक पातळीवर नेण्यासाठी या प्रदर्शनात उद्योग विभागाने स्टॉल उभारले आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत
राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत
महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 14 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी आज सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये विविध श्रेणीत राज्याला राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती यांनी सन्मानित केले.
येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’चे औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागातर्फे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह, केंद्रीय राज्य मंत्री कृष्ण पाल, सचिव आलोककुमार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार विविध श्रेणीत आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यातील काही पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आले, तर काही पुरस्कारांचे वितरण केंद्रीय ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते झाले. चित्रकला स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कारार्थींना स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ऊर्जा संवर्धनात लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाला राष्ट्रीय पुरस्कार
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनातील इमारत या श्रेणीत लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड आणि डॉ. ललित ठाकरे, नोडल अधिकारी यांनी स्वीकारला. या श्रेणीतील द्वितीय पुरस्कार अहमदनगर येथील लोकपंचायत ग्रामीण तांत्रिक प्रशिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला.
ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोच्या वतीने ऊर्जेचा वापर कमी करून ऊर्जा बचत करणाऱ्या शासकीय संस्था, महाविद्यालय, औद्योगिक एकके, संस्था आणि आस्थापना यांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
कोल्हापूरची सौंदर्या पाटीलला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक
कोल्हापूरच्या हिराराम गर्ल्स हायस्कूलची नववीत शिकणारी सौंदर्या पाटील या विद्यार्थिनीने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते तिचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी समाजात सातत्याने जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने 2005 पासून दरवर्षी ऊर्जा संवर्धन याविषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. शालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्तर अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाते.
नाशिक येथील किर्लोस्कर ऑईल इंजिनला उत्पादन श्रेणीतील प्रथम पुरस्कार
नाशिक येथील किर्लोस्कर ऑईल इंजिन लि. ला उत्पादन श्रेणीतील प्रथम पुरस्काराने राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा पुरस्कार संस्थेचे उपाध्यक्ष विनोद मेनन आणि प्लांट प्रमुख परेशकुमार जोशी यांनी स्वीकारला.
रेफ्रिजरेटर श्रेणीत पुणे येथील हेयर या खासगी कपंनीला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराने गौरविण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष एन. एस. सतीश आणि पंकज चावला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सिलिंग फॅन या श्रेणीत एटोम्बर्ग या पुणे येथील कंपनीला राष्ट्रपतींनी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराने सन्मानित केले. मनोज मीना आणि श्री दास यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
उद्योग विभागातील ग्राहकोपयोगी वस्तू श्रेणीमध्ये गोदरेज ॲण्ड बॉयस मॅन्युफॅ्कच्युरिंग को.लि., सातारा यांना केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री. सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
उद्योग विभागातील ग्राहकोपयोगी वस्तू श्रेणीमध्ये गोदरजे ॲण्ड बॉयस मॅन्युफॅ्कच्युरिंग को.लि., सातारा यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्पादन श्रेणीमध्ये पुणे येथील टीके इलेवेटर इंडिया प्रा.लि. यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आणि मरेली मदरसन ऑटोमोटिव्ह लाइटिंग इंडिया प्रा.लि. यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, आयुध निर्माण श्रेणीमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी, अंबाझरी, नागपूर यांनाही प्रमाणपत्र देऊन केंद्रीय ऊर्जा मंत्री यांनी गौरविले. तसेच उद्योग विभागातील अप्रवर्तक श्रेणीमध्ये नागपूर येथील कॅल्डेरीस इंडिया रिफ्रॅक्टरीज लि. यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर साधने विभागातील ट्रान्सफॉर्मर श्रेणीमध्ये शिर्डी साई इलेक्ट्रीकल्स लि. (Model No: SSEL 25 5S) यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
‘ईव्ही-यात्रा पोर्टल’ आणि मोबाईल अॅपचा शुभारंभ
वाहनातील नेव्हिगेशन यंत्रणा जवळच्या सार्वजनिक ईव्ही - इलेक्ट्रॉनिक वेहिकल चार्जर विषयी माहिती देऊ शकेल अशा प्रकारचे एक मोबाइल ऍप्लिकेशन ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोने विकसित केले आहे. देशातील ई-मोबिलिटीला चालना देण्यासाठी केंद्रीय आणि राज्य-स्तरीय विविध उपक्रमांची माहिती देणारे संकेतस्थळ आणि सीपीओना त्यांचे चार्जिंग तपशील राष्ट्रीय ऑनलाइन डेटाबेसमध्ये सुरक्षितपणे नोंदणी करण्यास सक्षम करण्यासाठी वेब-पोर्टल विकसित केले आहे.
इलेक्ट्रॉनिक व्हेईकल चार्जरविषयी माहिती देऊ शकेल अशा प्रकारचे EV यात्रा हे एक मोबाइल ऍप्लिकेशन डिझाइन आणि विकसित केले गेले आहे. हे मोबाईल ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअर वरून आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही स्मार्टफोनवर सहजपणे डाउनलोड केले जाऊ शकते आणि सोयीस्करपणे इन्स्टॉल केले जाऊ शकते. आज या ॲपचा शुभारंभ राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला.
आरोग्यवर्धिनी केंद्र, आभा कार्ड नोंदणीत महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार
आरोग्यवर्धिनी केंद्र, आभा कार्ड नोंदणीत महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार
आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी केले अभिनंदन
मुंबई, दि. 14 : महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्र आणि आभा आरोग्य कार्ड नोंदणी कार्यात केंद्र सरकारने निश्चित केलेले लक्ष्य निर्धारित वेळेत पूर्ण केल्याबद्दल आरोग्य विभागाचा वाराणसी येथे झालेल्या समारंभात गौरव करण्यात आला. याबद्दल आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि पथकाचे अभिनंदन केले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने आंतरराष्ट्रीय जागतिक आरोग्य कव्हरेज दिनानिमित्त १० आणि ११ डिसेंबर २०२२ रोजी वाराणसीतील इंटरनॅशनल को-ऑपरेशन ॲण्ड कन्वेन्शन सेंटर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षासाठी ‘आपल्याला हवे ते जग घडवूया : सर्वांसाठी निरोगी भविष्य’ अशी संकल्पना आहे.
या समारंभामध्ये नवीन मोहिमेबाबत चर्चा, क्रॉस लर्निंग, आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या प्रमुख आव्हानांवर चर्चा करण्यात आली. आयुष्मान भारत-आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करणे, आभा कार्ड निर्मिती व दूरध्वनीद्वारे आरोग्य सल्ला (टेली-कन्सल्टेशन) या संदर्भात उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य विषयी प्रतिबंधात्मक, प्रबोधनात्मक तसेच उपचारात्मक सेवा आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत देण्यात येतात. केंद्र सरकारने डिसेंबर, २०२२ पर्यंत १०,३५६ आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्याचे लक्ष्य महाराष्ट्राला दिले होते. राज्याने आजपर्यंत ८३३२ उपकेंद्र (२५३ आयुष आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश), १८६१ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५७९ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, असे एकूण १०,७७२ आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित केले आहेत. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रा. डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
आयुष्यमान भारत डिजिटल अभियान (ABDM) या योजनेची सुरुवात मा. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेली आहे. आभा कार्ड आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा एक भाग असून या कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड म्हणजेच ‘आभा कार्ड’ तयार करीत आहे.
राज्यामध्ये आजअखेर सुमारे १.७२ कोटी जनतेचे आभा कार्ड बनविण्यात आले असून २०.१०.२०२२ ते १०.१२.२०२२ या कालावधीमध्ये १८ लाखाहून अधिक जनतेची आभा नोंदणी करण्यात आली आहे. या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवणारे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्यास गौरविण्यात आले आहे.
याबद्दल आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी मुंबई येथे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव एन. नवीन सोना, संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. नितिन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. प्रकाश पाडवी यांचे अभिनंदन केले.
****
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...









