Sunday, 27 November 2022

व्यर्थ चिंता !

 ◆ व्यर्थ चिंता !

असे म्हणतात की ही एक आयरिश फिलॉसॉफी आहे . 

तुम्ही आजारी आहात व काळजी करीत आहात . 

यामध्ये दोनच शक्यता आहेत......


पहिली , तुम्ही बरे होणार आहात. जर बरे होणार असाल तर काळजीचं कांहीच कारण नाही , नाही का ? 


आणि बरे होणार नसाल तर पुन्हा दोन गोष्टी शक्य आहेत .....


तुम्ही उशिरा बरे तरी व्हाल किंवा तुम्हास मरण येईल . 


जर उशिरा बरे होणार असाल तर काळजी करण्याचे काय कारण ? तुम्ही उशिरा बरे होणारच आहात . 


मृत्यू पावणार असाल तरीही काळजी कसची ? कारण तिथेही दोन शक्यताच फक्त आहेत......


 तुम्ही एकतर स्वर्गात जाल किंवा दुसरी शक्यता नरकात जाल . 


स्वर्गात जाणार असाल तर काळजीच मिटली . पण जरी नरकात जाणार असाल तरीही काळजीचे कारणच काय ? 


कारण तिथे तुमचे सर्व मित्र असणार आहेत व सर्वाना एकत्र भेटल्याचा 'न भूतो न भविष्यती' असा आनंद तुम्हास मिळेल . सर्व मित्रांबरोबर गप्पा मारण्यात तुम्ही नरकात आला आहात हे विसरून जाल व तुमचा वेळ आनंदात कसा संपेल , तुम्हांसही पत्ता लागणार नाही ! 


म्हणून कोणत्याही गोष्टीची व्यर्थ चिंता वा काळजी करू नका !


🤔😀🤣🙏

..

नंदुरबार जिल्ह्यातील बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या वारसांनादहा लाख

 नंदुरबार जिल्ह्यातील बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या वारसांनादहा लाख देण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश


             मुंबई, दि. १४ : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा येथील मोगराबाई रुमा तडवी या महिलेचा १९ नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. श्रीमती तडवी यांच्या कायदेशीर वारसांना दहा लाख रु. रक्कम लवकरात लवकर द्यावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वन विभागास दिले आहेत.


             या महिलेच्या कुटुंबियांना वन विभागाकडून दिली जाणारे आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा वन अधिकारी यांच्याकडून या प्रकरणाबाबत दूरध्वनीद्वारे सविस्तर माहिती घेतली. सर्व शासकीय स्तरावरील यंत्रणेला आदेशित करुन सर्व प्रक्रिया पूर्ण करुन जिल्हा वन अधिकारी लक्ष्मण पाटील यांना अहवाल प्राप्त करुन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशित केले.


            या अहवालानुसार जिल्हा वन अधिकारी लक्ष्मण पाटील यांनी श्रीमती मोगराबाई रुमा तडवी यांच्या कायदेशीर वारसांना रू १० लाख तत्काळ मंजूरीचे आदेश पारित केले.


0000

विठ्ठल उमपांनी समाजाला दिलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी देऊ शकत नाही.

 विठ्ठल उमपांनी समाजाला दिलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी देऊ शकत नाही.

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मृद्गंध पुरस्कारांचे वितरण .

        मुंबई, दि. 27 : शाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या शाहिरीतून समाजात निर्माण केलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी निर्माण करू शकत नाही, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


            12 व्या शाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या वेळी मृद्गंध पुरस्कार 2022 चे वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार आशीष शेलार, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, पद्मभूषण उस्ताद राशीदजी खाँ, पराग लागू, नंदेश उमप मंचावर उपस्थित होते.


            मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात फ.मुं. शिंदे, रवींद्र साठे, डॉ.रवींद्र कोल्हे, डॉ.स्मिता कोल्हे, संजय मोने, सुकन्या मोने, कमलाबाई शिंदे, श्रेया बुगडे यांना मृद्गंध पुरस्काराने सन्मानित केले गेले.


            यावेळी बोलताना मं श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आज ज्यांना मृद्गंध पुरस्कार दिला गेलाय त्या सर्व व्यक्ती कर्तृत्वाने हिमालयाएवढ्या मोठ्या आहेत. त्यांना पुरस्कार द्यायला मिळणे हाच माझ्याकरता एक मोठा पुरस्कार आहे.या सर्व लोकांच्या मनोगतातून, गायनातून या कार्यक्रमाची उंचीही प्रचंड वाढली आहे. राजकारणात तिरस्कारालाही तोंड द्यावे लागते, मात्र या मंचावर येऊन जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे.



Featured post

Lakshvedhi