Tuesday, 8 November 2022

रोजगार मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूद.

 रोजगार मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूद.

- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा.

            मुंबई, दि 8 :- राज्यातील उद्योग, कारखाने, खाजगी आस्थापना, कॉर्पोरेट संस्था यामधील रोजगार भरतीसाठी कौशल्य विकास विभागामार्फत वेळोवेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून विभागीय तसेच जिल्हास्तरावरील प्रत्येक मेळाव्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


            राज्यात ठिकठिकाणी रोजगार मेळाव्यांचे प्रभावीपणे आयोजन करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला आहे. महास्वयम वेबपोर्टल मार्फतही बेरोजगार उमेदवारांना कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. आतापर्यंत विभागीय स्तरावरील रोजगार मेळाव्यासाठी 1 लाख रुपये तर जिल्हास्तरावरील रोजगार मेळाव्यासाठी 40 ते 60 हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा होती. आता ही मर्यादा विभागीय आणि जिल्हास्तरावरील कोणत्याही मेळाव्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे रोजगार मेळावे प्रभावीपणे आयोजित करणे सुलभ होणार आहे. रोजगार मेळाव्याची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी यासाठी 1 लाख रुपये इतकी रक्कम मेळाव्याच्या प्रचार व प्रसिद्धीवर खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.


            राज्यातील बेरोजगारांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने विविध उद्योग, आस्थापना यांच्याकडून रिक्त पदे अधिसूचित करून घेऊन हे मेळावे आयोजित करण्यात येतात. त्याचबरोबर अप्रेंटीशीप संबंधित रिक्त पदेही मेळाव्यात उपलब्ध करून घेण्यात येतात. स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता कर्ज उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे, राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बँका, वित्तीय संस्था यांना तसेच कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार राबविणारे इतर शासकीय विभाग यांना मेळाव्यात आमंत्रित करणे, उमेदवारांना माहिती देण्यासाठी स्टॉल्स लावणे, उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्यविषयक प्रशिक्षणाची माहिती देणे, बायोडाटा तयार करणेबाबत माहिती देणे, भविष्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधी, मुलाखतीची तयारी इत्यादीबाबत मार्गदर्शन किंवा समुपदेशन करणे यासाठी राज्यातील रोजगार मेळाव्यांचे अधिक प्रभावीपणे आयोजन करणे आवश्यक आहे. यासाठी होणारा खर्च लक्षात घेता मेळाव्यांच्या आयोजनासाठी खर्च मर्यादेत भरीव वाढ करण्यात आली आहे. याद्वारे राज्यात रोजगार मेळाव्यांचे प्रभावीपणे आयोजन करून जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात येईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.


            या उपक्रमासाठी 3 कोटी 61 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत 1 कोटी 51 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री श्री. लोढा यांनी दिली


- - - 000 - - -



चीनचे भारतातील राजदूत आणि बेल्जियमच्या राजदूतांनी घेतली

 चीनचे भारतातील राजदूत आणि बेल्जियमच्या राजदूतांनी घेतली.

देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट.

            मुंबई, दि 8 :- चीनमधील भारताचे राजदूत श्री प्रदीपकुमार रावत तसेच बेल्जियमचे राजदूत डिडियर वेंडरहॅसेल्ट यांनी आज दोन वेगवेगळ्या भेटींमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.


            चीनमधील भारताचे राजदूत श्री प्रदीपकुमार रावत यांनी उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ग्रीन एनर्जी, पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्रातील संधी अशा विविध विषयांवर चर्चा झाली. बेल्जियमचे राजदूत डिडियर वेंडरहॅसेल्ट यांच्यासोबत महाराष्ट्रातील गुंतवणूक, बेल्जियमचे महाराष्ट्रातील उद्योगसमूह, येणाऱ्या काळात यायची गुंतवणूक अशा विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकींदरम्यान मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगरानी, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.


- - - 000 

युपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी२५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

 युपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी२५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. ४ :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने दि. २५ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.के.एस.जैन यांनी दिली आहे.


            उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी, पुणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.


             ऑन लाईन पद्धतीने प्रवेश अर्ज दि.४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. २५ नोव्हेंबर पर्यंत आहे. प्रवेश परीक्षा दि. ४ डिसेंबर २०२२ (ऑफलाइन पद्धतीने) घेण्यात येईल परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक डॉ. के. एस. जैन यांनी केले आहे.


0000

जिवन हे आपले






 

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने निबंध लेखन स्पर्धा

 भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने निबंध लेखन स्पर्धा.

            मुंबई, दि. ७ : भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा या संस्थेतर्फे श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२२-२०२३ आयोजित करण्यात आली आहे.

            या स्पर्धेसाठी नेतृत्व आणि समाजात विकसित होत असलेली महिलांची भूमिका, महाराष्ट्रातील नागरी प्रशासनात झालेले बदल व आव्हाने हे दोन विषय आहेत

            निबंध हा कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून सादर करावा. तसेच तो ३ हजार शब्दांपेक्षा कमी आणि ५ हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा, निबंध विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्यूत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करून त्यावर केवळ टोपणनाव लिहून चार प्रतीत मानद सचिव, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळ मजला, बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला, मंत्रालय, मुंबई- ४०००३२ या पत्यावर दि. २८.२.२०२३ सादर करावा, स्पर्धकाने निबंधावर आपले नांव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नये. निबंधाच्या प्रती व त्यासोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे नांव (मराठी व इंग्रजीतून) टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक व ई-मेल पत्ता नमूद करून पाठवाव्यात. निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेची सविस्तर माहिती www.iipamrb.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे भारतीय लोक प्रशासन संस्थेने कळविले आहे.

जिंदगी


 

चंद्र ग्रहण


 

Featured post

Lakshvedhi