किमान आधारभूत किमतीनुसार हरभरा खरेदीसाठी
शेतकऱ्यांनी १७ मे पर्यंत नोंदणी करावी
- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई, दि ११ : किमान आधारभुत किमतीने हरभरा खरेदीसाठी आतापर्यंत ४ लाख 94 हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. मार्चपासून आजतागायत 50.84 लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून, उद्दीष्टपूर्तीसाठी १७ मे पर्यंत नोंदणीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
आज मंत्रालयात हंगाम २०२१-२२ मधील हरभरा (चणा) खरेदी, साठवणूक नियोजन व शेतकरी चुकारे संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आतापर्यंत चना खरेदी संदर्भातील आढावा घेतला व शेतकऱ्यांसाठी नोंदणीची तारीख वाढवावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिपक तावरे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, पणनचे सहसंचालक विनायक कोकरे , द विदर्भ सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हरी बाबू, यांच्यासह पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सौ.भाग्यश्री टिळेकर, विदर्भ ॲग्रीकल्चरल अलाईड प्रोड्युसर कंपनी(वॅपको) नागपूरच नाफेडचे श्री.पुनीतसिंग, भारतीय अन्न महामंडळ अंशुमन चक्रवर्ती व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सहकार व पणन मंत्री श्री. पाटील म्हणाले, चालू वर्षी राज्यात हरभऱ्याचे उत्पादन चांगले झाले आहे. तथापि बाजारभाव मात्र हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ देण्यासाठी आणि राज्याला दिलेले हरभरा (चना) खरेदीचे उद्दिष्ट ६.८९ लाख मे टन पूर्ण करण्यासाठी सर्व राज्य नाफेड संस्थानी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे खरेदी केलेल्या मालाचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात. खरेदी केलेले शेतमाल गोदामात लवकर जमा करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. हरभरा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यात यावेत. यासाठी व्यवस्थापकीय संचालक, पणन महासंघ मुंबई यांनी नाफेड व भारतीय अन्न महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, शेतकरी चुकाऱ्यांबरोबर हमालीचे पैसे अनुषंगिक खर्च व बारदाण्याचे पैसेही नाफेडने लवकर अदा करावे, अशी सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.
राज्यातील चना खरेदी वाढवावी त्याचबरोबर गोडाऊनचा उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित मंडळांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
हरभरा ५२३० प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येत असून, दिनांक १ मार्च पासून ७३० खरेदी केंद्रांवर हरभरा (चना) खरेदी सुरू करण्यात आला आहे. आजतागायत ४ लाख ९४ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ५०.८४ लाख क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. २ लाख ८० हजार २८४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. खरेदीची एकूण किंमत २६५८.९३ कोटी असून, १९५८.४० कोटी निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.
0000