Monday, 25 April 2022

 “आई - वडिलांचे आशीर्वाद”


✍️"ज्याच्या डोक्यावर ही दोन हात असतील तो माणूस जगातील अत्यंत श्रीमंत असतो. कारण , देव प्रत्येकालाच हे दोन हात देत नाही . देत असतो पण काही लोक तो हात काढण्याचा प्रयत्न करत आहेत . तर काही नी तो काढला पण आहे . पण ते लोक जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत .कारण , हे दोन हात म्हणजे साधेसुधे थोडीच आहेत . हे तर स्वयम देवाची देणगी आहे. जे याला जपतात ते लोक पहा किती यशस्वी आहेत/ असतात . उदाहरणार्थ:- मोटेगावकर सर हे अत्यंत गरीब होते पैशाने तर होतेच . पण , हे सर कधीच म्हणत नाहीत मी गरीब होतो . कारण ते म्हणतात माझ्या डोक्यावर कायम माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद होता तर मी गरीब कशामुळे असेल . माझे आई-वडील हे माझे धन आहे . असे ते प्रत्येक भाषणात सांगत असतात . माझे आई - वडील माझ्या सोबत आहेत म्हणून, “ मी खूप श्रीमंत आहे”. हे सर ( gold medals in chemistry) या विषयात आहेत . यांच्या आई वडिलांचे स्वप्न होते कि सरांनी डॉक्टर व्हायला पाहिजे . पण सर डॉक्टर झाले नाहीतर शिक्षक झाले . अनेक विद्यार्थी त्यांनी डॉक्टर आणि इंजिनिअर केले . अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली . दरवर्षी 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ते मदत करतात . अत्यंत उत्तम शिक्षण ते देतात आणि डॉक्टर आणि इंजिनियर घडवतात . त्यांच्या या मदतीमुळे अनेक डॉक्टर , अनेक इंजिनिअर घडले . गरीब आणि हलाखीचे जीवन जगणार्‍या आई-वडिलांचे त्यांनी स्वप्न पूर्ण केले . त्यांच्या मुला - मुलींना डॉक्टर , इंजिनिअर घडवले . आणि त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली . त्यांच्या या मदतीमुळे गरीब विद्यार्थी डॉक्टर होऊ शकले . कारण, त्यांचे आई वडिलांचे स्वप्न होते की सरांनी डॉक्टर व्हावे , पण सरांनी डॉक्टर न होता शिक्षक झाले आणि आता खूप डॉक्टर घडवले . व त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले . सरांसारखे खूप मोठे- मोठे लोक फक्त आई-वडिलांचे आशीर्वाद आणि कष्ट यांच्या जोरावर मोठे होतात . त्यामुळे कष्ट करा पण मोठे झाल्यावर आपल्या आई वडिलांना मात्र विसरू नका . कारण देव देतो तसे घेतो पण . त्यामुळे मंदिरात हात जोडण्या पेक्षा घरातल्या आई-वडिलांच्या पाया पडा . कधीच मंदिरात जाण्याची वेळ येणार नाही.

 त्यामुळे आई वडील माझे देव असे जो म्हणतो ,“तो जगात अत्यंत श्रीमंत व्यक्ती असतो.” आणि तोच व्यक्ती जीवनात यशस्वी होतो.. "✍️

💯

 



 



 *ओंजळ* 🤲


श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचताना आज एक ओळ फार आवडली.

'महाराज, करतल भिक्षा घेत असत'

'करतल ' म्हणजे हाताच्या तळव्यावर मावेल इतकी..

मला हा शब्द खूपच आवडला..

म्हणजे प्रत्येक गोष्टीत समाधान मिळण्यासाठी जास्तीत जास्त माप म्हणजे 'करतल' असावे असे मनात आले.

करतल म्हणजे ओंजळभर !

आता हेच पहा ना.. 

खूप तहान लागली आणि ओंजळभर पाणी प्यायले तरी तृप्ती होते.

इतकाच काय ओंजळभर फुलांचा सुगंध मन व्यापून टाकतो.

आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती होते..

खुप दुःख झाले की आपल्याच ओंजळीत चेहरा झाकून मुक्तपणे अश्रूंना वाट करून दिली की मन हलके झालेच म्हणून समजा....

आणि कधी एखादा सलज्ज चेहरा ओंजळीत आपला चेहरा झाकून आपला संकोच दूर करू शकतो.....

बाप रे... केवढे महत्व आहे ना ह्या ओंजळीचे....

म्हणजे परमेश्वरानेच खऱ्या समाधानाचे हे परिमाण आपल्याला ठरवून दिले आहे आणि त्याचा विसर पडता कामा नये असेच पटकन मनात आले.

तसेच दोन्ही करतल एकत्र केले की होतो नमस्कार. किती छान पद्धत आहे भारतीयांची हात जोडून अभिवादन करण्याची. समोरच्याचे मन जिंकायला दोन करतल पुरेसे आहेत. कोणाला धीर देतांना त्याचे दोन्ही करतल आपल्या दोन्ही करतलांनी घट्ट धरले तर समोरच्याला किती मोठा दिलासा मिळतो ते शब्दांत सांगणे कठीण आहे. 

ज्ञानेश्वर महाराजांनी देखील समस्त विश्वाच्या शांती साठी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि 'पसायदान' मागितले...l

खरंच परमेश्वराने केलेल्या या छोट्या छोट्या योजना माणसाला आत्यंतिक समाधान देऊन जातात. म्हणुनच म्हटले जाते *तेथे कर माझे जुळती* 🙏🏼

 *🌹जीवन*🌹


  *प्रोफेसरने भांड्यात पाणी टाकून त्यामध्ये बेडूक टाकला, यानंतर ते भांडे तापायला ठेवले, पाणी गरम झाल्यानंतर बेडकाचे काय झाले, प्रोफेसरने असे का केले ?*

    😊😊😊😊😊😊

एका कॉलेजमध्ये "फिलॉसफीचे" एक प्रोफेसर शिकवायचे...ते वेगवेगळ्या पध्दतींनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील लहान-लहान गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करायचे...

एक दिवस प्रोफेसरने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावले आणि म्हणाले की, आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट समजावणार आहे.

- सर्व विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत व बघत होते.

प्रोफेसरने पाण्याने भरलेले एक भांडे घेतले आणि त्यामध्ये बेडूक टाकला. पाण्यात जाताच बेडूक आरामात पोहू लागला. यानंतर प्रोफेसरने ते भांडे तापायला ठेवले.

- भांड्यातील पाणी हळुहळू गरम होत होते. भांड्यामध्ये जो बेडूक होता तो पाण्याच्या वाढत्या तापमानानुसार स्वतःला अॅडजस्ट करत होता. हळुहळू पाणी जास्त गरम होत होतं, पण बेडकाला काहीच फरक पडत नव्हता. तो स्वतःला तापमानानुसार तयार करत होता.

- काही वेळानंतर पाण्याचे तापमान खूप वाढले आणि पाणी उकळू लागले. तेव्हा बेडकाचीहि सहनशक्ती संपली. त्याला त्या भांड्यात थांबणे कठीण झाले. तेव्हा बेडकाने उडी मारुन भांड्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला.

- बेडकाने पूर्ण शक्ती लावूनहि त्याला त्या भांड्यातून बाहेर पडता आले नाही. प्रोफेसरने तात्काळ त्या बेडकाला बाहेर काढले. 

 प्रोफेसरने विद्यार्थ्यांना विचारले की, बेडूक भांड्याबाहेर उडी का मारु शकला नाही ?

- सर्वांनी वेगवेगळी उत्तरे दिली.

तेव्हा प्रोफेसर म्हणाले - बेडूकाची इच्छा असती तर तो पाणी तापायला ठेवल्याबरोर बाहेर येऊ शकत होता. पण बेडूक स्वतःला वातावरणानुसार अॅडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होता. जेवढे तो सहन करु शकत होता, तेवढे त्याने केले.

- पण जेव्हा त्याला वाटले की, जीव वाचवण्यासाठी बाहेर पडावेच लागेल, तेव्हा तो उडी मारु शकला नाही, *कारण अॅडजस्ट होण्याच्या प्रयत्नात त्याची सर्व एनर्जी नष्ट झाली होती.* जर मी त्याला बाहेर काढले नसते, तर बेडूक मरुन गेला असता.

*लाइफ मॅनेजमेंट*

प्रोफेसरने आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवले - 

सर्व लोकांसोबत असेच होते. आपण नेहमी आपल्या परिस्थितीशी जुळवून घेतो. पण त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. पण *जेव्हा आपण पूर्णपणे परिस्थितींमध्ये अडकतो तेव्हा आपल्याला वाटते की, मी योग्य वेळी बाहेर पडायला पाहिजे होते. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते.*

 *बोध....* 

*योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला होय.*

*वाचण्यात आलेला सुंदर लेख*

 🚩 नमो आदेश 🚩

*वीर

आपण बऱ्याच जणांनी , क्षेत्रपाल ,भैरव , योगीनि ह्या बद्दल ऐकले आहे याचं प्रकारें वीर सुद्धा हा एक उग्र देवतेचा प्रकार आहे ह्या वरील देवता सर्व उग्र आहेत मुस्लिमसुफी मार्गात यांना जीन, जिन्नत, इरफित म्हणतात तर ख्रिस्ती धर्मात मायकल म्हणतात , वीर म्हणजे हे एक प्रकारे रक्षण करणारेच देव आहेत, हे उग्र प्रकारात येतात ५२ वीर ६४ वीर असे ही प्रकार आहेत हे शंकराचेच अवतार , तत्व आहे ह्या वीरा व्यतिरिक्त अजून एक वीर आहे.

परशुराम ज्याचा जन्म हा शक्ती च्या गर्भातून झाला म्हणून त्या शक्तीच नाव एकविरा आहे एक विराची माता आहे अशी ही एकविरा माता , ह्या वीरांचा अधिपती किंवा प्रमुख हा वीरभद्र आहे ह्या सर्वांवर त्याचेच वर्चस्व आहे.  

बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात काही लोक ह्या वीरांनि सजलेले किंवा ह्या वीरांनी विराजमान असलेले एक कड धारण करतात व त्याशक्तीवरून ज्योतिष , भूतप्रेत बाधा, वगैरे ह्यावर उपाय करतात त्यालाच वीर कंगण म्हणतात हे कंगण अघोर, औघड, नाथपंथीय वीरमंत्राद्वारे सिद्ध करतात सिद्ध करण्यासाठी तितक्याच ताकतीचा गुरू , साधक हा त्या विषयात परिपूर्ण ज्ञान असलेलीच व्यक्ती आवश्यक असते.

 तसेच हे कंगण बनवण्यासाठीच्या पद्धती सुद्धा वेगळ्या असतात (गावो गावी फिरणारे नंदीबैल वाले ह्यांचाकडे हमखास हे कंगण असत)कंगण प्रमाणेच वीरमुद्रिका सुद्धा असते.

५२ वीर साधना, म्हणजे कालिकेचे ५२ भैरवरुपी दुत आहे अशी ही काही भागात मानता आहेउदा वीर , वेताळ यांना प्रसन्न करून आपली मनोकामना पुर्ण करणे. 

यांनाच ५२ वीर म्हणतात. 

यांना भैरव गण, क्षेत्रपाल किंवा धर्म रक्षक असे ही म्हणतात.

ही साधना एक तांत्रिक साधना आहे. 

ही साधना एकांतवासात , बंद खोली, अरण्यात एकांतवासात, नदी तटावर , शिव मंदिर किंवा स्मशानभूमीत करतात. 

ही साधना रात्र - दिवस निरंतर चालु ठेवावी लागते.

या साधनेचा कालावधी ६१ दिवस असतो. 

साधना सतत चालु ठेवावी लागते . मध्ये व्यत्यय आल्यास ती निष्फल ठरते. 

*कुठल्याही सिद्ध गुरू शिवाय अशी साधना करू नये.*

साधना सफलता म्हणजे भैरवगण प्रत्येक्ष दर्शन देत नाही.

 पण त्यांचा उपस्थितीची जाणीव ते कोणत्या न कोणत्या रुपात करून देतात हे मात्र नक्कीच.

... आणि संकटकाळी ते कायम सोबत असतात या मध्ये ५२ वेगवेगळ्या शक्ती आहेत.

 त्यांची नावे ही वेगळे आहेत ५२ वीरांच्या शक्ती कार्य फल सुद्धा विभिन्न आहेत.

 प्रत्येक शक्तीची वेगळी अनुभूती आहे.

२- वीर साधना-

ज्या काही तांत्रिक साधना असतात ज्या स्मशान , नदी , डोंगर अशा ठिकाणी कराव्याच्या आहेत .

पण ते करण्यासाठी हिंमत होत नाही भीती वाटते किंवा त्या साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून स्वसंरक्षण साठी केलेली साधना किंवा साधनाआवश्यक असणारे धैर्य, हिंमत मिळावी या साठी प्रार्थमिक स्वरूपात करण्यात येणारे संरक्षण कवच मन्त्र साधना म्हणजे सुद्धा वीर साधना आहे.

३-वीर बद्दल अजून एक माहिती

।।पाबु हरभु रामदे मांगलिया मेहा

पाच वीर पधारज्यो गोगाजी जेहा।।

राजस्थानी लोकगीतातील हा एक दोहा आहे

पितर पूजा करताना म्हणजेच श्राद्ध पक्ष करताना "वीरं मे दत्त पितर:" हे पीतरदेवांनो आम्हाला असा एक वीरपुत्र द्या की ज्याचा कर्तृत्वाचा झेंडा तिन्ही लोकात फडकत राहावा.

 अशा वीरांची पूजा अनेक प्रकारात होत असते पण हे त्या गावापुरते प्रांता पुरते मर्यादित असते.

यांची स्मारके म्हणून कुठे घडीव दगड(मूर्ती) उभा केलेला असतो. 

एखाद्या वेळी त्या वीराचे नावही त्यावर कोरलेले असते.

क्वचित कोठे दगडांची रास त्याच्या नावाने रचलेली असते आणि ग्रामीण जनता त्याला नमस्कार करते. 

काही वेळा समाधी स्वरूपाचा चौथरा सुद्धा असतो.

महाराष्ट्रात अशी स्मारके उभारलेली आहेत त्यांना "विरगळ" अथवा "वीर"असे म्हणतात अनेक ठिकाणी यांची गणना ग्रामदेवता मध्ये केलेले आढळते.

अमुक एकाच अलौकिक कृत्यासाठी त्याला हे पद प्राप्त होते असे नसून अनेक कृती , कार्य त्या मागे असू शकतात .

एखाद्या अबला स्त्रीची अब्रू वाचवली ,गावावर आलेले अरिष्ट आपल्या छातीवर झेलले , हिंस्त्र श्वापदापासून मुलाबाळांचे रक्षण केले ,अग्निच्या ज्वालातून जीव धोक्यात घालून जीविताचे रक्षण केले पर्जन्याच्या प्रलय काळी एखाद्या बुडत्या चे प्राण संरक्षण केले स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी परी धर्मीयांचे उग्र क्रौर्य सोसले इत्यादी अनेक वीर कृत्ये त्यामागे असू शकतात.

आज ही बऱ्याच प्रांतात आशा पितर स्वरूपी वीरांचे पूजन केले जाते.

 खास करून संक्रात ची कर, व होळीची कर ह्या दिवशी वीरांची वाजत गाजत मिरवणूक काढतात तसेच मंगलकार्य प्रसंगी या वीरांची वेशभूषा धारण केली जाते.

 त्यांचा हातात शस्त्र अस्त्र दिले जातात त्याना वीर समजून नमस्कार करून त्यांचा यथोचित मान सन्मान दिला जातो व नन्तर वीरांची स्थापना जिथे केली असते त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कडून आशीर्वाद मागितला जातो की येणाऱ्या भावी पिढीत तुमचा सारखे वीर जन्माला येऊ द्या अशी प्रार्थना केली जाते.

 आपल्या महाराष्ट्र भूमीत अनेक वीरजन्माला आले व त्यांचे स्मारक, मंदिर ,समाधी आपण अनेक ठिकाणी बघतो अशा सर्व वीरांना साष्टांग नमस्कार आणि नमन

नमो आदेश

अलख आदेश

 लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सन्मानित

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच

                                                  - प्रधानमंत्री नरेंद मोदी

        मुंबई, दि,24 : लता दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जेव्हा लता दीदी सारख्या मोठ्या बहिणीच्या नावाने मिळत असेल तर हा पुरस्कार माझ्यासाठी आपलेपण आणि स्नेहाचे प्रतीक आहे. लता दीदीच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार मी लता दीदी आपल्या सर्व देशबांधवांची असल्याने त्यांना समर्पित करतो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

            भारतासह जगभरात आपल्या गायनामुळे नावलौकिक मिळविलेल्या भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ जाहीर झालेला पहिला लता मंगेशकर पुरस्कार मला मिळणे हे माझे भाग्यच समजतो, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार स्वीकाल्यानंतर आपली भावना व्यक्त केल्या.

            भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ जाहीर झालेला पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सन्मानपूर्वक एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, लता दीदी आणि माझी ओळख दिवंगत सुधीर फडके यांनी करून दिली. गेल्या अनेक वर्षात मला लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबीय यांच्याकडून खूप स्नेह मिळाला आहे. गेले अनेक वर्षे मंगेशकर कुटुंबीय माझ्या जीवनाचा हिस्सा बनले असून यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी मला त्यांची विशेष आठवण येईल. संगीताच्या या सामर्थ्याला, या शक्तीला आपण लतादीदींच्या रुपात प्रत्यक्षात पाहू शकलो, याचा माझ्यासह समस्त देशवासीयांना अभिमान वाटतो. आपण कोणताही पुरस्कार स्वीकारायचा नाही असे ठरविले होते पण हा पुरस्कार माझ्या बहिणीच्या नावाने असल्याने हा पुरस्कार मी स्वीकारला असून हा पुरस्कार मी समस्त देशवासीयांना अर्पण करतो.

            गेल्या जवळपास 80 वर्षांपासून आपण लता दीदी यांचे गीत ऐकत आहोत. लताजी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’च्या मधुर सादरीकरणाप्रमाणे होत्या, देशातील 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. हिंदी, मराठी किंवा संस्कृत असो किंवा इतर भारतीय भाषा असोत, लताजींचा स्वर प्रत्येक भाषेत मिसळलेला आहे. संस्कृती पासून ते श्रद्धेपर्यंत, पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत लता दिदींच्या सूरांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधण्याचे काम केले. जगभरात देखील, त्या भारताच्या सांस्कृतिक राजदूत होत्या असेही श्री. मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

            जे अव्यक्ताला व्यक्त करतात- ते शब्द असतात! जे व्यक्तामध्ये ऊर्जेचा, चेतनेचा संचार करतो- तो नाद असतो. आणि जे चैतन्याला भाव आणि भावनांनी भरून टाकतं, त्याला सृष्टि आणि संवेदनेच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचवतं ते संगीत असतं. संगीतातून आपल्याला मातृत्व आणि ममतेची अनुभूती मिळते. खरे तर संगीत आपल्याला देशभक्ती आणि कर्तव्याच्या जाणीवेच्या शिखरावर नेऊ शकते. लता दीदींच्या गाण्यातून आणि संगीतातून आपल्या सगळ्यांना हीच अनुभूती गेल्या 80 वर्षांपासून मिळत आहे, आणि हेच आपले भाग्य असल्याचे श्री. मोदी म्हणाले.

लता मंगेशकर हे गायन क्षेत्रातील सरस्वतीचे प्रतिक

            आजपर्यंत अनेक भाषांमध्ये गायन केलेल्या लतादीदी या केवळ मंगेशकर कुटुंबियांच्या नाहीत तर आपल्या सर्वांच्या दीदी होत्या. आपल्या गाण्यात निर्मळता, तरल भाव आणि समरसता दाखवून सतत नवीन काही शिकण्याची आस असलेल्या दीदींचे काम नवीन पिढीसाठी प्रेरणादायक असून दीदी म्हणजे गायन क्षेत्रातील सरस्वतीचे प्रतिक आहे असे मी मानतो असे सांगून कोविड काळात मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेल्या रुग्णसेवेचा प्रधानमंत्र्यांनी गौरव केला.

            मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान, मंगेशकर कुटुंबीय, हृदयेश आर्ट्सच्या वतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 80 वा स्मृती सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.

            भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रदान केला गेला. पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासह संगीत, नाटक, कला आदी क्षेत्रातील पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. संगीत क्षेत्रातील मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार गायक राहुल देशपांडे यांना, चित्रपट सेवेसाठीचे विशेष मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांना, मास्टर दीनानाथ मंगेशकर आनंदमयी हा सेवा पुरस्कार मुंबईचे डबेवाले यांना आणि सर्वोत्कृष्ट नाटकासाठी पुरस्कार 'संज्या छाया' नाटकास यावेळी देण्यात आला.

            यंदाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उषाताई मंगेशकर यांच्याकडे होते.भारतरत्न लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यंदाच्या वर्षापासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येत आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची 80 वी पुण्यतिथी असून त्या दिवशीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मंगेशकर परिवार आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टने आजचा कार्यक्रम आयोजित केला होता.


        

Featured post

Lakshvedhi