Wednesday, 30 March 2022

 कारागृहातील बंदिजनांना मिळणार वैयक्तिक कर्ज

- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

· येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येणार

· देशातील पहिलीच अभिनव योजना.

            मुंबई दि. 29- कारागृहातील शिक्षाधीन बंदी यांना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेमधून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज 7 टक्के इतक्या व्याज दराने उपलब्ध करून देण्याची योजना येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे तसेच या संदर्भातील शासननिर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.

            कारागृहातील बंद्यांच्या जीवनमानात सुधारणा व त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने गरजेकरता त्यांना कुटुंबीयांसाठी कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

            देशामध्ये अशाप्रकारच्या खावटी कर्जाची ही नाविन्यपूर्ण योजना म्हणून पहिलीच योजना असणार आहे.

            तसेच कारागृहात शिक्षा भोगत असताना तेथे काम करून मिळालेल्या उत्पन्नापोटी कर्ज मिळणारी ही देशातील पहिलीच अभिनव कर्ज योजना ठरणार आहे. याद्वारे एक कल्याणकारी योजना मूर्त स्वरूपात येऊन अंदाजे १०५५ बंद्यांना, कैद्यांना योजनेचा लाभ होऊ शकतो, असे गृहमंत्री म्हणाले.

            कारागृहामध्ये अनेक बंदी दीर्घमुदतीची शिक्षा भोगत असतात. यातील बहुसंख्य बंदी हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असल्याने अशा बंद्यांना दीर्घकाळ तुरूंगात रहावे लागल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब हवालदिल होऊन कुटुंबीयांमध्ये औदासिन्य, नैराश्य, अपराधीपणाची जाणीव निर्माण होऊ शकते.

            तसेच तुरूंगात गेलेल्या व्यक्तीने कौटुंबिक कर्तव्यात कसूर केल्याची भावना कुटुंबात निर्माण होते. अशा परिस्थितीत बंद्यास, कैद्यास त्याच्या कुटुंबाच्या गरजेकरिता कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून दिल्यास बंदी/कैद्याबद्दल कुटुंबीयांमध्ये सहानुभूती व प्रेम वाढून कुटुंबातील वातावरण सुदृढ राहण्यास मदत होईल, असे श्री.वळसे-पाटील यांनी सांगितले.

            बंद्याची/कैद्याची कर्ज मर्यादा, शिक्षेचा कालावधी, त्यामधून त्याला मिळू शकणारी संभाव्य सूट, वय, वार्षिक कामाचे अंदाजित दिवस, प्रति दिवसाचे किमान उत्पन्न यानुसार प्रस्तुत कर्जसुविधा ठरविली जाईल. अशा प्रकारच्या कर्जाला जामीनदारांची आवश्यकता असणार नाही. हे कर्ज संबंधित बंद्याला विनातारण व केवळ व्यक्तीगत हमीवर देण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

            दरम्यान, या कर्जाच्या रकमेचा उपयोग संबंधित स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी अथवा आपल्या वकीलांची फी देण्यासाठी अथवा इतर कायदेशीर बाबींसाठीच करेल याची दक्षता व जबाबदारी सर्वस्वीपणे कैद्यास कर्ज देण्याऱ्या बँकेची असेल. तसेच बँकेकडून कर्जाच्या परतफेडीमधून वसूल करण्यात येणाऱ्या रकमेच्या 1 टक्के इतका वार्षिक निधी कैद्यांच्या ‘कल्याण निधी’ला देण्यात येणार आहे. या बैठकीला अपर मुख्य सचिव गृह आनंद लिमये, अपर मुख्य सचिव अपील आणि सुरक्षा नितीन गद्रे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अतुलचंद्र कुलकर्णी, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेचे विद्याधर अनास्कर यांसह गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहाने पणआरोग्याची काळजी घेवून साजरी करू 

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

· १४ एप्रिल रोजी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार.

            मुंबई, दि. 29 : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे, मात्र, आरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करूयात. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सांगितले. महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच १४ एप्रिल रोजी राज्य शासनामार्फत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यास गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी मान्यता दिली व त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

            14 एप्रिल रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात आज सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते.

          या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा माजी राज्यसभा सदस्य डॉ.भालचंद्र मुणगेकर, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.महेश पाठक, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे- पाटील, मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालिद, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, आनंदराज आंबेडकर, डॉ.भदंत राहुल बोधी, रवि गरूड, मयुर कांबळे, महेंद्र साळवे यांसह अन्य समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

             मुख्यमंत्री म्हणाले, गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. आता हे कोरोनाचे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे.महानगरपालिका आणि पोलीस यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली आहे. राज्यभरात देखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

            गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, आरोग्य नियमांचे पालन करूनच जयंती साजरी करावी लागेल. साधारण परिस्थितीत आपण ज्या प्रथा-परंपरा पाळून जयंती साजरी करतो, त्या सर्व गोष्टी तितक्याच सन्मानपूर्वक केल्या जातील. आपण सर्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी आहोत. त्यामुळे जयंती उत्सवाच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीने करण्यात येतील. राज्य शासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना आगामी चार दिवसात प्रसिद्ध करण्यात येतील, ज्यायोगे तयारीसाठी सर्वांना पुरेसा वेळ मिळेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे जयंती दिनी राज्य शासनाच्या वतीने चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीची मागणी यावेळी मान्य करण्यात येऊन त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना गृहमंत्री श्री वळसे पाटील यांनी मुख्य सचिव आणि संबंधित यंत्रणेला दिल्या.

            यावेळी मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी मुंबई महापालिकेतर्फे जयंती निमित्त करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भातील माहितीचे सादरीकरण बैठकीत केले.

          कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळे जयंतीला येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढू शकते या धर्तीवर प्रशासनाने विविध उपाययोजना कराव्यात अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने विविध सदस्यांनी केल्या.

*****




 अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली मान्यता.

            मुंबई, दि. 29 :- राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. 

            यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे, किंवा मृत्युनंतर द्यावयाच्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना होणार आहे.

            अशा एकरकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्याकरिता भारतीय आयुर्विमा महामंडळास हा हप्ता देण्याकरिता निधी मिळावा असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत मान्यता दिली.

            अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे असे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे.

000

 *माठातील पाणी पिण्याचे फायदे* 


माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. आपल्याकडे पूर्वी माठातील पाणी पित होते. आजही बरेच जण माठातील पाणीच पितात. जाणून घेऊया माठातील पाणी पिण्याचे फायदे

👉🏻 माती नैसर्गिकरीत्या अल्कलाइन असते. शरीरातील ॲसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून शरीराच्या आतील वातावरण ॲसिडिक असण्यापेक्षा अल्कलाइन असेल तर आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरीत्या अल्कालाइन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाइन होते.

👉🏻 मातीमध्ये कोणतीही हानिकारक रसायने नाहीत. बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. पाणी दूषित होत नाही.

👉🏻 नैसर्गिक थंडावा- लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात खूप वेळ लोडशेडिंग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा खंडीत होतो. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे.

👉🏻 मातीचे गुणधर्म- माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत भरपूर खनिजे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो.

👉🏻 मेटॅबॉलिझम (चयापचय) सुधारते- माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.

👉🏻 उष्माघाताला आळा बसतो

उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या.

👉🏻 घशासाठी चांगले असते

सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी अतिथंड नसते त्यामुळे घशासाठी चांगले असते.

मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा.

Tuesday, 29 March 2022

 ए मेरे वतन के लोगो मराठीतील भाषांतर. 

जरुर ऐका. 



 महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील

पदकधारकांना अनुदान मंजूर

 

            मुंबईदि. 29 : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते.     

            पुणे जिल्ह्यातील लेफ्टनंट जनरल मिलिंद नारायणराव भुरके यांना या पुरस्कारातील अतिविशिष्ट सेवा पदक बहाल करण्यात आले असून त्यासाठी 2 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील सुभेदार मच्छिंद्रनाथ गोविंदा पाटील यांना मेन्शन इन डिस्पॅच हे शौर्यपदक बहाल करण्यात आले असून याकरिता 6 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सुभेदार संभाजी गोविंद भोगण यांनाही मेन्शन इन डिस्पॅच हे शौर्यपदक बहाल करण्यात आले असून याकरिता 6 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतून अनुज्ञेय ठरविलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम ही शासकिय अनुदानातून तर उर्वरित रक्कम मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतविण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्यात येणार आहे.  

            कोल्हापूर जिल्ह्यातील सुभेदार सुनिल नामदेव पाटील यांना सेना पदक बहाल करण्यात आले असून याकरिता 5 लाख 50 हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या शासकीय अनुदानापैकी 75 टक्के रक्कम शासकीय अनुदानातून तर उर्वरित 25 टक्के रक्कम मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतविण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्यात येणार आहे.

            यासंदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव यांनी 10 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध केला आहे.

०००० 

 राज्यपालांच्या हस्ते डॉ कृपाशंकर मिश्र यांच्या हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन संपन्न.

            मुंबई, दि. 29 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ज्येष्ठ साहित्यिक व संपादक डॉ कृपाशंकर मिश्र यांच्या 'स्तुत्य' व 'देवि उर्मिला' या दोन हिंदी काव्यसंग्रहाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले.  

            'स्तुत्य' हा काव्यसंग्रह भारतीय महापुरुषांच्या त्याग व बलिदानाची शौर्यगाथा आहे, तर 'देवि उर्मिला' का काव्यसंग्रह प्रभू रामाचे बंधू लक्ष्मण यांच्या धर्मपत्नी देवी उर्मिलेच्या त्याग व समर्पणावर आधारित काव्य आहे.    

            यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व संपादक डॉ सागर त्रिपाठी, डॉ संगिता मिश्र, हरिशंकर मिश्र व गांधी विचार मंचचे महासचिव मिथिलेश मिश्र प्रामुख्याने उपस्थित होते.

००००

Governor releases Dr Kripa Shankar Mishra's books of poetry.

            Governor Bhagat Singh Koshyari released the collection of Hindi poetry 'Stutya' and 'Devi Urmila' at Raj Bhavan Mumbai. The books of poetry have been written by well known Hindi litterateur and editor of monthly magazine 'Shreyaskar' Kripa Shankar Mishra.

            Well known writer and Editor Dr Sagar Tripathi, practising homoeopath Dr Santiga Mishra, Harishankar Mishra and General Secretary of Gandhi Vichar Manch Mithilesh Mishra were present.

0000



 



Featured post

Lakshvedhi