Tuesday, 15 March 2022

 मत्स्य व्यवसाय करणा-या महिलांनी आणि संस्थांनी सर्वोत्कृष्ट बनण्याबरोबरच सर्वप्रथम बनण्यास प्राधान्य द्यावे.

- अतुल पाटणे

           

            मुंबईदि. 14 :मत्स्य व्यवसाय करणाऱ्या महिला व संस्थांनी मत्स्य उत्पादनातून खाद्यपदार्थासह विविध उत्पादन करणे गरजेचे आहे. महिलांनी आणि संस्थांनी सर्वोत्कृष्ट बनण्याबरोबरच सर्वप्रथम बनण्यास प्राधान्य द्यावे, असे मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे यांनी सांगितले.

              यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विकास यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी एक दिवसीय जागृती व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे विभागीय संचालक विनीत नारायणनाशिक महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा शशिताई अहिरेसहकार भारतीचे सचिव डॉक्टर उदयराव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

            आयुक्त श्री पाटणे म्हणाले, महिलांसाठी शासनाच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या संस्था आणि महिलांना विविध प्रकारची साधने देऊन मत्स्य उत्पादन व विक्रीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. महिला सक्षमीकरणाकरीता शासनाकडून मदत देण्यात येत आहे. नावीन्यपूर्ण व पारंपरिक मत्स्यव्यवसाय करण्यासाठी लागणारी उपकरणेसाहित्य देण्यात येत आहेत.

             अवैध पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. एलईडीच्या माध्यमातून मासेमारी करणे चुकीचे असून महिलांनी आपल्या घरातील मासेमारी करणाऱ्या पुरुषांना एलईडीप्रकाशात मासेमारी करू नये असे सुचवावे. तसेच मत्स्य प्रजनन कालावधीमध्ये मासेमारी करू नयेयामुळे मत्स्य उत्पादनात दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. लहान लहान गोष्टीच्या माध्यमातून व्यवसाय करता येऊ शकतो. घरपोच विक्री करणेॲप तयार करून त्या माध्यमातून मत्स्य विक्री करणे तसेच आधुनिक बाजार पद्धतीचा अवलंब करून व्यवसायवृद्धी करता येऊ शकतेअसे श्री पाटणे यांनी यावेळी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी मनोगत मांडले. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

00000


 आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार प्रक्रिया विकसित करणारी कौशल्ये आणि संविधानिक मूल्ये यांचा अंतर्भाव करावा

- शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड.

            मुंबई, दि. 14 : राज्यातील विद्यार्थी घडविण्यासाठी काळाची पावले ओळखून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक विचार प्रक्रिया विकसित करणारी एकविसाव्या शतकातील कौशल्ये आणि संविधानिक मूल्ये याचा अंतर्भाव करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले.

            राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समिती’ स्थापन करण्यात आली आहे. याद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा तुलनात्मक अभ्यास करून अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मदत केली जाणार आहे. या समितीची बैठक शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दि.१४ मार्च २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने झाली.

            राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.देवेंदर सिंह यांनी बैठकीमध्ये आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकासंदर्भात समिती सदस्यांसमोर सादरीकरण करून पुढील रूपरेषा विषद केली. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम तयार करताना विचारात घ्यावयाच्या विविध बाबी, कौशल्य वयाचे विकसन करण्यासाठी शिक्षकांच्या अध्यापन पद्धती, याबाबत आयोजित करावयाची प्रशिक्षणे याबाबत यावेळी सांगोपांग चर्चा झाली.

            पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) चे संचालक कृष्णकुमार पाटील, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्राचार्य (समन्वय) विकास गरड, ICSE बोर्ड प्रतिनिधी श्रीमती संगीता भाटिया, IB बोर्ड प्रतिनिधी महेश बालाकृष्णन, आरपीजी फाऊंडेशनच्या संचालक श्रीमती राधा गोयंका, अंजुमन- ई- इस्लाम चे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, फादर जॉर्ज अथाएड, केंब्रिजचे प्रतिनिधी शमीम चौधरी, स्कूल लीडरशिप नेटवर्क मुंबई चे संस्थापक फ्रान्सिस जोसेफ यांच्यासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, केंब्रिज आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ, विविध शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी आदी समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.

०००००


 



 राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत घोषणा

· पेनड्राईव्हची सत्यता तपासण्यात येणार; प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार.

            मुंबई, दि. १४- पोलीस भरती २०१९ मधील रिक्त असलेल्या ५ हजार २९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडलेल्या उमेदवारांना लवकरच नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसात ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत केली.

            दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या पेनड्राईव्हची सत्यता तपासण्यात येणार असून या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असे सांगून संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती समोर यावी यासाठी हे प्रकरण चौकशीसाठी सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केला.  

            विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर सदस्यांनी उपस्थित केलेल्या नियम २९३ च्या प्रस्तावाला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात पोलीसांनी उत्तम कामगिरी केली असून '२०२० या वर्षातील गुन्हे' (Crime in 2020) या अहवालानुसार राज्यात ३ लाख ९४ हजार १७ गुन्हे दाखल झाले असून दरलाख ३१८ गुन्हे आहेत, त्यात महाराष्ट्र देशात अकराव्या क्रमाकांवर असून राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित असल्याचे सांगून कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळून लावला. महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाले असून राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर ते विधेयक आता राष्ट्रपतींकडे गेले आहे, त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर राज्यात एक चांगला कायदा अस्तित्वात येणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

            पोलीस ठाण्यांच्या जुन्या इमारतींच्या सुधारणा करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये ८७ पोलीस ठाण्यांची बांधकामे हाती घेतली असून यावर्षी पोलीसांच्या निवासस्थानांसाठी देखील भरीव तरतूद केली आहे, असेही गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले. राज्य राखीव पोलीस दलातील अंमलदारांना पोलीस दलात जाण्याची संधी उपलब्ध आहे, त्यासाठी १५ वर्षांची अट होती ती आता १२ वर्षांवर केल्याचे सांगून कोविडकाळात पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे कौतुक करुन ३९४ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.

१३८ विशेष जलदगती न्यायालये सुरु करण्यास मान्यता

            बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) अंतर्गत दाखल गुन्ह्यांसाठी १३८ विशेष जलदगती न्यायालये सुरु करण्यास मान्यता दिली आहे, हे सांगतानाच, गृहरक्षक दलाच्या जवानांना वर्षभरात १२० ते १५० दिवस काम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याचेही गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.

७ हजार २३१ पदांची नवीन पोलीस भरती होणार

            पोलीस भरती २०१९ मधील रिक्त असलेल्या ५ हजार २९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या काही दिवसात यातील पात्र निवडलेल्या उमेदवारांना नेमणुका दिल्या जातील असे सांगून येत्या काही दिवसात ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे, मंत्रीमंडळाने या भरतीला मान्यता दिली असून कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

पोलीस शिपाई निवृत्तीच्या वेळी पीएसआय होणार

            पोलीस सेवेत शिपाई म्हणून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यास निवृत्त होताना ३० वर्षे सेवा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकपदी कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला असून पोलीस शिपायांना आता निवृत्तीच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळेल, असेही गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींना येणाऱ्या धमक्यांच्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी मिलिंद भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून त्यांच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. कोविड काळात शासनाने घातलेल्या नियमांचा भंग केला म्हणून दाखल गुन्हे मागे घेण्याचा तत्वतः निर्णय घेतला असून पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांकडून प्राप्त प्रस्तावांनुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.

पेपरफुटीप्रकरणात पोलीसांची कठोर भूमिका

            पेपरफुटीच्या प्रकरणात पोलीसांनी कठोर भूमिका घेतली असून विविध ५ गुन्हे पोलीसांनी दाखल केले आहेत. आरोग्य विभागाच्या 'ड' वर्ग भरती प्रक्रियेतील पेपरफुटी प्रक्रणी २० जण अटकेत असून १० जणांना अटक करणे बाकी आहे. आरोग्य विभागाच्याच 'क' वर्ग भरती प्रक्रियेतील पेपरफुटी प्रकरणी ११ जणांना अटक केली असून ९ जण पोलीसांना हवे आहेत तर म्हाडातील पेपरफुटी प्रकरणी ६ अटकेत आहेत. टीईटी या शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराची चौकशी सुरु असून १४ जणांना अटक केली आहे, असे सांगून भरती प्रक्रियेसाठी कंपन्या नियुक्त करताना यापुढे पारदर्शक पद्धती राबविण्यावर विविध विभागांना भर द्यावा लागेल, असेही गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.

            राज्याचे पोलीस दल उत्तम काम करीत असून पोलीस दलाच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे आहोत, अशी ग्वाही देखील शेवटी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात दिली.

०००००







 

 


सुप्रभात

 







होळी रे होळी


 

Featured post

Lakshvedhi