रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष कृती आराखडा
– गृह राज्यमंत्री योगेश कदम
· रेल्वे पोलिसांची संयुक्त मोहीम, फेस रेकग्निशन कॅमेरे आणि संवेदनशील ठिकाणांवर विशेष उपाययोजना
मुंबई, दि. २ : मुंबईसह राज्यातील रेल्वे स्थानके आणि रेल्वे परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत संवेदनशील ठिकाणांसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त कारवाईद्वारे गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य रवींद्र फाटक यांनी मुंबई शहर आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य राजहंस सिंह, प्रवीण पोटे - पाटील, अमित गोरखे, भाई जगताप सदस्या चित्रा वाघ यांनी उपप्रश्न विचारत चर्चेत सहभाग घेतला.
राज्यमंत्री कदम म्हणाले की, रेल्वे अपघात व गुन्हेगारी रोखण्यासाठी संवेदनशील झोन निश्चित करण्यात आले असून प्रत्येक झोनसाठी संयुक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल शासनाला सादर करतील. त्यानुसार तातडीने आवश्यक निर्णय घेतले जातील. रेल्वेतील वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या फेऱ्या आणि डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे राज्य शासनामार्फत पाठपुराव्याने मांडली जाईल.
No comments:
Post a Comment