व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार व सुरक्षा रक्षक-भाविक वाद प्रकरणाची
चौकशी सुरू
-राज्यमंत्री आशिष जयस्वाल
मुंबई, दि.१ : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षा रक्षक व भाविक यांच्यात झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून, अहवालानुसार दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य भावना गवळी, प्रविण दरेकर, किशोर दराडे यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांशी सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे. ऑनलाइन पोर्टलद्वारे दररोज सुमारे दोन हजार भाविकांना, तर ऑफलाइन व्यवस्थेद्वारे सुमारे सात हजार भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तातडीच्या दर्शनासाठी निर्धारित शुल्क आकारून विशेष पासची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने दर्शन व्यवस्था राबविण्यासोबतच भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचेही राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment